अ‍ॅपशहर

Rishi Panchami 2023: ऋषिपंचमीचे व्रत का आचरतात? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व व मान्यता

Rishi Panchami 2023 in Marathi: भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. ऋषिपंचमीचे व्रताचरण, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया..

Edited byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2023, 11:01 am
भाद्रपद मुख्यत्वे करून ओळखला जातो तो गणेशोत्सवासाठी. भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे. यानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते आणि भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. ऋषिपंचमीचे व्रताचरण, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rishi Panchami Vrat 2023


ऋषिपंचमी : बुधवार, २० सप्टेंबर २०२३

भाद्रपद पंचमी प्रारंभ : मंगळवार१९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजून ४५ मिनिटे.

भाद्रपद पंचमी समाप्ती : बुधवार २० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजून १५ मिनिटे.

ऋषिपंचमीचे व्रत

भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाल्याचे मानले जाते. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे सांगितले जाते. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण करून देण्यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते.

ऋषिपंचमी पूजा मंत्र

कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:।
गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।

ऋषिपंचमीचे महत्त्व

गृहस्थाश्रमी पुरुषांसंदर्भात या व्रताची मुख्य योजना आचार प्रणालीची ओळख व्हावी आणि गृहस्थाश्रम हा आचारसंपन्न व्हावा, असा मुख्य उद्देश यामागे सांगण्यात आला आहे. कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. ऋषिपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ऋषिपंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते.

ऋषिपंचमीला याच भाज्या करतात

महाराष्ट्राप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात. ऋषिपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ (भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते.
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज