माघ पौर्णिमा, शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री...
फेब्रुवारी महिन्याची सुरुवात माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथ सप्तमीपासून झाली. यानंतर जया एकादशी, माघ पौर्णिमा, श्री गजानन महाराज प्रकट दिन, दास नवमी, दयानंद सरस्वती जयंती, विजया एकादशी, महाशिवरात्री आणि रामकृष्ण जयंती असे अनेक सण-उत्सव, दिनविशेष आहेत. फेब्रुवारी महिन्यात दोन एकादशी येत असल्यामुळे हा महिना खास आहे. जाणून घेऊया दिनांक आणि महत्त्व...
जया एकादशी (बुधवार, ५ फेब्रुवारी)
माघ मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला जया एकादशी साजरी केली जाते. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी एकादशी सुरू होत आहे. जया एकादशीच्या व्रताने दुःख, दारिद्र्य दूर होऊन धनलाभ, संपन्नता, समृद्धी प्राप्त होते, असे म्हटले जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला जया एकादशीचे व्रत सांगितले होते, अशी आख्यायिका आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.
माघ पौर्णिमा (रविवार, ९ फेब्रुवारी)
माघ महिन्यातील पौर्णिमेला हिंदू शास्त्रात अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या पौर्णिमेला देवता पृथ्वीवर येऊन गंगा स्नान करतात, अशी आख्यायिका आहे. गंगा स्नान केल्यामुळे पापमुक्ती, मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते. या दिवशी माघस्नान समाप्ती होते. संत रविदास यांच्या जयंती माघ पौर्णिमेला साजरी केली जाते. गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक अशा मंगेशी मंदिरात रथयात्रा प्रारंभ होते.
गजानन महाराज प्रकट दिन (शनिवार, १५ फेब्रुवारी)
माघ शुद्ध सप्तमीला श्री गजानन महाराज शेगाव येथील नागरिकांच्या प्रथम दृष्टीस पडले. यानंतर या दिवशी गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. इंग्रजी कॅलेंडरनुसार, तो दिवस होता २३ फेब्रुवारी १८७८. गजानन महाराजांवर श्रद्धा असणारे हजारो भाविक गजानन महाराज प्रकट दिनी शेगाव येथे जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतात. यावर्षी गजानन महाराज प्रकट दिन शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.
श्री रामदास नवमी (सोमवार, १७ फेब्रुवारी)
माघ महिन्यातील वद्य नवमीला समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या नवमीला श्री रामदास नवमी किंवा दास नवमी म्हटले जाते. यंदा सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दास नवमी साजरी करण्यात येईल. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. संपूर्ण महाराष्ट्रात दास नवमी साजरी केली जाते. रामदास स्वामींवर श्रद्धा असणारे भाविक सज्जनगड, शिवथरघळ येथे जाऊन समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतात. दासबोध, मनाचे श्लोक याचे पठण या दिवशी केली जाते.
महर्षी दयानंद सरस्वती जयंती (मंगळवार, १८ फेब्रुवारी)
स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. स्वामीजींचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव करशनजी लालजी तिवारी आणि मातेचे नाव यशोदाबाई होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन करून सामान्य माणसाला अमोघ ज्ञान दिले. स्वामीजींना आधुनिक भारताचे महान चिंतक म्हटले जाते. ते थोर समाज सुधारक आणि देशभक्त होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बुधवार, १९ फेब्रुवारी)
स्वराज्याची निर्मिती करणारे, जाणता राजा म्हणून ओळख असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. ही जयंती तारखेप्रमाणे साजरी केली जाते. महाराजांनी निर्माण केलेल्या गडांवर जाऊन शिवभक्त तरुण मोठ्या प्रमाणावर ही जयंती साजरी करतात. एखाद्या सणाचे स्वरूप या दिवसाला आहे. स्वराज्य मिळवण्यासाठी आणि तरुणांची शक्ती एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू केली. या दिवशी विजया एकादशीदेखील साजरी केली जाते. याच दिवशी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची पुण्यतिथी असून, सौर वसंत ऋतू प्रारंभ होत आहे.
महाशिवरात्री (शुक्रवार, २१ फेब्रुवारी)
माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या महिन्याच्या २१ तारखेला, शुक्रवारी महाशिवरात्री आहे. तसे पाहायला गेल्यास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र असते. मात्र, माघ कृष्ण चतुर्दशीला शिवाचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता, अशी मान्यता असल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी शिवपूजन केले जाते. मंदिरात जाऊन भाविक शंकराचे दर्शन घेतात. या दिवशी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्ये केली जातात.