म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळीसह शहरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पवारांनी 'तुम्ही एकटे नसून, तुमच्या मागे सर्व महाराष्ट्र उभा आहे', अशा शब्दांत दिलासा दिला. चिखली आणि आंबेवाडीतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडे सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. पूरग्रस्तांना कर्जमाफी करुन त्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीचा पाठपुरावा केंद्र आणि राज्य सरकारकडे केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
पूरग्रस्त पाहणीसाठी दोन दिवस पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. बुधवारी पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यापूर्वी दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिग येथे त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन केले. त्यानंतर चिखली, आंबेवाडी, वरणगे पाडळीसह शाहूपुरीतील कुंभार गल्ली, बापट कँप परिसराची पाहणी केली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार पी.एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, करवीर पंचायत समिती सभापती राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
आंबेवाडी येथील मारुती मंदिरात त्यांनी पूरग्रस्तांशी चर्चा केली. सध्या पुरग्रस्त कुठे राहतात, किती घरे पडली, याची त्यांनी माहिती घेतली. आंबेवाडीचे यापूर्वीच पुनर्वसन झाले असताना त्या ठिकाणी जायला कोणती अडचण आहे याची विचारणा केली. यावेळी सरपंच सिकंदर मुजावर यांच्यासह ग्रामस्थांनी, पुनर्वसन झाले आहे, त्या ठिकाणी विजेची सोय नाही. प्रॉपर्डी कार्डला नावे नसल्याने बँकांचे कर्ज मिळत नसल्याचे सांगितले. त्यानंतर चिखली,वरणगे पाडळीतील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. 'पुनर्वसन झालेल्या ठिकाणी तुमची वास्तव्याची तयारी असेल तर आम्ही सरकारकडे मागणी करु,' असे पवार यांनी सांगितले.
पवार यांनी तिन्ही गावातील ऊस शेती, जनवारांची माहिती घेतली. बहुतांशी ऊस पाण्याखाली गेला असल्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांची टीम येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ४० हजार एकरांत तयार केलेल्या उसाच्या बियाणाचाही वापर करता येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चिखलीत पवार यांनी सरपंच उमा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य एस.आर.पाटील, पोलिस पाटील अरुण दळवी यांच्याशी चर्चा केली. वरणगे पाडळी येथे सरपंच अनिता कांबळे, सदस्य शिवाजी गायकवाड, शिवाजी पाटील, पोलिस पाटील महादेवी कांबळे उपस्थित होते.
...
चौकट
कुंभार समाजाची
कर्जमाफीची मागणी
शाहूपुरी कुंभार गल्ली येथे पवार यांनी स्थानिक नागरिक व उद्योजकांशी चर्चा केली. बापट कॅम्प येथे कुंभार कारगिरांकडून नुकसानची माहिती घेतली. उत्सवासाठी घेण्यात आलेले बँकेचे कर्ज माफ व्हावे, अशी मागणी यावेळी कुंभार समाजाने केली. यावेळी माजी महापौर मारुतराव कातवरे, तानाजी कुंभार यांच्यासह कुंभार समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.