अ‍ॅपशहर

शेतकरी पुत्राची कमाल ! फुलकिडीपासून पिकांच्या संरक्षणासाठी जुगाड, प्रकाश सापळ्यांची निर्मिती

महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीक्षेत्र नवनव्या संकटांना तोंड देत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पूर आणि अतिवृष्टीचं संकट नेहमीचं झालंय. आता पिकांवर फुलकिडीची प्रादुर्भाव झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पंचाळा गावातील अमोल भोंगळे या तरुणानं भन्नाट उपकरण तयार केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Nov 2022, 5:40 pm
चंद्रपूर : महाराष्ट्रातील जवळपास सर्व क्षेत्रांना अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाचा फटका बसला. विदर्भ, मराठवाड्यात पावसानं शेतीचं नुकसान झालं. अतिवृष्टी, पूर आणि इतर नैसर्गिक संकटांपुढं शेतकरी हतबल झाले. काही शेतकऱ्यांनी या संकटातून देखील पीक वाचवली. फुलकिडीच्या रुपात शेतातील पिकांवर नवं संकट आलं. चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्यानं त्यातून मार्ग काढला आहे. चंद्रपुरातील एका शेतकरी पुत्राने कमाल केली आहे. फुलकिड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निळ्या प्रकाश सापळयांची निर्मिती त्यानं केली. हे सापळे फुलकिडीला रोखण्यासाठी प्रभावी ठरले आहेत. घरगुती वस्तू पासून तयार केलेल्या या सापळ्यांना आता मागणी वाढली आहे. या शेतकरी पुत्राचे नाव आहे अमोल भोंगळे. तो राजुरा तालुक्यातील पंचाळा या गावातील रहिवासी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandrapur youth farmer amol bhongale made farm light trap for prevent insects
शेतकरी पुत्राची कमाल ! फुलकिडीपासून पिकांच्या संरक्षणासाठी जुगाड, प्रकाश सापळ्यांची निर्मिती


​युवा शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी

शेतीसाठी आवश्यक नव्या नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती केली जात आहे. या तंत्रज्ञानाने शेतीत नवी क्रांती झाली. बाजारात यांची किंमत फार मोठी असते. सामान्य शेतकऱ्याचा खिशाला ते परवडणारे नसते, असे सामान्य शेतकरी आपाआपल्या परीनं जुगाड करून शेती फुलवीत आहेत. राजुरा तालुक्यातील पंचाळा या गावातील तरुण शेतकऱ्यांन असाच एक जुगाड केला हा जुगाड फुलकिड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यात परिणामकारक ठरला आहे.

​फुलकिडीमुळं शेतीचं नुकसान

चंद्रपूर जिल्ह्याला यावर्षी पावसानं झोडपून काढलं. सलग सहावळा पुराच्या पाण्याचा सामना जिल्ह्याला करावा लागला. या पुरानं शेतीचं नुकसान झालं. बळीराजाचं अतोनात नुकसान झालं. कापूस सोयाबीन पीक गेल्यावर बळीराजांन शेतात मिरची लावली. मिरची पीक फुलावर आहे. मिरची पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला. फुलकिड्यामुळ पिकांचे दरवर्षी मोठं नुकसान होतं. होणारे नुकसान टाळण्यासाठी पंचाळा गावातील तरुण शेतकऱ्यानं निळ्या सापळ्याचीची निर्मिती केली.

​कशी सुचली आयडिया

अमोल भोंगळे या युवा शेतकऱ्याचे शिक्षण अवघं बारावीपर्यंत झालं आहे. वडिलांच्या मालकीच्या दहा एकर शेतीमध्ये कापूस, सोयाबीन, मिरची पिकाची लागवड तो करत असतो. यात त्याला आई-वडिलांची मदत मिळते. यावर्षी कापूस सोयाबीन पुरामुळे भुईसपाट झालं. अमोलन तीन एकर शेतात मिरचीचे पीक लावलं आहे. फुलकिड्यांच्या प्रादुर्भावाने मिरचीचे होणारे नुकसान बघता यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे त्याने ठरवलं. यातूनच प्रकाश सापळ्याची निर्मिती झाली.

​कुणी केलं मार्गदर्शन...

प्रकाश सापळे तयार करणाऱ्या अमोल भोंगळे, देवानंद गिरसावळे व भाविक पिंपळशेंडे यांना मिरची पिकतज्ञ राहुल पुरमे यांनी मार्गदर्शन केलं. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य, तांत्रिक सहाय्य कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने पुरवलं.प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे प्रकाश सापळे आपापल्या शेतात लावले तर एकात्मिक कीड नियंत्रण होईल, घातक रसायनांचा वापर कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या खर्चात सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होईल, असं या तरुणांनी सांगितलं.

​काय आहेत प्रकाश सापळे...

कुठलाही फुलकिडा हा निळ्या रंगाकडे पटकन आकर्षित होतो. याच गोष्टीचा फायदा घेत या तरुणांनी सौरऊर्जेवर चालणारे निळ्या रंगाचे स्वयंचलित प्रकाश सापळे तयार केलेत.अगदी घरगुती वापरातल्या वस्तूचा वापर करून बनविलेल्या सापळ्यामध्ये फुलकिडे , विविध अळ्यांचे पतंग, पांढरी माशी मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. या प्रकाश सापळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे हे घरातील गोड्यातेल्याच्या पिंपापासून तयार केले असून पूर्णतः स्वयंचलित आहेत. हे सौरऊर्जेपासून चालणारे असल्याने रात्री शेतात वीज नसल्याचा फटका बसत नाही. या प्रकाश सापळ्याची रचना याप्रमाणे करण्यात आली आहे कीयामध्ये फुलकिड्यासोबतच इतरही शत्रू कीटक पटकन अडकतात. एक प्रकाश सापळा एक एकरासाठी पुरेशा असतो.

​काय म्हणाला अमोल...

रासायनिक औषधांचा वापर करूनही फुलकिडे नियंत्रणात येत नव्हते. म्हणून आम्ही फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी काही करता येतंय काय ? याचा विचार केला. फुलकिड्यांचा अभ्यास केला. तज्ज्ञांकडून माहिती घेतली. यातूनच आम्ही प्रकाश सापळ्यांची निर्मिती केली. अत्यंत कमी खर्चामध्ये याचे उत्कृष्ट रिझल्ट्स आहेत. फक्त फुलकिडेच नाही तर इतर पांढरीमाशी, अळ्यांचे पंगत सुद्धा यामध्ये अडकत आहेत, असं अमोल भोंगळे म्हणाले.

महत्वाचे लेख