वृत्तसंस्था, नवी दिल्ली
'बिहार आणि उत्तर प्रदेशातील जनतेमुळे मध्य प्रदेशातील स्थानिकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे,' असे वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर भाजप, संयुक्त जनता दलाने (जेडीयू) मंगळवारी जोरदार निशाणा साधला आहे. 'बिहार आणि उत्तर प्रदेशातील मेहनती लोक देशाच्या विकासासाठी योगदान देतात. मात्र, कमलनाथ यांच्या वक्तव्याने समाजात फूट पाडण्याचा काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे,' अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे. तसेच, कमलनाथ यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही (आरजेडी) नाराजी व्यक्त केली आहे.
कमलनाथ यांनी सोमवारी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 'राज्यातील अनेक उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिहार आणि उत्तर प्रदेशातील कामगार आहेत. मी त्यांच्यावर टीका करीत नाही. मात्र, त्यामुळे मध्य प्रदेशातील जनतेला रोजगार मिळत नाही. त्यामुळे ज्या उद्योगामध्ये नोकरी करणारे ७० टक्के लोक मध्य प्रदेशातील म्हणजेच स्थानिक आहेत, अशा उद्योगांना सरकारकडून सवलत दिली जाईल,' असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून गदारोळ सुरू असून, ही संधी हेरत भाजप नेत्यांनी कमलनाथ व काँग्रेसला धारेवर धरले आहे.
'स्थानिक जनतेला नोकरीत प्राधान्य देण्याचा नियम पूर्वीपासून आहे. कदाचित या नियमाची कमलनाथ यांना माहिती नाही. ते केंद्रीय मंत्रीही होते. त्यामुळे त्यांना हे नियम माहीत असायला हवे. परंतु, ते केवळ राज्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत,' असा आरोप संसदीय कार्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे. तर, 'कमलनाथ यांचा जन्म कानपूरमध्ये झाला आहे. त्यांचे शिक्षण पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. त्यांचा व्यवसाय संपूर्ण देशभरात पसरला आहे. त्यामुळे, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करू नये. बिहार, उत्तर प्रदेशच्या जनतेचे उद्योग आणि इतर क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान आहे. परंतु, काँग्रेसची दुपट्टी भूमिका आहे. त्यांनी समाजात फूट पाडण्याचे वक्तव्य करण्यापेक्षा जनतेच्या कल्याणावर भर द्यावे,' असे भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.
काँग्रेसकडून प्रत्युत्तर
दरम्यान, कमलनाथ यांच्या वक्तव्यावरून भाजप व 'जेडीयू'कडून होणाऱ्या टिकेला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले आहे. 'मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे त्यांच्या राज्यातील जनतेला रोजगार मिळवून देण्याबाबत बोलत होते. त्यामुळे, आपल्या राज्यातील जनतेला रोजगार मिळवून देण्यास बिहारमधील सरकारनेही प्राधान्य द्यायला हवे. कमलनाथ यांनी उत्तर प्रदेश व बिहारमधील जनतेच्या विरोधात कोणतेही द्वेषमूलक वक्तव्य केले नाही किंवा गुजरातमधील भाजप सरकार व महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेप्रमाणे धमकी दिली नाही. त्यांनी राज्यात रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंद्यांना सवलत देण्याची गरज व्यक्त केली आहे,' असे बिहार काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष कौकब कादरी यांनी म्हटले आहे.
कमलनाथ यांचे वक्तव्य खेदजनक आहे. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जनतेची माफी मागावी. परंतु, ही अपेक्षाच चुकीची आहे. कारण, गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांचा सहभाग असूनही काँग्रेसने अद्याप त्यावर खेद व्यक्त केला नाही.
नित्यानंद राय, भाजप प्रदेशाध्यक्ष, बिहार
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळे राज्यघटनेला धोका आहे,' असे सांगत रान उठवत आहेत. परंतु, त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते हे संघराज्य व्यवस्थेवर घाला घालत आहेत.
नीरज कुमार, प्रवक्ते 'जेडीयू'
या देशातील प्रत्येक नागरिक स्वतंत्र असून, तो कोठेही राहू शकतो आणि कोठेही काम करू शकतो. त्यामुळे, अशी वक्तव्ये टाळावीत.
भाई विरेंद्र सिंह, प्रवक्ते 'आरजेडी'
आतापर्यंत अशा प्रकारची वक्तव्ये महाराष्ट्र आणि दिल्लीतून ऐकण्यात येत होती. परंतु, आता त्यात मध्य प्रदेशही सहभागी झाले आहे.अशी परिस्थिती असेल, तर केंद्रात कुणाचे सरकार असावे, याचा निर्णय उत्तर भारतीयांनी घ्यावा.
अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री
'बिहार आणि उत्तर प्रदेशातील जनतेमुळे मध्य प्रदेशातील स्थानिकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे,' असे वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर भाजप, संयुक्त जनता दलाने (जेडीयू) मंगळवारी जोरदार निशाणा साधला आहे. 'बिहार आणि उत्तर प्रदेशातील मेहनती लोक देशाच्या विकासासाठी योगदान देतात. मात्र, कमलनाथ यांच्या वक्तव्याने समाजात फूट पाडण्याचा काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे,' अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे. तसेच, कमलनाथ यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही (आरजेडी) नाराजी व्यक्त केली आहे.
कमलनाथ यांनी सोमवारी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 'राज्यातील अनेक उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिहार आणि उत्तर प्रदेशातील कामगार आहेत. मी त्यांच्यावर टीका करीत नाही. मात्र, त्यामुळे मध्य प्रदेशातील जनतेला रोजगार मिळत नाही. त्यामुळे ज्या उद्योगामध्ये नोकरी करणारे ७० टक्के लोक मध्य प्रदेशातील म्हणजेच स्थानिक आहेत, अशा उद्योगांना सरकारकडून सवलत दिली जाईल,' असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून गदारोळ सुरू असून, ही संधी हेरत भाजप नेत्यांनी कमलनाथ व काँग्रेसला धारेवर धरले आहे.
'स्थानिक जनतेला नोकरीत प्राधान्य देण्याचा नियम पूर्वीपासून आहे. कदाचित या नियमाची कमलनाथ यांना माहिती नाही. ते केंद्रीय मंत्रीही होते. त्यामुळे त्यांना हे नियम माहीत असायला हवे. परंतु, ते केवळ राज्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत,' असा आरोप संसदीय कार्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे. तर, 'कमलनाथ यांचा जन्म कानपूरमध्ये झाला आहे. त्यांचे शिक्षण पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. त्यांचा व्यवसाय संपूर्ण देशभरात पसरला आहे. त्यामुळे, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करू नये. बिहार, उत्तर प्रदेशच्या जनतेचे उद्योग आणि इतर क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान आहे. परंतु, काँग्रेसची दुपट्टी भूमिका आहे. त्यांनी समाजात फूट पाडण्याचे वक्तव्य करण्यापेक्षा जनतेच्या कल्याणावर भर द्यावे,' असे भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.
काँग्रेसकडून प्रत्युत्तर
दरम्यान, कमलनाथ यांच्या वक्तव्यावरून भाजप व 'जेडीयू'कडून होणाऱ्या टिकेला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले आहे. 'मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे त्यांच्या राज्यातील जनतेला रोजगार मिळवून देण्याबाबत बोलत होते. त्यामुळे, आपल्या राज्यातील जनतेला रोजगार मिळवून देण्यास बिहारमधील सरकारनेही प्राधान्य द्यायला हवे. कमलनाथ यांनी उत्तर प्रदेश व बिहारमधील जनतेच्या विरोधात कोणतेही द्वेषमूलक वक्तव्य केले नाही किंवा गुजरातमधील भाजप सरकार व महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेप्रमाणे धमकी दिली नाही. त्यांनी राज्यात रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंद्यांना सवलत देण्याची गरज व्यक्त केली आहे,' असे बिहार काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष कौकब कादरी यांनी म्हटले आहे.
कमलनाथ यांचे वक्तव्य खेदजनक आहे. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जनतेची माफी मागावी. परंतु, ही अपेक्षाच चुकीची आहे. कारण, गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांचा सहभाग असूनही काँग्रेसने अद्याप त्यावर खेद व्यक्त केला नाही.
नित्यानंद राय, भाजप प्रदेशाध्यक्ष, बिहार
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळे राज्यघटनेला धोका आहे,' असे सांगत रान उठवत आहेत. परंतु, त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते हे संघराज्य व्यवस्थेवर घाला घालत आहेत.
नीरज कुमार, प्रवक्ते 'जेडीयू'
या देशातील प्रत्येक नागरिक स्वतंत्र असून, तो कोठेही राहू शकतो आणि कोठेही काम करू शकतो. त्यामुळे, अशी वक्तव्ये टाळावीत.
भाई विरेंद्र सिंह, प्रवक्ते 'आरजेडी'
आतापर्यंत अशा प्रकारची वक्तव्ये महाराष्ट्र आणि दिल्लीतून ऐकण्यात येत होती. परंतु, आता त्यात मध्य प्रदेशही सहभागी झाले आहे.अशी परिस्थिती असेल, तर केंद्रात कुणाचे सरकार असावे, याचा निर्णय उत्तर भारतीयांनी घ्यावा.
अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री