त्यांच्या जन्मापूर्वीच ते सतार आणि सरोद वाजवणार, हे ठरले होते. झालेही तसेच. दोघेही आज सरोद आणि सतारवादन करीत फक्त देशभरातच नाहीत, तर जगभरात भारतीय अभिजात संगीताचा प्रसार करीत आहेत. झारखंड येथील गिरढीसारख्या छोट्या शहरात रियाज करून, ४० वर्षांपासून संगीतसाधना करणारी ही जोडी म्हणजे मनोज आणि मोरमुकुट केडिया! केडिया बंधूंनी गुरुवारी केलेल्या सरोद आणि सतारवादनाने दोन्ही वाद्यांचे सुरेल बंध पुणेकरांसमोर उलगडले. या जोडीच्या संगीत प्रवासाविषयी त्यांच्याशी आदित्य तानवडे यांनी संवाद साधला.
तुमच्या जन्मापूर्वीच तुम्ही सरोद आणि सतारवादक होणार असे ठरले होते?
- होय, ही गोष्ट अत्यंत खरी आहे. माझे वडील पं. शंभू दयाळ हे ज्येष्ठ तबलावादक पं. किशन महाराज यांचे शिष्य होते. ते उत्तम तबला वाजवायचे. एकदा माझ्या वडिलांनी उस्ताद अली अकबर खाँ साहेबांची सतार आणि सरोद ऐकली आणि ते मंत्रमुग्ध झाले. दोन मुले झाली, तर ती सतार आणि सरोद वाजवतील असा निश्चय वडिलांनी केला. त्यामुळे आमच्या जन्माआधीच आम्ही काय होणार, हे ठरले होते.
तुम्ही गेली ४० वर्षे दोघे एकत्र वादन करताहात. ही किमया कशी साधलीत?
- आमच्या गुरू अन्नपूर्णा देवी यांनी, तुम्ही आयुष्यभर एकत्र वादन करणार असाल, तरच माझ्याकडे शिका, अशी अट घातली. आज त्या या जगात नसल्या; तरी आम्ही ती अट मोडली नाही. ४० वर्षांपासून प्रत्येक मैफलीत आम्ही एकत्र वादन करीत आहोत. यापुढेही तीच परंपरा कायम ठेवू, अशी आशा आहे.
झारखंडमध्ये शास्त्रीय संगीताचा फार प्रचार होत नाही. अशा ठिकाणी संगीत साधनेला मर्यादा येत नाहीत का?
- हे खरे आहे, की झारखंडसारख्या राज्यात लोककला आणि लोकसंगीताला अधिक महत्त्व आहे. शास्त्रीय संगीताचा तिथे फार प्रचार नाही. त्यामुळे मर्यादा निश्चितच येतात; पण त्यातूनही आम्ही तेथील मुलांना संगीताचे धडे देण्याचा प्रयत्न करत आहोत. मुलांमध्ये शास्त्रीय संगीताबद्दल फारशी आस्था नाही; पण शास्त्रीय संगीताच्या चौकटीत राहून, त्यांना आवडेल, रुचेल अशा पद्धतीने वादन सादर केले, तर मुले आकर्षित होतात. आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत.
झारखंड सरकार या प्रयत्नांमध्ये मदत करते का?
- याच्या उत्तरात ५० टक्के होकार आणि ५० टक्के नकार आहे; कारण सरकारने संगीताच्या वाढीसाठी जे प्रयत्न करायला हवेत, ते कमी पडतात. मात्र, सरकार कलाकारांचा सन्मान करते. सन्मानाने प्रेरणा मिळेल; पण सन्मानास पात्र होण्यासाठी कलाकार म्हणून मोठे होणे आवश्यक आहे. त्यासाठी मूलभूत स्तरावर सरकारने प्रयत्न करायला हवेत, असे वाटते.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात तुम्ही पहिल्यांदाच सादरीकरण केले. तो अनुभव कसा होता?
- खरे सांगायचे, तर या शहरात सर्वत्र संगीत वावरते आहे, असा भास झाला. एवढ्या जाणकार रसिकांसमोर सादरीकरण करणे ही आमचीही परीक्षाच होती. आमचे वादन कसे झाले, याबद्दल सांगू शकत नाही; पण आम्हाला रसिकांकडून जे प्रेम मिळाले, ते आयुष्यभर लक्षात राहील. पुन्हा पुन्हा या महोत्सवात सादरीकरण करण्याची संधी मिळो, हीच अपेक्षा आहे.