Rahul Working On Mahatma Gandhi's Dream Of Dissolving Congress: Nitin Gadkari
राहुलच करतील भारत ‘काँग्रेसमुक्त’
‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करण्यात यावा, अशी खुद्द महात्मा गांधी यांची इच्छा होती. सध्या राहुल गांधी हे त्यांच्या इच्छेनुसारच काम करीत आहेत,’ अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
Maharashtra Times24 Sep 2016, 3:00 am
वृत्तसंस्था, पणजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉमराहुलच करतील भारत ‘काँग्रेसमुक्त’
‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करण्यात यावा, अशी खुद्द महात्मा गांधी यांची इच्छा होती. सध्या राहुल गांधी हे त्यांच्या इच्छेनुसारच काम करीत आहेत,’ अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
गोव्यात भाजप आमदार आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेले गडकरी म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करण्यात यावा, असे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. त्यांना भारत ‘काँग्रेसमुक्त’ करायचा होता. राहुल गांधी यांच्यासह महात्मा गांधींचे अनेक शिष्य त्यांची स्वप्नपूर्ती करण्यात व्यग्र आहेत. सध्या गोव्यातही काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे, तेही गांधींच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावत आहेत. गोव्यामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण झाल्याचे दिसून येईल. गोव्यात आम आदमी पक्ष काँग्रेसच्या मतांमध्ये खिंडार पाडणार असल्याने भाजपलाच फायदा होणार आहे,’ अशी टीका गडकरी यांनी केली.
‘गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मी आम आदमी पक्षाला शुभेच्छा देतो; कारण त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. ‘आप’ला दहा मते मिळाली, तर त्यापैकी केवळ दोन मते ही भाजपची असतील आणि उर्वरित आठ मते काँग्रेसची असतील,’ असे गडकरी म्हणाले. गोव्यातील नाराज असलेले अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. ते माझ्या संपर्कात आहेत, असा दावा करीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्री पार्सेकर त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या युतीबाबत विचारले असता, गडकरी म्हणाले, ‘भाजप व मगोप या दोन्ही पक्षांमध्ये चांगले संबंध आहेत. युती करण्याबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक असून, या पक्षाची विचारसरणी आमच्या पक्षाशी सुसंगत आहे.’
वेलिंगकरांशी मतभेद दूर होतील
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांच्याशी असलेले मतभेद दूर होतील, अशी आशा आहे; परंतु राजकारणात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले संघाचे पद पहिल्यांदा सोडायला हवे,’ असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. ‘वेलिंगकर यांचे आमच्या धोरणात्मक निर्णयावरून काही मतभेद आहेत; परंतु त्यांच्याशी चर्चेनंतर त्यांचे मनपरिवर्तन होईल, अशी आशा आहे. संघ कधीही निवडणुका लढवत नाही आणि संघ कार्यकर्ते निवडणुकीत उतरत नाहीत. ज्यांना राजकारणात प्रवेश करायचा आहे, त्यांनी प्रथम संघपदाचा राजीनामा दिला पाहिजे,’ असे गडकरी म्हणाले.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.