अ‍ॅपशहर

Shree Swami Samarth Story In Marathi स्वामी समर्थांची शिकवण : ज्ञान, विद्वत्तेसह श्रद्धा आणि विश्वास हवा

स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, बोध, उपदेश कालातीत आहेत. चुकीच्या दांभिक गोष्टींना स्वामी कधीही थारा देत नसत. एका प्रसंगात स्वामींनी चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढतानाच समाजाला उपयुक्त शिकवणही दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2020, 1:59 pm
हम गया नही जिंदा है या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य लिहिलं, ऐकलं, वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते अन विस्कटलेलं कामही योग्य मार्गी लागते.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय वचनाने तर सर्व भीतीच संपवली आहे, अशी अनेक स्वामी भक्तांची भावना आहे. आजही कोट्यवधी भाविकांना स्वामींचे अनेक अनुभव येत असतात. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, बोध, उपदेश कालातीत आहेत. चुकीच्या दांभिक गोष्टींना स्वामी कधीही थारा देत नसत. अशाच एका प्रसंगात स्वामींनी चुकीच्या गोष्टींवर ताशेरे ओढतानाच समाजाला उपयुक्त शिकवणही दिली. नेमके काय घडले? जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shree swami samarth maharaj


देवाकडे मागणे मागायची योग्य पद्धत कोणती? रामदास स्वामी म्हणतात...

पुराणिकबुवा नावाजलेले प्रबोधनकार होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता. आपले ज्ञान अफाट आहे, अशी स्वामींना प्रचीती यावी, अशी त्यांची इच्छा होती. स्वामी स्वतःहून, त्यांना आमच्यासमोर कीर्तन करा, असे निमंत्रण देतात. पुराणिक बुवा कीर्तन सुरु करतात. मानवी जीवनात चार पुरूषार्थ असतात. 'धर्म अर्थ काम मोक्ष'. यात मोक्षाचे महत्व फार असते. कारण मोक्षच आपल्याला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो. मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते. निपुत्रीकाला गती मिळत नाही, असे सांगत असताना एकाएक स्वामी एकदम संतापून भडकतात. बंद कर तुझी वटवट! अरे असे असत्य वचन सांगून तू लोकांची दिशाभूल करत आहेस. नारद, शुकाचार्य, भीष्माचार्य हे सर्व निपुत्रिक होते. त्यांना काय उत्तम गती मिळाली नाही? तुझ्या कीर्तनानी लोकं पुत्र प्राप्तीलाच आपले ध्येय समजतील. ज्याचं वर्तनच वाईट आहे, पण अनेक पुत्र आहे, त्याला काय गती मिळणार? मोक्ष मिळतो तो अनन्य भावांनी ईश्वर भक्ती करणाऱ्यांना, सदाचरण आचारणाऱ्यांना, परोपकार करणाऱ्यांना. आमचीच चूक झाली जे आम्ही तुला इथे बोलावले. कीर्तन बंद पडते.

तब्बल १६ खटले जिंकून बांधले आधुनिक युगातील दक्षिणेश्वर मंदिर

पुराणिक बुवा संतापतात. दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा स्वामींना जाब विचारायला येतात. स्वामी निद्राग्रस्त असतात. स्वामींना मऊ गादीवर झोपलेले पाहून पुराणिक बुवांना प्रश्न पडतो की, स्वामी संन्यासी असून गादी वर कसे काय झोपतात? पुराणिक बुवा परततात. दुसऱ्या दिवशी पुराणिक पुन्हा येतात, तेव्हा स्वामी कुठेतरी जायच्या तयारीत असतात. पुराणिक म्हणतात की, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. स्वामी म्हणतात की, आम्हाला वेळ नाही. आम्ही शेजारच्या गावातल्या टेकरीवरच्या मंदिरात आहोत. पुराणिक बुवा स्वामींसोबत जातात.

खरी भक्ती म्हणजे नेमके काय? स्वामी समर्थ महाराज म्हणतात...

टेकडीच्या पायथ्याशी पोहोचता-पोहोचता रात्र होते. पुराणिक बुवा फार दमतात. हाडे गारठतील अशी थंडी त्यांना बेचैन करते. स्वामींना गावात कुठेतरी मुक्काम करू, अशी विनंती ते स्वामींना करतात. यावर स्वामी म्हणतात की, आम्ही कुठेच जाणार नाही वाटल्यास इथे विश्रांती घेऊ. स्वामी एका खडकावर निर्विकारपणे विश्रांती घेतात. स्वामी म्हणतात की, पुराणिक किती वेळ असे उभे राहणार. त्या दुसऱ्या खडकावर जाऊन विश्रांती घे. पुराणिक त्या खडकाला स्पर्श करुन पाहतात, तो खडक थंडीमुळे बर्फाच्या शिळेसारखा बनलेला असतो. पुराणिक बुवा मनात विचार करतात की, मला अंगभर कपडे घालूनही थंडी झोंबते आहे. मात्र, स्वामी बर्फासारख्या शिळेवर विश्रांती घेत आहे. न राहून शेवटी पुराणिक बुवा स्वामींना विचारतात की, अहो, एवढ्या थंड शिळेवर तुम्ही असे निर्विघ्न कसे झोपू शकता?

स्वामी बोध : हमारी कस्तुरी लाओ; सद्कर्माची कास कधीही सोडू नये

यावर, स्वामी म्हणतात की, अरे, आम्ही संन्याशी! आम्हांला खडकावरच झोपले पाहिजे. मऊ गादीवर कशाला झोपायचे? पुराणिक बुवांना स्वामी अंतरज्ञानी असल्याची प्रचिती येते. ते स्वामींना शरण येतात. स्वामी तुम्ही असामान्य आहा. मीच तुम्हाला ओळखण्यात चूक केली. मला क्षमा करा, अशी कबुली ते देतात. स्वामी प्रेमळ शब्दात म्हणतात की, आम्हाला ओळखण्यात खूप उशीर केला पुराणिक! तुम्ही विद्वान आहात. पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याबरोबर श्रद्धा आणि विश्वासही पाहिजे. ज्याच्या ठायी हे असतात त्याचे हृदय निर्मल होते. अशा निर्मल हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो. पुराणिक बुवा प्रांजळपणे स्वीकृती देतात.

महत्वाचे लेख