म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पहिल्या पायरीवरील ९० टक्के स्तनाचा कर्करोग योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे विशीपासूनच स्तनांची स्वतपासणी करा, चाळीशीनंतर वर्षातून एकदा तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या, किंचितशी गाठ असली तरी मॅमोग्राफी तपासणी करून घ्या आणि कर्करोगाचे निदान झालेच तर न घाबरता व धीर न सोडता तातडीने उपचार सुरू करा, असा मौलिक सल्ला शल्यचिकित्सक डॉ. राजेश सावजी यांनी जागतिक स्तन कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त बुधवारी (३० ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत दिला.
पूर्वी देशातील शहरी भागांमध्ये २० महिलांपैकी एका तर, ग्रामीण भागातील ५० महिलांपैकी एका महिलेमध्ये स्तनाचा कर्करोग दिसून येत होता. त्याच काळात पाश्चात्य देशांमध्ये सहा ते सात महिलांमागे एका महिलेमध्ये स्तन कर्करोग आढळून येत होता, मात्र आता आपल्या देशामध्ये या कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे आणि सद्यस्थितीत भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग ठरला आहे. ग्रामीण भागामध्येही या कर्करोगाचे प्रमाण वाढले असून, २० ग्रामीण महिलांमागे एका महिलेमध्ये स्तन कर्करोग आढळून येत आहे. त्याचवेळी शहरी महिलांमध्ये हे प्रमाण आणखी वाढले आहे. या कर्करोगामागे अजूनही कोणतेच ठोस कारण सापडले नसले तरी स्थुलपणा, अपत्यप्राप्ती न होणे किंवा उशिरा होणे, 'पीसीओडी', अनुवंशिकता अशी काही कारणे स्तन कर्करोगाला कारणीभूत किंवा सहाय्यभूत ठरू शकतात, अशी शक्यता जागतिक स्तरावर व्यक्त होत आहे. या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असले तरी पहिल्या पायरीचा ९० टक्के स्तन कर्करोग बरा होतो, असे वैद्यकदृष्ट्या स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ पहिल्या पायरीच्या स्तन कर्करोगाचे वेळीच निदान होऊन तातडीने उपचार सुरू झाले तर, दहा वर्षांनंतरही १००पैकी तब्बल ९० कर्करुग्ण महिला गुणवत्तापूर्ण आयुष्य जगतात. त्यामुळेच लवकर निदान व योग्य उपचारांना मोठे महत्त्व आहे आणि त्यासाठीच विशीपासून महिलांनी महिन्यातून एकदा तरी स्तनांची स्वतपासणी (सेल्फ एक्झामिनेशन) करावी व चाळीशीनंतर वर्षातून एकदा तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करावी. मॅमोग्राफीमध्ये स्तन कर्करोगाचे निदान होऊ शकते व बायोप्सीतून आजाराची खात्री होते. आजाराची खात्री झालीच तर लवकरात लवकर उपचार सुरू करणे गरजेचे असते. यात शस्त्रक्रिया, किमोथेरपी व रेडिएशन असे उपचाराचे तीन पर्याय असतात. अर्थात, ९० टक्के गाठी या कर्करोगाच्या नसतात; पण चाळीशीनंतर कर्करोगाची शक्यता तुलनेने वाढत जाते, हे सर्वांनी लक्षात घेणे व सजग राहणे खूप आवश्यक ठरते, असेही डॉ. सावजी म्हणाले. स्तनाग्र आतील बाजूस ओढले गेले असतील, त्वचेत बदल दिसत असेल, स्त्राव येत असेल तर ही लक्षणे दुर्लक्षित करु नका, असेही त्यांनी सांगितले.
\B'ब्रेस्ट कॉन्झर्व्हेशन' योजनेत नाहीच
\Bस्तन कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमध्ये कर्करोगग्रस्त भाग काढला जातो व उर्वरित स्तन वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, ज्याला 'ब्रेस्ट कॉन्झर्व्हेशन' शस्त्रक्रिया म्हटले जाते. अशा शस्त्रक्रिया जगभरात वाढीस लागल्या आहेत, मात्र अशा प्रकारची 'कॉन्झर्व्हेशन' शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत होऊ शकत नाही. अशी शस्त्रक्रिया योजनेत झाली तरी त्याचा असंख्य गोरगरीब व सामान्य महिलांना लाभ होऊ शकेल, असेही मत डॉ. सावजी यांनी यानिमित्त व्यक्त केले.