- शिवाजी मंडईची इमारत धोकादायक जाहीर
- गिऱ्हाईक तुटून उपासमारीची वेळ येण्याची भीती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
क्रॉफर्ड मार्केट परिसरातील महापालिकेची छत्रपती शिवाजी मंडईची इमारत धोकादायक असल्याने यातील मासळीविक्रेत्यांना पालिकेने थेट ऐरोली नाका येथे जाण्याचे फर्मान नोटिशीद्वारे काढले आहे. यामुळे कोळी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण असून, ऐरोलीला गेल्यास मासे घेणारे गिऱ्हाईक तुटेल व उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होऊन उपासमारीची वेळ येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयाविरुद्ध मासळीविक्रेत्यांनी १ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
कोळी महिला वर्षानुवर्षे घाऊक मच्छीविक्रेत्यांकडून, तर कधी ससून गोदी कुलाबा आणि कसारा गोदी, भाऊचा धक्का येथून मासळी विकत घेतात आणि किरकोळ पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज मंडईत विक्री करतात. मुंबईतील वैयक्तिक ग्राहकांपासून छोटी-मोठी हॉटेल आणि कंपन्यांतील ग्राहक हे आमचे मुख्य ग्राहक आहेत. वर्षोनुवर्षे आम्ही मच्छिमार आणि महिला मुंबईत व्यवसाय करत आहोत. ऐरोली नाका मुंबईपासून कित्येक किलोमीटर लांब आहे. तिथे गेल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. शिवाजी मंडई सोडून कोणत्याही अन्य ठिकाणी जाण्यास आमचा विरोध आहे, असे मच्छिमार नेते दामोदर तांडेल यांनी सांगितले.
...
नोटीस संभ्रम निर्माण करणारी
पालिकेच्या बाजार विभागाकडून विक्रेत्यांना आलेली नोटीस संभ्रम निर्माण करणारी आहे. नोटिशीमध्ये 'तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करणेबाबत' असे नमूद करून ऐरोली नाका येथे 'कायमस्वरूपी जागा मिळण्यासापेक्ष स्थलांतरित' असा शब्दप्रयोग केला आहे. मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाचा हा कौटुंबिक उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. बहुतांश महिलांचे याच उत्पन्नावर पूर्ण कुटुंब अवलंबून आहे. मात्र पालिका संभ्रम निर्माण करणारे शब्दप्रयोग करून कोळी महिलांना मुंबईबाहेर हद्दपार करत असल्याचा हल्ला कोळी महिलांनी चढवला आहे.