Environmental Policy Not Mentioned In Bjp Election Manifesto
पर्यावरणाचा भाजपला विसर
विदेशात भारताकडून पर्यावरणाचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले जात असताना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जाहीरनाम्यात मात्र पर्यावरणाचा विसर पडल्याची टीका होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स18 Oct 2019, 6:11 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: विदेशात भारताकडून पर्यावरणाचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले जात असताना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जाहीरनाम्यात मात्र पर्यावरणाचा विसर पडल्याची टीका होत आहे. विकासासोबत पर्यावरण जपण्यासाठी काय उपाययोजना असतील, याचा उल्लेख यात नसल्याने पर्यावरणप्रेमी मुंबईकर मतदारांमध्ये नाराजी आहे. त्याचवेळी काँग्रेस-एनसीपीच्या शपथनाम्यामध्ये पर्यावरणावर भर द्यावा लागेल, असे नमूद करण्यात आले आहे. शिवसेनेच्या जाहीरनाम्यातही पर्यावरणीय मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
'वातावरण' या संस्थेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये हवेचे प्रदूषण नसल्याचा मुद्दा मांडला आहे. भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी पहिली १८ शहरे ही महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या विषयावर भाष्य करणे अपेक्षित होते. मात्र हवा, वायू किंवा प्रदूषण असे शब्द यात शोधूनही सापडत नाहीत, असे मत वातावरण संस्थेचे संस्थापक आणि संचालक भगवान केसभट यांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने हवेची गुणवत्ता उंचावणे, हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी कृतीशील पावले उचलणे, ग्रीन इंडिया-क्लीन इंडियाचा उल्लेख त्यांच्या जाहीरनाम्यात केला आहे. वनीकरण वाढवण्यावर यामध्ये आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या आरे प्रश्नी किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रकल्पांबद्दल होत असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर यात स्पष्ट उल्लेख नाही.
शिवसनेच्या जाहीरनाम्यात स्वच्छता आणि पर्यावरण या मुद्द्यांचा समावेश आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण, जलप्रदूषण टाळण्यासाठी एसटीपी, कांदळवन संरक्षणासाठी विशेष धोरण अशी आश्वासने देण्यात आली आहेत. तसेच पडीक जमिनींवर अर्बन फॉरेस्टच्या संकल्पनेबद्दलही आश्वासन देण्यात आले आहे. मात्र सध्याच्या जंगलांच्या स्थितीबद्दल, त्याचे जतन करण्याबद्दल यात कोणताही ठोस मुद्दा नाही. तसेच मुंबईकरांसाठी सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या आरेबद्दल आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनांचा यात समावेश नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात पर्यावरणाचा मुद्दा कुठेही अधोरेखित झालेला दिसत नाही. मनसेने पर्यावरणाचा तसेच आरेचा मुद्दा त्यांच्या ब्लूप्रिंटमध्येच समाविष्ट केला आहे.
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.