गजानन धांडे, बुलडाणा
सर्वसामान्यांच्या प्रवासाचे हक्काचे साधन मानले जाणाऱ्या एसटी बसेस भंगार झाल्याने हा सुरक्षित प्रवास धोकादायक झाला आहे. जिल्ह्यातील ही परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात राज्यात सारखीच आहे.
बुलडाणा विभागात बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव-जामोद असे सात आगार आहेत. ४९१ बसेस दररोज धावतात. दीड लाख किमीचा दैनंदिन प्रवास करतात. सरासरी ३० ते ५० लाखांचे उत्पन्न महामंडळाला मिळते. अलीकडच्या काळात वेळापत्रकांमधील त्रुटी या गौण बाबी झाल्या असल्या तरी बसेसच्या ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यातच बस नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांचा वैताग होतोय. गेल्या चार महिन्यांत स्टेअरिंगचा रॉड तुटणे, अचानक बस खराब होणे यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.
खिळखिळ्या झालेल्या भंगार एसटी बसेसचा सर्रास वापर सुरूच असल्याने धावत्या बसचे जॉइन्ट निसटणे, टायर निखळणे, स्प्रिंग पाटा तुटणे, स्टेअरिंग जॅम होणे, वारंवार ब्रेक फेल होणे, धावत्या बसचे दरवाजे उघडणे, टायर फुटणे तर कधी बसचे स्टेअरिंग रॉड तुटून पडणे हे नित्याचे झाले आहे. अनेक बसेसच्या सीट तुटलेल्या अवस्थेत असून खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत. डिझेल गळती, ऑइल गळती, एअर गळतीसह धावती बस रस्त्यात कुठेही बंद पडत असल्याने प्रवाशांना धक्का मारावा लागत असल्याचेही चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या जीवघेण्या सेवेने कित्येक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले आहे. तर काही जायबंदी झाले आहेत. शिवशाहीच्या बसेसचे अपघात यात सर्वाधिक आहेत.
३५ बसेस स्क्रॅपमध्ये
३५ गाड्या या स्क्रॅपमध्ये दिल्याचे अधिकारी सांगतात. तर नवीन सहा गाड्या आल्या असून त्या पंढरपूर मार्गावर चालविण्यात येत आहेत. लांब पल्ल्यांवर जाणाऱ्या बसेसची थोडीफार अवस्था बरी आहे. छोट्या अंतरावरील अनेक बसेस भंगार झालेल्या आहेत. त्यामुळे लालपरीचा घायाळ दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचा सूर आहे.