मुख्यमंत्र्यांचा भूमिपुत्रांना खूश करण्याचा प्रयत्न
स्थानिकांवर पुन्हा आश्वासनांची बरसात
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
संरक्षण दलाच्या ताब्यातील जमिनी परत मिळविण्यासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या नेवाळीमधील ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, विकास प्रकल्पात भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही, नऊ वर्षांपासून थकबाकीसाठी लढा देणाऱ्या एनआरसी कामगारांचा प्रश्न सोडविण्याबरोबरच रिंगरूट बधितांना पुरेपूर मोबदला देऊ', अशी आश्वासनांची बरसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. आगरी कोळी भूमिपुत्रांना कोणत्याही प्रकारे भूमिहीन होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कल्याण पश्चिमेकडील फडके मैदानात आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने यंदा सुरू करण्यात आलेल्या आगरी कोळी महोत्सवाच्या समारोपाला मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, किसन कथोरे, रमेश पाटील यांच्यासह समाजाचे नेते आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
भूमीपुत्रांचे भले झाल्याशिवाय देशाचे भले होणार नाही. त्यांना भूमिहीन करून आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समृद्धीचा विचार करूनच इतरांचा विकास केला जाईल, असा विश्वास त्यांनी दिला. संरक्षण दल ही आपली गरज असून भूमिपुत्राची मागणीही रास्त आहे. यामुळे या जमिनीबाबत केंद्रीय संरक्षण दलाशी चर्चा करून यावर सुवर्णमध्य काढण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
वेळमर्यादा ओलांडली
कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्याने त्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. मात्र, त्यामुळे रात्री दहानंतरही हा कार्यक्रम सुरू होता. यामुळे साहजिकच सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगळा न्याय आणि आगरी कोळी समाजच्या व्यासपीठावर असलेल्या राजकीय नेत्यांना वेगळा न्याय का, अशी चर्च रंगली होती.