नवी दिल्ली :
'२००५ हे माझ्या क्रिकेट कारकीर्दीतील अत्यंत वाईट वर्ष होतं. केवळ माझं कर्णधारपदच हिसकावून घेण्यात आलं नाही तर टीममधूनही मला हटवण्यात आलं. आधीच्या मालिकेत शतकी खेळी करूनही मला संघात स्थान देण्यात आलं नाही. असं काही घडेल याची मी कधीही कल्पना केली नव्हती. हे सगळं माझ्या लेखी अक्षम्य आणि अस्वीकारार्ह आहे. हे रागाच्या भरातच मी लिहित आहे', अशी अनेक वर्षांची मनातली खदखद भारतीय क्रिकेटमधील 'दादा' अर्थात माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केली आहे.
'अ सेंच्युरी इज नॉट इनअफ' हे सौरव गांगुलीचं आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होत असून यात त्याने प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आणि किरण मोरे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवर सडकून टीका केली आहे.
आधीच्या मालिकेत विजय मिळवलेला असताना आणि कर्णधार म्हणून शतकी खेळी केलेली असतानाही मला कर्णधारपदावरून आणि संघातून हटवण्यात आलं. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी वागणूक अन्य कुणाला मिळाली असेल, असं मला वाटत नाही. हे सगळं प्रशिक्षक ग्रेग चॅपेल तसेच किरण मोरे यांच्या समितीने माझ्याबाबतीत केलं. हे मी कधीही विसरू शकणार नाही, अशी सल गांगुलीने या आत्मचरित्रात व्यक्त केली आहे.
ग्रेग चॅपेलसाठी माझ्यामुळेच प्रशिक्षक
२००४ मध्ये जॉन राइटचा उत्तराधिकारी कोण?, हा प्रश्न पडला होता आणि माझ्या डोळ्यापुढे सर्वात पहिलं नाव ग्रेग चॅपेल हे आलं, असे नमूद करताना माझ्या हट्टामुळे ग्रेग कसा भारतीय संघाचा प्रशिक्षक बनला याचा तपशील गांगुलीने आपल्या आत्मचरित्रात मांडला. ग्रेग चॅपेलबाबत मला सुनील गावसकर यांनी सावध केलं होतं. ग्रेगचा प्रशिक्षकपदाचा इतिहास तितकासा चांगला नाही. त्याच्यासोबत काम करणं जड जाईल, असा सल्ला त्यांनी दिला होता. ग्रेगचा भाऊ इयाननेही ग्रेग हा भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून योग्य नाही, असे सांगितले होते. मात्र, या सगळ्याकडे दुर्लक्ष करून माझ्या मनाला पटले ते मी केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सगळ्यांनाच ठाऊक आहे, असे गांगुलीने पुढे नमूद केले आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन मी माझा दबदबा निर्माण करू शकलो मात्र त्या देशातल्या एका व्यक्तीशी माझे कधीही सूर जुळू शकले नाहीत, अशी खंतही गांगुली पुढे व्यक्त करतो.
...आणि मुशर्रफ यांचा फोन खणखणला!
गांगुलीने २००४ मधील ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यातील आठवणही आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेत भारताने गांगुलीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा ३-२ अशा फरकाने पराभव केला होता. दरम्यान, भारतीय संघ लाहोरमधील पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये थांबला होता. त्याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. एका रात्री गांगुली आणि सहकाऱ्यांनी कबाब आणि तंदुरीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्वालमंडी भागात जाण्याचा बेत आखला. सुरक्षा अधिकाऱ्यांना कल्पना दिल्यास नसत्या कटकटी मागे लागतील, हे लक्षात घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास गांगुली टोपी घालून आणि चेहरा झाकून मागच्या दाराने हॉटेलबाहेर पडला. मात्र, ग्वालमंडीतील ज्या हॉटेलमध्ये गांगुली व सहकारी गेले तिथेच नेमके पत्रकार राजदीप सरदेसाई हेही आले होते. त्यांनी गांगुलीला ओळखले आणि सगळा बेत फसला. ओळख कळल्यावर हॉटेलवाल्याने बिल घेतलंच नाही शिवाय गांगुलीला चाहत्यांचाही गराडा पडला. या गराड्यातून गांगुली कसाबसा बाहेर पडला. मात्र, गांगुली व सहकारी हॉटेलमध्ये दाखल होताच पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा फोन आला. मुशर्रफ यांनी अत्यंत नम्रपणे गांगुलीशी संवाद साधला. पुढच्यावेळी हॉटेलबाहेर जायचं असेल तर सुरक्षा यंत्रणेला कल्पना देऊन जा. आम्ही आपणासाठी पुरेशी व्यवस्था करू. कृपा करून अशाप्रकारचा धोका पत्करू नका, अशी विनंती मुशर्रफ यांनी आपणास केली होती, असे गांगुलीने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
'२००५ हे माझ्या क्रिकेट कारकीर्दीतील अत्यंत वाईट वर्ष होतं. केवळ माझं कर्णधारपदच हिसकावून घेण्यात आलं नाही तर टीममधूनही मला हटवण्यात आलं. आधीच्या मालिकेत शतकी खेळी करूनही मला संघात स्थान देण्यात आलं नाही. असं काही घडेल याची मी कधीही कल्पना केली नव्हती. हे सगळं माझ्या लेखी अक्षम्य आणि अस्वीकारार्ह आहे. हे रागाच्या भरातच मी लिहित आहे', अशी अनेक वर्षांची मनातली खदखद भारतीय क्रिकेटमधील 'दादा' अर्थात माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केली आहे.
'अ सेंच्युरी इज नॉट इनअफ' हे सौरव गांगुलीचं आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होत असून यात त्याने प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आणि किरण मोरे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवर सडकून टीका केली आहे.
आधीच्या मालिकेत विजय मिळवलेला असताना आणि कर्णधार म्हणून शतकी खेळी केलेली असतानाही मला कर्णधारपदावरून आणि संघातून हटवण्यात आलं. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी वागणूक अन्य कुणाला मिळाली असेल, असं मला वाटत नाही. हे सगळं प्रशिक्षक ग्रेग चॅपेल तसेच किरण मोरे यांच्या समितीने माझ्याबाबतीत केलं. हे मी कधीही विसरू शकणार नाही, अशी सल गांगुलीने या आत्मचरित्रात व्यक्त केली आहे.
ग्रेग चॅपेलसाठी माझ्यामुळेच प्रशिक्षक
२००४ मध्ये जॉन राइटचा उत्तराधिकारी कोण?, हा प्रश्न पडला होता आणि माझ्या डोळ्यापुढे सर्वात पहिलं नाव ग्रेग चॅपेल हे आलं, असे नमूद करताना माझ्या हट्टामुळे ग्रेग कसा भारतीय संघाचा प्रशिक्षक बनला याचा तपशील गांगुलीने आपल्या आत्मचरित्रात मांडला. ग्रेग चॅपेलबाबत मला सुनील गावसकर यांनी सावध केलं होतं. ग्रेगचा प्रशिक्षकपदाचा इतिहास तितकासा चांगला नाही. त्याच्यासोबत काम करणं जड जाईल, असा सल्ला त्यांनी दिला होता. ग्रेगचा भाऊ इयाननेही ग्रेग हा भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून योग्य नाही, असे सांगितले होते. मात्र, या सगळ्याकडे दुर्लक्ष करून माझ्या मनाला पटले ते मी केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सगळ्यांनाच ठाऊक आहे, असे गांगुलीने पुढे नमूद केले आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन मी माझा दबदबा निर्माण करू शकलो मात्र त्या देशातल्या एका व्यक्तीशी माझे कधीही सूर जुळू शकले नाहीत, अशी खंतही गांगुली पुढे व्यक्त करतो.
...आणि मुशर्रफ यांचा फोन खणखणला!
गांगुलीने २००४ मधील ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यातील आठवणही आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेत भारताने गांगुलीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा ३-२ अशा फरकाने पराभव केला होता. दरम्यान, भारतीय संघ लाहोरमधील पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये थांबला होता. त्याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. एका रात्री गांगुली आणि सहकाऱ्यांनी कबाब आणि तंदुरीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्वालमंडी भागात जाण्याचा बेत आखला. सुरक्षा अधिकाऱ्यांना कल्पना दिल्यास नसत्या कटकटी मागे लागतील, हे लक्षात घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास गांगुली टोपी घालून आणि चेहरा झाकून मागच्या दाराने हॉटेलबाहेर पडला. मात्र, ग्वालमंडीतील ज्या हॉटेलमध्ये गांगुली व सहकारी गेले तिथेच नेमके पत्रकार राजदीप सरदेसाई हेही आले होते. त्यांनी गांगुलीला ओळखले आणि सगळा बेत फसला. ओळख कळल्यावर हॉटेलवाल्याने बिल घेतलंच नाही शिवाय गांगुलीला चाहत्यांचाही गराडा पडला. या गराड्यातून गांगुली कसाबसा बाहेर पडला. मात्र, गांगुली व सहकारी हॉटेलमध्ये दाखल होताच पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा फोन आला. मुशर्रफ यांनी अत्यंत नम्रपणे गांगुलीशी संवाद साधला. पुढच्यावेळी हॉटेलबाहेर जायचं असेल तर सुरक्षा यंत्रणेला कल्पना देऊन जा. आम्ही आपणासाठी पुरेशी व्यवस्था करू. कृपा करून अशाप्रकारचा धोका पत्करू नका, अशी विनंती मुशर्रफ यांनी आपणास केली होती, असे गांगुलीने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.