म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांतल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्रात प्रदेश भाजपच्या नेत्यांनी चिंतन बैठका सुरू केल्या आहेत. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांपैकी केवळ राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव होईल, असे आडाखे प्रदेश भाजपच्या नेत्यांनी मांडले होते. परंतु तीनही राज्यातले भाजपचे सरकार गेल्यामुळे प्रदेश भाजपच्या नेत्यांचे डोळे उघडले आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या उत्तर भारतातील तीन राज्ये हातातून गेल्यामुळे भाजपने आता दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कशा जागा वाढविता येतील, याची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील प्रदेश भाजपच्या नेत्यांची दोन दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बैठक घेतली. यात महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत माहिती घेतली. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होत आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष परस्परांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीत युती केली नाही तर राज्यातील लोकसभेच्या जागांचे चित्र काय असेल, याबाबतही मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला आहे.
राज्यातील भाजपच्या खासदारांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण करून घेतले. त्यात अनेक खासदारांची कामगिरी चांगली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे काही खासदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रातील भाजप सरकारवर होणाऱ्या आरोपांना कसे प्रत्युत्तर द्यायचे, याची रणनीती पक्षाच्या या बैठकीमध्ये ठरविली आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलासा दिला आहे. तरीही काँग्रेसकडून आरोप होत आहेत. त्यामुळे या आरोपांना उत्तर देण्यासाठी देशातील प्रमुख शहरांमध्ये भाजप नेत्यांच्या पत्रकारपरिषदा होणार आहेत. यातून काँग्रेसने केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचे भाजपने ठरविले आहे.