'करोना'च्या दक्षतेसह टाकली विवाहाची अक्षता!
दोंडाईच्यात उपाययोजनांची माहिती देत सोहळा
म. टा. वृत्तसेवा, धुळे
जगभरात करोनाने वेढले असताना विवाह सोहळ्याची मोठी तारीख असल्याने हौसेने थाटामाटात विवाह व्हावा, या इच्छेवर आता विरजण पडले आहे. कारण, राज्य सरकारच्या आदेशानुसार कोणताही कौटुंबिक कार्यक्रम दहापेक्षा जास्त लोकांनी शिवाय घेऊ नये, असे असतानाही जिल्ह्यातील दोंडाईचा येथील आदिवासी टोकरे समाजबांधवांनी एकत्र येत सर्वांनी करोना आजाराची माहिती जाणून घेत लग्न समारंभात दाखल झालेल्या प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधून थाटामाटात विवाह सोहळा पार पाडला. याचबरोबर करोनाबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे यांच्या पुढाकाराने दोंडाईचा येथील बारकू बाबूराव मगरे यांचे चिरंजीव सुनील यांचा नंदुरबार येथील शांताराम रामदास वाघ यांची सुकन्या भावना हिच्याशी गुरुवारी (दि. १९) दोंडाईचा शहरातील विद्या कॉलनीत विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात वर-वधूसह समारंभात आलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींनी तोंडाला मास्क लावले होते, तसेच करोनाविषयी लग्नसमारंभात लावलेल्या फलकांवरून माहिती घेत आपल्या आरोग्याची आवश्यक ती काळजी घेतली होती.
दरम्यान, शुभविवाह सोहळ्यात आहेरऐवजी पाहूणे मंडळींना करोना विषाणूपासून वाचण्यासाठी मास्क वाटप करण्यात आले होते. सर्व पाहुणे मंडळीना तोंडावर मास्क लावून मंडपात प्रवेश देण्यात आला. तसेच करोना विषाणूपासून कसे वाचता येईल यासंदर्भात शानाभाऊ सोनवणे व सुनिता सोनवणे यांनी हँडवॉशने हात कसे धुवायचे याविषयी मंडपाच्या गेटवर पाहुणे मंडळींचे हात धुवून माहिती दिली. तर जेवणाच्या वेळी मंडपात सॅनिटायझरने हात साफ करून सर्व वऱ्हाडी मंडळींना जेवणास बसविण्यात आले. या लग्न समारंभात नवरी मुलीकडून किंवा नवरदेव मुलाकडून कुठलाही हुंडा न घेता, विनाआहेर घेणे-देणे, नारळ, खोबरा वाटी न देता समाजात साध्या सोप्या पद्धतीने शुभविवाह समारोह करून एक आदर्श विवाह करण्यात आला आहे. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, शिक्षणाधिकारी डी. एल. साळुंखे, विठ्ठलसिंह गिरासे, पवन सोनवणे, वासुदेव चित्ते, गिरीश देसले, राजेंद्र कोळी, तानभाऊ सोनवणेसह नवरी मुलगी व नवरदेव मुलाकडील नातेवाईक मंडळी उपस्थित होते.