इम्रान खान यांनी चर्चेला, दोन्ही देशांच्या कल्याणासाठी एकत्र काम करायला तयार असल्याचे म्हटले आहे, याचा अर्थ त्यांच्या मनोवृत्तीत फरक पडला, असा घ्यायचा का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम13 Jun 2019, 8:20 am
अरविंद गोखले
महाराष्ट्र टाइम्स.कॉमइम्रान यांची नरमाई कितपत खरी ?
इम्रान खान यांनी चर्चेला, दोन्ही देशांच्या कल्याणासाठी एकत्र काम करायला तयार असल्याचे म्हटले आहे, याचा अर्थ त्यांच्या मनोवृत्तीत फरक पडला, असा घ्यायचा का?
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नवाझ शरीफ आणि आसिफ अली झरदारी यांच्या घराण्यांवर तोफ डागली आहे. या दोघांच्या सरकारांनी सत्ता वाटून खाल्ली, असे ते म्हणाले. इम्रान खान यांनी पाकिस्तानला 'रियासत ए मदिना' बनवायचा संकल्प जाहीर केला आहे. रियासत ए मदिनाची राजवट उदारमतवादी होती. असाच दृष्टिकोन १२ ऑक्टोबर १९९९ रोजी जनरल परवेझ मुशर्रफ यांनी ठेवला होता. त्यावेळी त्यांनी तुर्कस्तानच्या केमाल पाशाचा आदर्श आपल्यासमोर असल्याचे म्हटले होते. पाशांचा गाशा त्यांनी नंतर गुंडाळला हा भाग वेगळा. सध्या पाकिस्तानचे कर्ज ३० हजार अब्ज डॉलरच्या घरात असताना इम्रान भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची भाषा बोलत आहेत. इम्रान यांना पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे. ही भेट किरगिझीस्तानच्या बिश्केक या राजधानीत आज-उद्या होईल का, अशी चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांची दुसऱ्या खेपेची कारकीर्द सुरू होताच इम्रान खान यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पाकिस्तान चर्चेला तयार असल्याचे म्हटले. दोन्ही देशातल्या कल्याणासाठी आपण एकत्र काम करायला तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. या सगळ्याचा अर्थ पाकिस्तान आणि इम्रान खान यांच्या एकूणच मनोवृत्तीत फरक पडला आहे, असा घ्यायचा का? मात्र तसे असते तर भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या इफ्तारमध्ये अतिरेकी अडथळे आणले गेले नसते. इम्रान खानांच्या आधी बेनझीर भुट्टो, जनरल परवेझ मुशर्रफ, नवाझ शरीफ यांनी भारताशी चांगले संबंध राहावेत असे प्रयत्न केल्याचा दाखला आहे, पण ते कधीच यशस्वी झाले नाहीत. जनरल परवेझ मुशर्रफ हे लष्करप्रमुख आणि अध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या कोणत्याही तोडग्याआड पाकिस्तानचे लष्कर येण्याची शक्यता नव्हती. बेनझीर भुट्टो आणि नवाझ शरीफ यांनी तसे प्रयत्न जेव्हा केले तेव्हा ते लष्कराने हाणून पाडले. पाकिस्तानी लष्कराने किंवा त्याच्या 'इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स' या गुप्तचर संघटनेने अशा चर्चेत कायम विघ्नच आणले. आताही इम्रान खान भारताशी बोलणी करू इच्छित असतील आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख कंवर जावेद बाज्वा यांना ती कृती पसंत नसेल तर ते या चर्चेलाच काय पण इम्रान खान यांनाही उधळून लावू शकतात. तथापि या दोन्ही देशांमधला दुवा म्हणून बाज्वा यांच्याकडे पाहिले जाते. बाज्वा यांची लष्करप्रमुखपदाची मुदत या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी संपते आहे आणि त्यांना मुदतवाढ हवी आहे की नाही याविषयीच शंका आहे.
मुळातच बाज्वा आणि इम्रान खान यांचे संबंध अतिशय चांगले आहेत, किंबहुना इम्रान खानांची निवड ही लष्कराचीच निवड असल्याने इम्रान लष्कराच्या चौकटीबाहेर जाणार नाहीत. लष्कराला गेल्या कित्येक दिवसांपासून पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार सलत होता. मात्र पाकिस्तानी लष्कराच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायला कोणी धजावत नाही. भूतपूर्व सत्ताधाऱ्यांबद्दलचा हाच दृष्टिकोन पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचाही आहे. हाही एक 'सुदृढ' योगायोग आहे. त्याचेच फलीत म्हणजे शरीफ आणि झरदारी यांना झालेली अटक होय. अनुक्रमे पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्या नेत्यांना तुरुंगात टाकून इम्रान यांनी पाकिस्तानच्या राजकारणात बेईमानांना स्थान असता कामा नये, या आपल्या एककलमी कार्यक्रमाला जनतेची सहानुभूती मिळवलेली आहे. झरदारी यांची ओळखच 'मिस्टर टेन पर्सेंट' अशी असल्याने त्यांच्या अटकेला तेवढा विरोधही झालेला नाही. मुहाजिरांचे नेते अल्ताफ हुसेन यांना लंडनमध्ये झालेली अटक मात्र वेगळ्या कारणाने झालेली आहे. इम्रान खान यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात बेनामी संपत्तीधारकांना आपली सर्व मालमत्ता घोषित करण्याची ३० जून ही शेवटची मुदत दिली. विशेष हे की, पाकिस्तानच्या लष्करानेही आपल्या खर्चात कपात जाहीर केलेली आहे. पाकिस्तान हा एकूण सरकारी खर्चाच्या १६.७ टक्के लष्करावर खर्च करत असतो. त्यामुळे दिवाळखोर देशाने लष्कराच्या या पावलाचे स्वागतच केले. या स्थितीत पाकिस्तान शांतताप्रेमी असल्याचे सांगणे जनतेच्या पचनी पडते.
पाकिस्तान आणि भारत यांनी चर्चा करावी, असे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र पाकिस्तान आता अमेरिकेचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही, पण तो चीनला टरकून आहे. जे दहशतवादी भारताच्या विरोधात काम करतात ते चीनलाही यापुढल्या काळात सतावत राहतील ही चीनला वाटणारी भीती आहे. बलुचिस्तानात ग्वदार बंदरावर काम करणारे काही चिनी तंत्रज्ञ मारले गेल्याने आणि चीनच्या सिंझियांग प्रांतात पाकिस्तानातूनच दहशतवादी जात-येत असल्याने चीनला पाकिस्तानविषयक धोरणाला आज ना उद्या मुरड घालावी लागणार आहे. हे घडू नये यासाठी इम्रान खान आणि बाज्वा चीनलाही जाऊन आले, पण त्यात त्यांना म्हणावे तसे यश आलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत चीनने मौलाना मसूद अझरच्या विरोधात भूमिका घेऊन त्याला जागतिक पातळीवर दहशतवादी घोषित केल्याने पाकिस्तानची कोंडी झाली. तरीही पाकिस्तानने दहशतवाद्यांचे अड्डे संपवलेले नाहीत. याच अझरच्या जैश ए महमदच्या दहशतवाद्याने काश्मीरमध्ये पुलवामामध्ये लष्करी ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. त्याचा बदला घेताना भारताने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये बालाकोटच्या जैश ए महमदच्या सर्वात मोठ्या दहशतवादी तळावर हल्ला केला. या कारवाईला अरब जगतासह सर्वांनी पाठिंबा दिल्याने किंबहुना त्यास चीनसह कोणीही विरोध न केल्याचे लक्षात घेऊन पाकिस्तानी राज्यकर्त्यांना थोडे शहाणपण आले असावे. इम्रान यांनी अलीकडेच केलेल्या भाषणात 'एकदा युद्ध सुरू झाले की ते लवकर थांबवता येत नाही', असे सांगून पहिल्या-दुसऱ्या महायुद्धांचीच नव्हे तर व्हिएतनाम आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये अमेरिकेच्या लांबलेल्या कारवायांचीही उदाहरणे दिली. 'आपले दोन्ही देश हे आता अण्वस्त्रसज्ज आहेत' हे सांगायलाही ते विसरलेले नाहीत. हे सांगणे म्हणजे धमकावणे असते.
बालाकोट हल्ल्यानंतर इम्रान फारसे संतापून बोलले नाहीत. पाकिस्तानी लष्कराने बालाकोटच्या हल्ल्याला उत्तर दिले, पण ते आपल्या लष्कराच्या सज्जतेमुळे यशस्वी झाले नाही. बालाकोटच्या कारवाईच्या वेळी आपले वैमानिक अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हाती सापडले, पण त्यांना परत भारताच्या ताब्यात देण्यात आले. पाकिस्तानने भारतीय विमानांना पाकिस्तानी सरहद्दीवरून उड्डाणास मज्जाव केला. भारताने त्याआधी ही बंदी जाहीर केली. भारताच्या साडेतीनशेवर विमानांना रोज पाकिस्तानी प्रदेशावरून जा-ये करावी लागते. हे लक्षात घेतले तर व्यावसायिक विमान कंपन्यांना मोठा भूर्दंड पडतो. पाकिस्तानला मात्र तेवढा मोठा फटका बसत नाही. बिश्केकमध्ये १३ आणि १४ जून रोजी 'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन'ची बैठक होत आहे. नरेंद्र मोदी यांना बिश्केकला जाण्यापुरती आपली हवाई हद्द खुली करून पाकने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याचा अर्थ काय? शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही अमेरिकी प्रभाव कमी करण्यासाठी चीनची युक्ती आहे. या संघटनेत भारत आणि पाकिस्तानही आहेत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिका तालिबानांशी चर्चा करत आहे त्यात भारताकडून खो घातला जाऊ नये म्हणून पाकिस्तानकडून हा सावध पवित्रा घेतला जात आहे. पाकिस्तान चर्चेची भाषा करतो आहे म्हणून त्याकडे फार प्रेमाने पाहता येणार नाही. कोणत्याही अर्थाने पाकिस्तान विश्वासार्ह नाही आणि लष्कराच्या तालावर नाचणारे बाहुले ही प्रतिमा बदलता येणे इम्रान यांना अवघड आहे.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.