अ‍ॅपशहर

‘सह्याद्री’त ३१० कोटींची परकीय गुंतवणूक; शेतकऱ्यांच्या मालकीच्या कंपनीत देशातील पहिली गुंतवणूक

आगामी काळात फळे आणि भाजीपाला उत्पादनांची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी व प्रक्रियापश्चात कचऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी बायोमास प्लान्ट आणि पॅकहाऊससारख्या पायाभूत सुविधांमध्ये कंपनीला भर टाकायची आहे. या उद्देशांसाठी या गुंतवणुकीचा फायदा होणार आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 15 Sep 2022, 9:22 am
नाशिक : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील शेतकऱ्यांच्या मालकीच्या सह्याद्री फार्म्समध्ये युरोपीय गुंतवणूकदारांकडून ३१० कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे. सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची शंभर टक्के मालकी असणाऱ्या सह्याद्री पोस्ट केअर लि. या कंपनीमध्ये ही गुंतवणूक झाली आहे. देशस्तरावर शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्याचे हे पहिलेच उदाहरण असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sayadri farm
‘सह्याद्री’त ३१० कोटींची परकीय गुंतवणूक


या गुंतवणूकदारांमध्ये इंकोफिन, कोरीस, एफएमओ आणि प्रोपार्को या गुंतवणूकदारांचा समावेश आहे. ग्रामीण उद्योजकतेच्या क्षेत्रात सह्याद्रीने छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत सहकार्य सुरू ठेवले आहे. सन २०१० मध्ये दहा शेतकऱ्यांच्या एका लहान गटाने एकत्र येऊन युरोपमध्ये केलेली द्राक्षनिर्यात आज सह्याद्रीच्या रुपाने देशातील आघाडीची फळे आणि भाजीपाला निर्यात आणि प्रक्रिया करणारी कंपनी बनली आहे. आगामी काळात फळे आणि भाजीपाला उत्पादनांची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी व प्रक्रियापश्चात कचऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी बायोमास प्लान्ट आणि पॅकहाऊससारख्या पायाभूत सुविधांमध्ये कंपनीला भर टाकायची आहे. या उद्देशांसाठी या गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. गुंतवणुकीच्या या प्रक्रियेत ‘अल्पेन कॅपिटल’ने सह्याद्री फार्म्ससाठी विशेष धोरणात्मक सल्लागार म्हणून काम केले.

शेतकऱ्यांचे एकत्रीकरण करून त्यांना उद्योजकांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या विचारास प्रेरणा देणे ही सह्याद्री फार्म्सची मूळ संकल्पना आहे. प्रत्येक लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर आणि व्यावहारिक व्यवसाय बनावा या उद्देशाने आम्ही सक्षम संस्था विकसित करीत आहोत.

- विलास शिंदे, संस्थापक (शेतकरी) आणि व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स


सह्याद्री फार्म्सच्या संकल्पनेचा कृषी क्षेत्रात वैश्विक रोल मॉडेल म्हणून प्रसार व्हावा. ज्यातून शाश्वत आर्थिक परिणाम आणि ग्रामीण समुदायात सर्वसमावेशक विकास साध्य करताना शेती क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धात्मिक व्यवसाय आकाराला येईल.

- राहुल राय, पार्टनर (इंकोफिन इंडिया)


भारतातील शेतकऱ्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या एका संस्थेमध्ये झालेली ही पहिली आंतरराष्ट्रीय भांडवली गुंतवणूक आहे. संस्थेला आणखी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास आणि कृषी उद्योगाच्या पुढील वाढीसाठी ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात नक्कीच उपयुक्त ठरेल.

- मायकेल जोंगेनिल, मुख्य कार्यकारी अधिकारी, एफएमओ



या गुंतवणुकीमुळे पहिल्या टप्प्यात १५ हजार शेतकरी आधुनिक पुरवठा साखळीत प्रवेश करू शकतील. ज्यात पुनर्निर्मित शेती पद्धती आणि दर्जेदार उपकरणे उपलब्ध होतील. कीटकनाशके आणि खतांचा वापर कमी होईल. हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठीच्या ठोस उपाययोजना राबविता येतील. शून्य कचरा (झीरो वेस्ट) धोरणाची अंमलबजावणीही शक्य होईल.

- फ्रँकोइस लोम्बार्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘प्रोपार्को’


कृषी क्षेत्रातील एका शाश्वत मॉडेलसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. सह्याद्रीची वाटचाल शेतकरी ते उद्योजक बनण्याच्या एका प्रेरक कहाणीत गुंफलेली आहे. ज्यांनी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून पारंपरिक भारतीय शेतीचे रुपांतर करण्याचा दृष्टिकोन अंगिकारला आहे.

- हरी सुब्रमण्यम, भागीदार (कोरीस, भारत )

महत्वाचे लेख