If You Use Abusive Speech About Women, You Can Hit Them With A Stroke
'महिलांना अपशब्द वापरल्यास लाटण्याने मारू'
'महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या आमदारांवर सरकारकडून कारवाईची अपेक्षा राहिलेली नाही. त्यामुळे यापुढे जर कोणी महिलांबद्दल अपशब्द वापरले, तर त्यांना घरात शिरून लाटण्य़ाने नीट करू,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अकोल्यात दिला.
Maharashtra Times5 Oct 2018, 6:10 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
'महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या आमदारांवर सरकारकडून कारवाईची अपेक्षा राहिलेली नाही. त्यामुळे यापुढे जर कोणी महिलांबद्दल अपशब्द वापरले, तर त्यांना घरात शिरून लाटण्य़ाने नीट करू,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अकोल्यात दिला.
अकोले तालुका महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने अकोले येथे आयोजित महिला मेळाव्यात सुळे बोलत होत्या. माजी मंत्री मधुकरराव पिचड मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राजुरच्या सरपंच हेमलता पिचड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड, संग्राम वर्पे, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, वैशाली नागवडे, शौकत जहागीरदार उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, 'शेतकऱ्यांनी दिल्लीत शांततामय मार्गाने मोर्चा काढला होता. त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला, तर इकडे महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या आमदाराला अभय दिले जाते. असे सध्य़ाचे सरकार आहे. त्यामुळे महिलांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. साडेचार वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सध्या सर्वच क्षेत्रात नाराजीचे वातावरण असून, नोटाबंदीने तर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पतीपासून पत्नीने बचत करून ठेवलेले पैसेही महिलांना काढून द्यावे लागले आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयाने काही पिढ्यांचे नुकसान होणार आहे. महाराष्ट्रभर फिरून मी जनतेशी संवाद साधते आहे. या संवादात जनतेची हतबलता दिसून येते. आपण चुकीच्या ठिकाणी मतदान केल्याचा पश्चाताप त्यांच्यात दिसून येत आहे. डिजिटल इंडियाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडवणूक होत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे अंगठ्याचे ठसे संगणकाशी जुळत नसल्याने या नागरिकांना आधार कार्ड, रेशन, बँक कारभार यामध्ये अडचणी येत आहेत. सरकारच्या अनुदानापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. आता महाविद्यालयीन विद्यार्थीही सत्ता सोडा व सत्य बोलायला शिका अशी निर्वाणीची भाषा मोदी सरकारला करीत आहे.'
या वेळी आमदार पिचड, महिला राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष आशा पापळ यांची भाषणे झाली. पंचायत समितीच्या माजी सभापती अंजना बोंबले यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास पर्बत नाईकवाडी, भाऊपाटील नवले, रमेश देशमुख, कुमुदिनी पोखरकर, कल्पना सुरपुरीया, नंदा लोहरे, नंदा धुमाळ, अमृता कोळपकर, चंद्रकला धुमाळ उपस्थित होते. हेमलता चासकर यांनी आभार मानले.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.