शाळाबाह्य तसेच, शाळेत अनियमितपणे येणाऱ्या मुलांना शाळेकडे वळविण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, त्याअंतर्गत गेल्या तीन महिन्यांत ५८० मुले शाळेत दाखल झाली आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या 'बालरक्षक' या नव्या संकल्पनेला मुंबई शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेसाठी शिक्षकांनीही आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद दिला असून, २४५ शिक्षकांनी मोहिमेसाठी नोंदणी केली आहे.
Maharashtra Times24 Oct 2018, 1:59 pm
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम५८० विद्यार्थी पुन्हा शाळेकडे
नव्या संकल्पनेला मुंबई शहरात चांगला प्रतिसाद
-शाळाबाह्य मुलांच्या हाती पुन्हा वही-पेन -२४५ शिक्षकांचीही मोहिमेसाठी नोंदणी
शाळाबाह्य तसेच, शाळेत अनियमितपणे येणाऱ्या मुलांना शाळेकडे वळविण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, त्याअंतर्गत गेल्या तीन महिन्यांत ५८० मुले शाळेत दाखल झाली आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या 'बालरक्षक' या नव्या संकल्पनेला मुंबई शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेसाठी शिक्षकांनीही आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद दिला असून, २४५ शिक्षकांनी मोहिमेसाठी नोंदणी केली आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी राज्यातील नागरिकांपासून अधिकाऱ्यापर्यंत कोणतीही व्यक्ती 'बालरक्षक' बनून या मुलांच्या शिक्षणात योगदान देऊ शकणार आहे. यासाठी राज्यभरात ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेस मुंबईतील अनुदानित शाळांतील शिक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत शिक्षण निरीक्षक पश्चिम विभागाने गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयात बालरक्षक चळवळ कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेस मुंबईतील अनुदानित शाळांमधील ३८९ शिक्षक उपस्थित होते. शिक्षण उपनिरीक्षक अनिल गुंजाळ यांनी मुंबईतील बालरक्षक चळवळीविषयी मार्गदर्शन केले. सहायक कार्यक्रम अधिकारी आत्माराम भेंडेगावकर यांनी या कार्यशाळेचा उद्देश उपस्थित बालरक्षकांना समजवून सांगितला. या मोहिमेतील विशेष प्रशिक्षण, शिक्षण हमी कार्ड, सतत गैरहजर विद्यार्थ्यांचा पंचनामा कसा केला जातो, शाळा व्यवस्थापन समितीचा मोहिमेत सहभाग कसा असतो आदींची माहिती समन्वयक वैशाली शिंदे यांनी दिली.
राज्याच्या विविध भागांत शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अद्यापही खूप जास्त आहे. मध्यंतरी शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून शाळाबाह्य मुलांची राज्यातील संख्या पुढे आली होती. मुंबईतही हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विविध ठिकाणी राहणारी स्थलांतरितांची मुले, झोपडपट्टी, रस्ता, सिग्नल आदी ठिकाणी राहणारी मुले यांच्यापर्यंत पोहचून बालरक्षकांनी या मुलांच्या हाती पुन्हा वही-पेन दिल्याची माहितीही वैशाली शिंदे यांनी दिली. बालरक्षक म्हणून नोंदणी करायची असेल अशा शिक्षकांसाठी शालेय शिक्षण विभागाने संकेतस्थळ सुरू केले असून, यावर ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
मटा भूमिका
स्तुत्य उपक्रम
आपल्या देशात कायद्याने शिक्षणाचा हक्क दिला आहे. मात्र, तो सर्वांनाच मिळतो असे नाही. विविध कारणांमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांना पुन्हा शाळेकडे नेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यामध्ये अधिकाधिक शिक्षक, जबाबदार नागरिकांनी सहभागी होऊन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याच्या शासनाच्या या प्रयत्नाला आपला हातभार लावावा.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.