म. टा. प्रतिनिधी, पुणे
विविध कारणास्तव वादग्रस्त ठरलेल्या भारतीय कला प्रसारिणी सभा संस्थेचे विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त झाले. व्यवस्थापनातील अनियमितता, विश्वस्तांमधील वाद, लेखापरीक्षण अहवाल सादर न करणे यांसारख्या कारणास्तव धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी हे आदेश दिले.
भारतीय कला प्रसारिणी सभेच्या विश्वस्त मंडळाला २००५ पर्यंत मुदत होती. त्यानंतरही ते बेकायदा पद्धतीने घटनेच्या विरोधात काम करत होते. मालमत्तेसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताविरोधात विश्वस्त सातत्याने काम करत होते. विश्वस्तांमधील दोन्ही गट आपआपसात वादविवाद करत होते. त्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले. २००५ नंतर विश्वस्तांना धर्मादाय आयुक्तांची मान्यता नसतानासुद्धा भालचंद्र पाठक यांच्यासह अन्य विश्वस्तांनी बेकायदा कारभार केला. या संदर्भात राजेंद्र बलकवडे यांनी धर्मादाय आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केली होती. बलकवडे यांच्या वतीने अॅड. यशवंत पवार यांनी गेल्या १४ वर्षांपासून खटल्याची जबाबदारी सांभाळली होती. या खटल्याचा बुधवारी निकाल देण्यात आला. अखिल भारतीय कला प्रसारिणी सभा संस्थेचे टिळक रस्त्यावरील अभिनव कला महाविद्यालय; तसेच पाषाण येथे आर्किटेक्चर कॉलेज आहे; त्याशिवाय सुमारे शंभराहून अधिक एकर एवढी जमीनदेखील संस्थेची आहे.
भारतीय कला प्रसारिणी सभा संस्थेच्या विश्वस्तांविरोधात तक्रारी होत्या. त्या तक्रारींची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्या विरोधात सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा १९५० च्या 'कलम ४१ डी'नुसार दोषारोप ठेवण्यात आले. धर्मादाय आय़ुक्तालयात या खटल्याची सुनावणी सुरू असताना विविध आदेश त्या वेळी तत्कालीन सहआयुक्तांनी दिले होते. त्या आदेशाविरोधात दोनदा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या वेळी हायकोर्टाने तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालकांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे सरकारला आदेश दिले होते. त्या निकालाचा आधार घेत धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी बुधवारी भारतीय कला प्रसारिणी सभा संस्थेचे विश्वस्त मंडळ बरखास्त केले. १४ विश्वस्तांपैकी काही विश्वस्त हे मयत आहे. या खटल्याचा १४ वर्षांनी निकाल लागला. संस्थेची १९९७ मध्ये घटना मंजूर झाली होती. त्यानंतर २००० मध्ये पहिले विश्वस्त मंडळ कार्यरत झाले, तेव्हापासून विश्वस्तांमध्ये व्यवस्थापनातील अनियमितता, लेखापरीक्षण अहवाल सादर न करणे, विश्वस्तांमधील वाद यांसारख्या कारणांमुळे हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.