अ‍ॅपशहर

जया पार्वती व्रतारंभ: जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी

जुलै महिन्यापासून चातुर्मासारंभ झाला आहे. चातुर्मासात अनेक व्रत-वैकल्ये आचरली जातात. यातील एक मुख्य व्रत म्हणजे जया पार्वती व्रत. या व्रताचे महत्त्व काय? व्रतपूजन कसे करावे? जाणून घ्या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jul 2020, 1:27 pm
आषाढी एकादशीपासून सण-उत्सव, व्रत वैकल्याची रेलचेल असलेला चातुर्मास सुरू होतो. यंदाचा चातुर्मास विशेष असणार आहे. कारण सन २०२० मध्ये अश्विन महिना पुरुषोत्तम असल्यामुले चातुर्मास पाच महिने असणार आहे. आषाढी एकादशी झाली की, विविध व्रत-वैकल्यांना सुरुवात होते. यातील एक म्हणजे जया पार्वती व्रत. हे व्रत देवी जया यांना समर्पित असल्याचे सांगितले जाते. जया या पार्वती देवीचे प्रतिरुप असल्याची मान्यता आहे. या व्रताचे महत्त्व का, व्रतपूजन कसे करावे? जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv parvati


आषाढ शुद्ध त्रयोदशीपासून जया पार्वती व्रतांरभ होतो आणि आषाढ कृष्ण तृतीयेला या व्रताची सांगता केली जाते. यंदा ३ जुलै २०२० पासून जया पार्वती व्रतारंभ होणार आहे. या व्रताची सांगता ८ जुलै २०२० रोजी करण्यात येईल. अविवाहित आणि सौभाग्यवती महिला या व्रताचे आचरण करतात. अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे, यासाठी हे व्रत प्रामुख्याने केले जाते. तर चांगला जोडीदार मिळावा, यासाठी अविवाहिता या व्रताचे आचरण करतात. भारतातील गुजरात राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणावर केले जाते.

चातुर्मास २०२०: जीवनशैली, ऋतुचक्राशी निगडीत सात्विकतेचा काळ

जया पार्वती व्रतपूजनविधी

जया पार्वती व्रत आचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर शिव-पार्वती पूजनाचा संकल्प करावा. शिव-पार्वतींचे आवाहन करून त्यांची स्थापना करावी. शिव-पार्वतीच्या प्रतिमेवर किंवा मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक करावा. त्याच पंचामृताचा नंतर नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षता, ऋतुकालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. पार्वती देवीचे नामस्मरण, मंत्रजप करावे. जय पार्वती व्रताची कथेचे वाचन करावे किंवा कथा ऐकावी.

शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सव यंदा साध्या पद्धतीने; पाहा वेळापत्रक

जया पार्वती व्रताचे महत्त्व

आपल्याला उत्तम जोडीदार मिळावा किंवा अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, म्हणून हे व्रत प्रामुख्याने आचरले जाते. या व्रताचा संकल्प केल्यानंतर पाच, सात, नऊ, अकरा आणि २० वर्षे हे व्रत करावे, असे सांगितले जाते. खुद्द भगवान श्रीविष्णूंनी लक्ष्मी देवीला या व्रताचे महत्त्व सांगितले होते, अशी मान्यता आहे. काही ठिकाणी एका दिवसाचे तर काही ठिकाणी पाच दिवसाचे व्रत करण्याची परंपरा आहे. या व्रतामध्ये मातीचा गज (हत्ती) तयार करून त्याचेही पूजन केले जाते. व्रताची सांगता झाल्यानंतर या मातीच्या गजाचे विसर्जन केले जाते. या व्रतादिनी रात्री जागरण करून भजन-कीर्तन केले जाते. व्रत आचरल्यानंतर सात्विक आहार घेण्याचे सल्ला दिला जातो. व्रताची सांगता करताना पूजन केल्यानंतर उपवास सोडावा, असे सांगितले जाते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज