हिंसा आणि अहिंसेमध्ये जास्त श्रेयस्कर काय? तर याचं उत्तर निश्चितच अहिंसा आहे. आपण अहिंसेच्या वातावरणात जगलो तर जगात शांतता नांदेल. हिंसेचा अभाव म्हणजे अहिंसा. पण जगभर सर्वत्र हिंसा बोकाळली आहे. हिंसेच्या वातावरणात सारं विश्व जगतं आहे. अशा परिस्थितीत अहिंसेची प्रतिष्ठापना करणं अत्यंत कठीण आहे.
जीवन जगण्यासाठी आपण अहिंसेचा मार्ग स्वीकारून जगू शकत नाही. जीवन जगण्यासाठी सुक्ष्म हिंसा करणं आपल्याला भाग पडतं. प्राण्यांना मारलं नाही, पिकासाठी झाडं कापली नाहीत तर आपल्याला अन्न मिळणारच नाही. तेव्हा आयुष्यात सुक्ष्म हिंसा करणं भाग आहे. जगण्यासाठी सुक्ष्म हिंसेशिवाय पर्याय नसतो. या हिंसेची गणनाही अहिंसेमध्ये होते.
आज जगातील सर्वच जीव-जंतूमध्ये हिंसा आहे. हिंसेशिवाय जगातील कोणतेच जीव-जंतू जगत नाहीत. पण आपण हे विसरतो की या सर्व जीव-जंतूंचा संबंध एका परमेश्वराशी आहे. एकाच परमेश्वराचे हे भिन्न-भिन्न अंश आहेत. या सगळ्या जगाच्या केंद्रस्थानी स्वत: भगवान श्रीकृष्ण आहेत. तेव्हा प्रत्येक कार्य भगवंताला समर्पित करून केलं पाहिजे.
आज जगात शांतता राहावी म्हणून भरपूर प्रयत्न केले जात आहेत. शांततेसाठी जगातील सर्व संघटना प्रयत्न करत आहेत. पण शांती प्रस्थापित होत नाही. सर्वत्र हिंसा होत असते. पण या हिंसेवर उपाय एकच आहे- सारं काही भगवंताला अर्पण करायचं. प्रेमभाव जगभर पसरवणं गरजेचं आहे.