म.टा. प्रतिनिधी, नागपूर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात येणे होते. नागपुरातील रस्ते मोठे झाले, जागोजागी सीसीटीव्ही लागले. प्रत्येक रस्त्यावर पथदिवे आहेत. सिव्हिल लाइन्समध्ये तर एखाद्या पर्यटनस्थळासारखा फिल येतो. आधी मॉल होते, आता त्यात मेट्रो रेल्वेचे भर पडली. मेट्रो रेल्वेने पोलिसांना भुरळ घातली. खरच नागपूर बदलतेयं, अशा भावना हिवाळी अधिवशोनासाठी नागपुरात आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
शनिवारी हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले. या अधिवेशन बंदोबस्तासाठी बाहेरगावहून तीन हजारांपेक्षा अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी नागपुरात आले होते. शनिवारी रात्रीपासूनच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास बाहेरगावाहून आलेल्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागपुरातून कार्यमुक्त करण्यात आले. शनिवारी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मोर्चा पॉइंटवर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांनी मॉल व सीताबर्डीतील बाजारात कपड्यांची खरेदी केली. मॉल्समधील शोरुमने अनेकांना भुरळ घातील. नागपूरमध्ये स्मार्ट सिटीचा 'फिल' येत असल्याचेही अधिकारी कर्मचारी म्हणाले.
प्रत्येकाला मिठाईचे पाकिट
अधिवेशन शांततेत पार पडल्यानंतर शनिवारी रात्रीपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. दोन हजारांपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना शनिवारीच तर उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यांना रविवारी सकाळी कार्यमुक्त करण्यात आले. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार मिठाई व नमकीचे पाकिट भेट देण्यात आले.
जंगल सफारी केल्यानंतरच परतणार
नागपुरात आल्यानंतरच जंगल सराफी करणार नाही, असे तर होणारच नाही. त्यामुळे काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिवेशनाची ड्युटी आटोपल्यानंतर जंगल सफारीचे नियोजन केले होते. शनिवारी रात्रीच काही पोलिस अधिकारी कर्मचारी ताडोबा तर काही पेंचकडे रवाना झाले. याशिवाय रामटेक व खिंडसी येथेही पोलिसांनी भेट दिली.