वैभव वझे
उद्योगाचा हमखास फॉर्म्युला
‘उद्यमेन हि सिध्यन्ति, कार्याणि न मनोरथैः।’ सुभाषिताची ही पहिली ओळ स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक आहे. परिश्रमाने कोणतंही कार्य सिद्धीस जातं, त्यासाठी केवळ मनोरथ रंगवून चालत नाही. उद्योग यशस्वी करण्यासाठी नेमका हाच फॉर्म्युला लागतो. या पार्श्वभूमीवर, ‘उद्योग करावा ऐसा’ हे डॉ. सुरेश हावरे यांचं ‘रोहन प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेलं पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकेल. एकूण २२ उद्योजकांच्या यशोगाथा यामध्ये सामावल्या आहेत.
भारतीय समाजाची मानसिकता नोकरदाराची नाही. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणपद्धतीमुळे म्हणा किंवा पारतंत्र्यातील अनिश्चिततेमुळे म्हणा, अनेकजण व्यवसाय उभारण्याचे स्वप्न न बाळगता नोकरीत ‘चिकटणे’ महत्त्वाचे मानू लागले! तरीही या काळात टाटा, बिर्ला, गोदरेज, बजाज, किर्लोस्कर, बेडेकर, पेठे ही उद्योजक घराणी उदयाला आली. आज प्रत्येकाला त्याच्या आवडीची नोकरी मिळणे जवळपास अशक्य आहे. लोकसंख्येची घनता, मागणीपेक्षा गुणवत्तेचा पुरवठा अधिक, अर्थव्यवस्थेची निराशाजनक वाटचाल, सरकारची धोरणे अशी अनेक कारणे यासाठी आहेत. यातून मार्ग काढून, अंगभूत गुणवत्तेचा वापर करून स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू केला तरच ते सयुक्तिक ठरणार आहे. यासाठी मराठी माणसाने आपली जीवनशैली काळानुसार बदलणे गरजेचे आहे. संपत्तीचा वापर करणारे न राहता संपत्तीची निर्मिती करणारे होणं हे फार महत्त्वाचं आहे. यादृष्टीने उद्योगासाठी पैसा नव्हे, तर वृत्ती लागते हा डॉ. मनोहर जोशी यांचा विचार आपलं लक्ष वेधून घेतो.
जेवढं आव्हान मोठं तेवढं त्याचं पारितोषिक मोठं हेही व्यवसायातलं एक महत्त्वाचं सूत्र. आपण आपल्याला छोटं समजलं तर आपली विचारसरणीही छोटी होत जाते, त्यामुळे आपण स्वतःला मोठं समजणं गरजेचं असतं. आपल्या मुलाखतीत उद्योग सातत्याने सुरू ठेवण्यासाठी डिसिप्लिन, डिव्होशन व डेडिकेशन असायला हवं, हा विचार तळवलकर्स जिमच्या मधुकर तळवलकर यांनी तरुणांना दिला आहे. डॉ. सुरेश हावरे आणि डॉ. मनोहर जोशी यांच्या उद्योग दुसऱ्याच्याच पैशाने करावा या विचाराला श्रम इलेक्ट्रिकच्या शहाजी जगदाळे यांनी पुष्टी दिली आहे. मात्र असे करताना त्या उद्योगात पूर्णपणे झोकून देण्याची तयारी लागते, याकडेही जगदाळे यांनी लक्ष वेधलं आहे. ‘जसं तुमचं नेचर तसंच तुमचं फ्युचर’, हे दास ऑफशोअर इंजिनियरिंगच्या अशोक खाडे यांचं सूत्र आपल्याला आचरण्यासाठी अशक्य वाटतं. परंतु त्यांनी व्यवसायाची सुरुवात खिशात पैसे नसताना केली. ही सुरुवात त्यांचे बंधू दत्ता यांच्या प्रामाणिकपणाच्या ‘नेचर’मुळे मिळालेल्या रेक्टिफायरने झाली आणि त्यामुळे ‘फ्युचर’ देदीप्यमान होत गेलं. उद्योग सुरू करायचा असेल तर तुमच्या पोटात एक प्रकारची आग भडकली पाहिजे. अशी आग भडकल्यासच तुम्ही चांगला व्यवसाय करू शकाल, याकडे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या मिलिंद कांबळे यांनी लक्ष वेधलंय. आत्मविश्वास असेल तर पर्यटनाचं अवकाश वाढू शकतं हे वीणा पाटील यांनी अल्पावधीत नावारूपाला आणलेल्या वीणा वर्ल्ड या पर्यटन संस्थेवरून आपल्याला पटतं. वस्तू किंवा सेवा विकण्यासाठी केलेल्या कम्युनिकेशनला म्हणजेच ब्रँडिंगला फार महत्त्व असल्याचंही त्यांनी त्यांच्या मुलाखतीत आवर्जून सांगितलंय.
नवकल्पना किंवा इनोव्हेशनची कास धरताना उद्योजकाने कायम जोखीम पत्करली पाहिजे, असं अनेकजण सांगतात. परंतु ही जोखीम किंवा रिस्क कॅल्क्युलेटेड असावी, असं पितांबरी प्रॉडक्ट्सच्या रवींद्र प्रभुदेसाई यांना वाटतं. सिनेसृष्टीत येण्यासाठी केवळ अभिनेताच व्हावं लागतं हा समज प्रमोद व मधुराणी प्रभुलकर यांनी खोटा ठरवला आहे. त्यांच्या मिरॅकल अॅकॅडमीमध्ये अभिनयाच्या जोडीला संवादलेखन, कथा-पटकथा लेखन, संकलन, लघुपट निर्मिती अशा विविध अंगांचं शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे व्यवसायाकडे पाहण्याचा नवा आयाम त्यांच्या मुलाखतीतून वाचकांना नक्की मिळतो.
पुस्तकाच्या मांडणीविषयी न सांगता पुढे जाणं योग्य होणार नाही. यामध्ये उद्योजकांच्या मुलाखती आहेत. परंतु या मुलाखती मांडताना त्या संवादात्मक पद्धतीने मांडल्या आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक मुलाखत वाचताना त्यात सहज गुंतत जातो. मुलाखत देणाऱ्या उद्योजकाशी डॉ. सुरेश हावरे संवाद साधतात. त्याची मांडणी नाटकाच्या संहितेप्रमाणे केल्यामुळे प्रश्न आणि उत्तर यांचं आकलन वाचकाला चांगल्या प्रकारे होऊ शकते. यात घेतलेले सर्व उद्योजक हे रोल मॉडेल होतील इतक्या महत्तेचे आहेत. यामध्ये विविध वयोगटातील उद्योजक आहेत. झी२४तास या दूरचित्रवाहिनीवरून ‘दि सुरेश हावरे बिझनेस शो’ हा उद्योजकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम प्रदर्शित झाला होता. त्या मुलाखतींचं शब्दांकन भगवान दातार यांनी उत्कृष्ट केलं आहे.
संपूर्ण पुस्तकात, प्रत्येक मुलाखतीनंतर एक मॅनेजमेंट थॉट दिला आहे, जो फारच सुंदर आहे. एका विचारात असं म्हटलंय की, ‘घर आणि मंदिर यात काय फरक आहे? दोन्ही इमारतीच तर आहेत. पण घरात भक्तीचं वातावरण असेल तर त्याचं मंदिर होतं. प्रवासात भक्ती घातली की त्याची यात्रा होते. संगीतात भक्ती ओतली की त्याचं भजन होतं. पाण्यात भक्ती मिसळली की त्याचं तीर्थ होतं. तसंच कामात भक्ती ओतली की ती सेवा होते. कोणतंही काम सेवा म्हणून करा, त्यामुळे देशाची व समाजाची सेवा केल्याचा आनंद मिळेल.’ उद्योग किंवा व्यवसाय करताना तो पैसा कमावण्यासाठी केला जातो हे तर उघड आहे. परंतु त्याचबरोबर अनेक रिकाम्या हातांना रोजगार देण्याचं पुण्यकर्मही तो उद्योग करत असतो. यामुळे समाजाला कार्यप्रवण करण्याची सेवा त्या उद्योजकाच्या हातून घडते आणि पर्यायाने देशसेवाही घडते. हा महत्त्वाचा विचार हे पुस्तक प्रत्येक उद्योजकाशी मारलेल्या गप्पांमधून देऊन जातं. ‘उद्योग करावा ऐसा’चा हाच अत्यंत महत्त्वाचा व अनुसरणीय असा ‘लसावि’ आपल्या हाती निश्चितच लागतो. तेच या पुस्तकाचं यश आहे!
‘उद्योग करावा ऐसा’
लेखक : डॉ. सुरेश हावरे
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठं : २४०
किंमत : ३०० रु.
उद्योगाचा हमखास फॉर्म्युला
‘उद्यमेन हि सिध्यन्ति, कार्याणि न मनोरथैः।’ सुभाषिताची ही पहिली ओळ स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक आहे. परिश्रमाने कोणतंही कार्य सिद्धीस जातं, त्यासाठी केवळ मनोरथ रंगवून चालत नाही. उद्योग यशस्वी करण्यासाठी नेमका हाच फॉर्म्युला लागतो. या पार्श्वभूमीवर, ‘उद्योग करावा ऐसा’ हे डॉ. सुरेश हावरे यांचं ‘रोहन प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेलं पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकेल. एकूण २२ उद्योजकांच्या यशोगाथा यामध्ये सामावल्या आहेत.
भारतीय समाजाची मानसिकता नोकरदाराची नाही. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणपद्धतीमुळे म्हणा किंवा पारतंत्र्यातील अनिश्चिततेमुळे म्हणा, अनेकजण व्यवसाय उभारण्याचे स्वप्न न बाळगता नोकरीत ‘चिकटणे’ महत्त्वाचे मानू लागले! तरीही या काळात टाटा, बिर्ला, गोदरेज, बजाज, किर्लोस्कर, बेडेकर, पेठे ही उद्योजक घराणी उदयाला आली. आज प्रत्येकाला त्याच्या आवडीची नोकरी मिळणे जवळपास अशक्य आहे. लोकसंख्येची घनता, मागणीपेक्षा गुणवत्तेचा पुरवठा अधिक, अर्थव्यवस्थेची निराशाजनक वाटचाल, सरकारची धोरणे अशी अनेक कारणे यासाठी आहेत. यातून मार्ग काढून, अंगभूत गुणवत्तेचा वापर करून स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू केला तरच ते सयुक्तिक ठरणार आहे. यासाठी मराठी माणसाने आपली जीवनशैली काळानुसार बदलणे गरजेचे आहे. संपत्तीचा वापर करणारे न राहता संपत्तीची निर्मिती करणारे होणं हे फार महत्त्वाचं आहे. यादृष्टीने उद्योगासाठी पैसा नव्हे, तर वृत्ती लागते हा डॉ. मनोहर जोशी यांचा विचार आपलं लक्ष वेधून घेतो.
जेवढं आव्हान मोठं तेवढं त्याचं पारितोषिक मोठं हेही व्यवसायातलं एक महत्त्वाचं सूत्र. आपण आपल्याला छोटं समजलं तर आपली विचारसरणीही छोटी होत जाते, त्यामुळे आपण स्वतःला मोठं समजणं गरजेचं असतं. आपल्या मुलाखतीत उद्योग सातत्याने सुरू ठेवण्यासाठी डिसिप्लिन, डिव्होशन व डेडिकेशन असायला हवं, हा विचार तळवलकर्स जिमच्या मधुकर तळवलकर यांनी तरुणांना दिला आहे. डॉ. सुरेश हावरे आणि डॉ. मनोहर जोशी यांच्या उद्योग दुसऱ्याच्याच पैशाने करावा या विचाराला श्रम इलेक्ट्रिकच्या शहाजी जगदाळे यांनी पुष्टी दिली आहे. मात्र असे करताना त्या उद्योगात पूर्णपणे झोकून देण्याची तयारी लागते, याकडेही जगदाळे यांनी लक्ष वेधलं आहे. ‘जसं तुमचं नेचर तसंच तुमचं फ्युचर’, हे दास ऑफशोअर इंजिनियरिंगच्या अशोक खाडे यांचं सूत्र आपल्याला आचरण्यासाठी अशक्य वाटतं. परंतु त्यांनी व्यवसायाची सुरुवात खिशात पैसे नसताना केली. ही सुरुवात त्यांचे बंधू दत्ता यांच्या प्रामाणिकपणाच्या ‘नेचर’मुळे मिळालेल्या रेक्टिफायरने झाली आणि त्यामुळे ‘फ्युचर’ देदीप्यमान होत गेलं. उद्योग सुरू करायचा असेल तर तुमच्या पोटात एक प्रकारची आग भडकली पाहिजे. अशी आग भडकल्यासच तुम्ही चांगला व्यवसाय करू शकाल, याकडे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या मिलिंद कांबळे यांनी लक्ष वेधलंय. आत्मविश्वास असेल तर पर्यटनाचं अवकाश वाढू शकतं हे वीणा पाटील यांनी अल्पावधीत नावारूपाला आणलेल्या वीणा वर्ल्ड या पर्यटन संस्थेवरून आपल्याला पटतं. वस्तू किंवा सेवा विकण्यासाठी केलेल्या कम्युनिकेशनला म्हणजेच ब्रँडिंगला फार महत्त्व असल्याचंही त्यांनी त्यांच्या मुलाखतीत आवर्जून सांगितलंय.
नवकल्पना किंवा इनोव्हेशनची कास धरताना उद्योजकाने कायम जोखीम पत्करली पाहिजे, असं अनेकजण सांगतात. परंतु ही जोखीम किंवा रिस्क कॅल्क्युलेटेड असावी, असं पितांबरी प्रॉडक्ट्सच्या रवींद्र प्रभुदेसाई यांना वाटतं. सिनेसृष्टीत येण्यासाठी केवळ अभिनेताच व्हावं लागतं हा समज प्रमोद व मधुराणी प्रभुलकर यांनी खोटा ठरवला आहे. त्यांच्या मिरॅकल अॅकॅडमीमध्ये अभिनयाच्या जोडीला संवादलेखन, कथा-पटकथा लेखन, संकलन, लघुपट निर्मिती अशा विविध अंगांचं शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे व्यवसायाकडे पाहण्याचा नवा आयाम त्यांच्या मुलाखतीतून वाचकांना नक्की मिळतो.
पुस्तकाच्या मांडणीविषयी न सांगता पुढे जाणं योग्य होणार नाही. यामध्ये उद्योजकांच्या मुलाखती आहेत. परंतु या मुलाखती मांडताना त्या संवादात्मक पद्धतीने मांडल्या आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक मुलाखत वाचताना त्यात सहज गुंतत जातो. मुलाखत देणाऱ्या उद्योजकाशी डॉ. सुरेश हावरे संवाद साधतात. त्याची मांडणी नाटकाच्या संहितेप्रमाणे केल्यामुळे प्रश्न आणि उत्तर यांचं आकलन वाचकाला चांगल्या प्रकारे होऊ शकते. यात घेतलेले सर्व उद्योजक हे रोल मॉडेल होतील इतक्या महत्तेचे आहेत. यामध्ये विविध वयोगटातील उद्योजक आहेत. झी२४तास या दूरचित्रवाहिनीवरून ‘दि सुरेश हावरे बिझनेस शो’ हा उद्योजकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम प्रदर्शित झाला होता. त्या मुलाखतींचं शब्दांकन भगवान दातार यांनी उत्कृष्ट केलं आहे.
संपूर्ण पुस्तकात, प्रत्येक मुलाखतीनंतर एक मॅनेजमेंट थॉट दिला आहे, जो फारच सुंदर आहे. एका विचारात असं म्हटलंय की, ‘घर आणि मंदिर यात काय फरक आहे? दोन्ही इमारतीच तर आहेत. पण घरात भक्तीचं वातावरण असेल तर त्याचं मंदिर होतं. प्रवासात भक्ती घातली की त्याची यात्रा होते. संगीतात भक्ती ओतली की त्याचं भजन होतं. पाण्यात भक्ती मिसळली की त्याचं तीर्थ होतं. तसंच कामात भक्ती ओतली की ती सेवा होते. कोणतंही काम सेवा म्हणून करा, त्यामुळे देशाची व समाजाची सेवा केल्याचा आनंद मिळेल.’ उद्योग किंवा व्यवसाय करताना तो पैसा कमावण्यासाठी केला जातो हे तर उघड आहे. परंतु त्याचबरोबर अनेक रिकाम्या हातांना रोजगार देण्याचं पुण्यकर्मही तो उद्योग करत असतो. यामुळे समाजाला कार्यप्रवण करण्याची सेवा त्या उद्योजकाच्या हातून घडते आणि पर्यायाने देशसेवाही घडते. हा महत्त्वाचा विचार हे पुस्तक प्रत्येक उद्योजकाशी मारलेल्या गप्पांमधून देऊन जातं. ‘उद्योग करावा ऐसा’चा हाच अत्यंत महत्त्वाचा व अनुसरणीय असा ‘लसावि’ आपल्या हाती निश्चितच लागतो. तेच या पुस्तकाचं यश आहे!
‘उद्योग करावा ऐसा’
लेखक : डॉ. सुरेश हावरे
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठं : २४०
किंमत : ३०० रु.