‘स्मरा स्मरा हो दत्तगुरू’ किंवा ‘आली कुठूनशी कानी’ ही भक्तिगीते आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. त्याचप्रमाणे माणिक वर्मांच्या गोड आवाजातले ‘मनी माझिया नटले गोकुळ’ हे गाणेही. ही गाणी आठवल्यावर त्यांचे संगीतकार वसंत आजगावकर यांचे नावही तितक्याच प्रकर्षाने आजही जुन्या-जाणत्या श्रोत्यांना आठवते. ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे गायक-संगीतकार वसंतराव आजगावकर यांना यंदाचा ‘चतुरंग संगीत सन्मान’ जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने आजगावकरांच्या शांत व मृदुस्वभावी संगीत योगदानाची विशेष आठवण होते. आकाशवाणी आणि प्रत्यक्ष मैफलींच्या कार्यक्रमांमधून ज्या काळात भावगीत, भक्तिगीतांनी मराठी मनावर अधिराज्य केले, अशा काळात वसंतराव आजगावकर यांचीही कारकीर्द बहरली. सातत्य आणि प्रयोगशीलतेतून त्यांनी आपली मार्गक्रमणा सुरू ठेवली आणि ५० वर्षांहून अधिक काळच्या सांगीतिक कारकीर्दीत हजारांहून अधिक गीतगायनाचे कार्यक्रम केले. गिरगावात जन्मलेले वसंतराव पाचव्या वर्षी डोंबिवलीत राहायला आले. तेथे स. वा. जोशी विद्यालयात शिक्षण व पुढे माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. डोंबिवलीतील ज्येष्ठ गायक कै. पं. एस. के. अभ्यंकर यांच्याकडे वसंतरावांनी संगीताचे शिक्षण घेतले. १९५८ च्या सुमारास त्यांनी आकाशवाणीवरून गाण्यास सुरुवात केली. बाबूजींच्या मार्गदर्शनाने ‘संपूर्ण गीतरामायण’ हा कार्यक्रमही ते करू लागले. त्याचप्रमाणे हिंदी भाषांतरित गीतरामायणाचे असंख्य कार्यक्रम त्यांनी केले. १९७०मध्ये त्यांनी व्यासरचित महाभारतावर आधारित गीत महाभारताचा पहिला कार्यक्रम केला. वसंतरावांमधल्या प्रयोगशीलतेची चुणूक इथे बघायला मिळाली. झेंडूची फुले साग्रसंगीत (आचार्य अत्रे यांच्या विडंबन कवितांचे गायन), मर्ढेकरांच्या कविता-एक नादानुभव, सन्तोकी बानी (हिंदी भजनांच्या गायनांचा कार्यक्रम), गीत शिवायन (शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चरित्रगायन), गीत दत्तात्रेय (गुरुचरित्रावर आधारित गीतगायन), सावरकर दर्शन, श्री रामचरितमानस, श्री साई चरित्रगान, श्री गजानन गीतांजली, अवस्था लावोनि गेला (संत नामदेवरचित ज्ञानेश्वर समाधीचे अभंग), विंदांची प्रेमगाणी, रामदास म्हणे अशा वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांमधून गायक-संगीतकार वसंतराव आजगावकर रसिकांना सतत भेटत राहिले आहेत. त्यांनी दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनऊ, हैदराबाद, बेंगळुरु, अहमदाबाद, बडोदा, कोलकाता या ठिकाणीही अनेक कार्यक्रम केले आणि आपला वेगळा रसिकवर्ग तयार केला. गिरगाव व डोंबिवलीशी घट्ट नाते असलेल्या ‘चतुरंग’तर्फे वसंतरावांचा उचित सन्मान व्हावा, हा आणखी एक स्मरणीय योग ठरावा.
वसंत आजगावकर
१९५८ च्या सुमारास त्यांनी आकाशवाणीवरून गाण्यास सुरुवात केली. बाबूजींच्या मार्गदर्शनाने ‘संपूर्ण गीतरामायण’ हा कार्यक्रमही ते करू लागले. त्याचप्रमाणे हिंदी भाषांतरित गीतरामायणाचे असंख्य कार्यक्रम त्यांनी केले.
Maharashtra Times 9 Apr 2016, 4:00 am