लोगो : युवामुद्रा
Sachin.patil1@timesgroup.com
Tweet@sachinpMT
कोल्हापूर : नोकरीतील व्यस्त दिनक्रमामुळे सामाजिक कामात सहभागी होता येत नसल्याची तक्रार अनेकजण करतात. मात्र, सुनील दळवी या तरुणाने एसटी महामंडळातील नोकरी सांभाळत सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला. कोल्हापुरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत केलेल्या मदतकार्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्याला नुकतेच पुण्यात पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक कार्यात योगदान देण्याची इच्छा असलेल्या तरुणाईसाठी सुनीलचे काम प्रेरणादायी आहे.
सुनील हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे मुळगाव राधानगरी तालुक्यातील दुबळेवाडी-वाकीघोल आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण गावात झाले. माध्यमिक शिक्षणाची गावात सुविधा नसल्याने त्याने कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्याने बारावी भवानी मंडपातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये पूर्ण केली. त्यानंतर पेठवडगावमधून त्याने डीटीएड अभ्यासक्रम पूर्ण केला. शिवाजी विद्यापीठातून कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र सैनिक भरतीत त्याला यश आले नाही.
ॉएसटी महामंडळात लिपिक पदावर रुजू झाल्यानंतर त्याने सामाजिक कामात हिरीरीने सहभाग घेतला. सुरवातील शहरातील व्हाइट आर्मी संस्थेबरोबर काम सुरू केले. बेवारस मृतदेहांचे दहन करणे, आपत्ती व्यवस्थापन आदी उपक्रमात त्याने सहभाग घेतला. २०१७ मध्ये सुनीलच्या गावी एक दुर्घटना घडली. विजेचा शॉक लागून झालेल्या आपत्तीवेळी मदतीत त्याने पुढाकार घेतला. शिवाजी विद्यापीठ एनसीसी भवनजवळ झालेल्या अपघातात साताऱ्यातील रुपा बलुगडे जखमी झाल्या होत्या. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याने बलुगडे यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात पोचवले. पावसाळ्यात चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याचे कामही त्याने केले आहे. स्वयंसेवक म्हणून आठवडाभर तो तिवरे गावी थांबला होता. तो दरवर्षी करुणालय संस्थेतील एड्सग्रस्त मुलांना कपडे आणि खाऊचे वाटप करतो.
शिवाजी विद्यापीठातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या मदतीने पॅरा ऑलम्पिकमध्ये सहभागी झालेल्या दिव्यांग खेळाडू आरती पाटीलला त्याने आर्थिक मदत मिळवून दिली. पूर परिस्थितीमध्ये आंबेवाडी, चिखली गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात त्याने योगदान दिल्याबद्दल एस. टी. महामंडळाच्यावतीने त्याचा पुण्यात सत्कार करण्यात आला.
युवकांनी सामाजिक भान ठेवून अपघातस्थळी, आपत्तीवेळी प्रसंगावधान दाखवून मदतीचा हात द्यावा. नोकरी सांभाळत सामाजिक कामात योगदान देता येते. तरुणांनी सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी पुढे यायला हवे.
- सुनील दळवी, लिपिक, एस. टी. महामंडळ