अमोल पाध्ये
काल सगळी कामं आटोपून घरी निघण्याच्या तयारीत असताना दुकानासमोर एक आलिशान गाडी अत्यंत सावकाशपणे येऊन थांबली. त्यामागून एक गाडी येऊन थांबली आणि भराभर तीन जण उतरून या आलिशान गाडीचा दरवाजा उघडून द्यायला पुढे सरसावले तेव्हा लक्षात आलं, की कोणीतरी मातब्बर व्यक्ती आलेली आहे. बघतो तर, कॉलेजमधला माझा घनिष्ठ मित्र गाडीतून उतरला, जवळ आला आणि आम्ही घट्ट मिठीत कधी आलो हे कळलं देखील नाही. मला अत्यानंद झाला.
माझ्या डोळ्यासमोर जुने दिवस आले. एमबीएच्या पहिल्या सत्रात अतिशय साधासुधा मुलगा बघून आम्ही अत्यंत आश्चर्यचकीत झालो होतो. तो अत्यंत चुणचुणीत होता. टाय आणि ब्लेझरचे कलेक्शन असणाऱ्यांत तो साधे आणि स्वच्छ कपडे घालून आला होता. स्पष्टवक्तेपणा आणि अति-नास्तिकता यामुळे सगळेजण त्याच्यापासून अंतर राखत असताना मी त्याचा मित्र झालो. काही काळ चांगला गेला. विविध परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करत असतानाच कौटुंबिक विभाजनामुळे तो नैराश्येच्या गर्तेत अडकला. तिसऱ्या सत्रात तर नापास झाला. आत्महत्येचे विचार डोक्यात घोळू लागले आणि अचानक घरातून नाहीसा झाला. त्याच्या आईने अत्यंत कष्टाने त्याच्या शिक्षणासाठी बेगमी केली होती पण ते विभाजन त्याच्या पचनी पडलं नव्हतं. आईनं माझ्यासमोर पदर पसरला आणि काहीही करून शोध म्हणाली होती. माझ्या स्थानिक मित्रांच्या मदतीने त्याला शोधून काढला होता. पण, तो आधीचा राहिला नव्हता. परिस्थितीपुढे शरण गेलेला होता. आमच्या मैत्रीत फटके मारण्याची मुभा होती आणि मी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. अर्थात, शाब्दिक फटके! त्यानंतर असा काही कामाला लागला की सहाव्या सत्रात विक्री-व्यवस्थापन विषयात सुवर्णपदक मिळवेपर्यंत त्याची मजल गेली. कॅम्पसमध्येच नोकरी लागली. आता त्याच कंपनीने शोफरसह महागडी गाडी भेट दिली आहे.
बराच वेळ गप्पा झाल्यावर मला म्हणाला, मला जीव द्यावासा वाटतोय. जगणं नको झालंय. मुंबईहून निघालो तेव्हा विचार पक्का होता की घाटातून उडी घ्यावी. पण रहदारीमुळे शक्य झालं नाही आणि तुझा विचार मनात आला आणि नाशिकला आलोय. माझ्यासाठी हा धक्काच होता. सगळं सुरळीत असताना जीव का द्यायचाय हे विचारलं तेव्हा म्हणाला, कमी काळात सगळी सुखं माझ्या पायाशी लोळण घेत आहेत. कशाची कमी नाही. पण आताशा मला झोप येत नाही. गेल्या दहा-बारा वर्षांत खूप काही कमावलं आणि आता आहे त्या कंपनीचा आणि अन्य बारा कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करतानाही पुढे करायचे काय? हा प्रश्न नकोसा झाला आहे. आयुष्यात राम राहिला नाहीये. प्रकांड नास्तिक मित्र 'राम नाहीच'पासून 'राम राहिला नाही' इथपर्यंत आला.
'राम' या शब्दाची किमया न्यारी आहे. रम म्हणजे रमणे, तर रम या धातूला काना लावून म्हणजे त्याची शक्ती वाढवून जो शब्द बनतो तो म्हणजे राम…रमण्याची आत्यंतिक जास्त किंवा शेवटची अवस्था, म्हणजे 'राम'. आपण म्हणतो की त्या गोष्टीत काही राम नाही, म्हणजेच तेथे रमण्यासारखे काही नाही. जीवनात रमण्याचा मार्ग म्हणजे राम. 'राम' मध्ये काय नाही? सगळं काही आहे. जीवांची सूक्ष्म सुरुवात ते सर्जन ते ऱ्हास या सर्वांतील एक एक घटक म्हणजे राम! सर्जन-रक्षण-संहार-सर्जन हे सगळं म्हणजेच राम. सर्वत्र राम-तत्त्व असे व्याप्त आणि चिरंतन आहे. सगळं काही आहे. पण तरीही काही नाही म्हणजेच राम नाही. आयुष्यातले चढउतार नाहीसे झाले की कसा भेटेल राम!
मी त्याला एकच सांगितलंय, रामाचा मार्ग हा श्रद्धेचा मार्ग आहे आणि श्रद्धा धैर्याची गोष्ट आहे. कमकुवत लोकांचे ते काम नाही. जीवनात राम हवा असेल तर धीराचा हो! योग्य तो मार्ग निवड! आता तो काळाराम मंदिरात असतानाच हा माझा लेखप्रपंच!
काल सगळी कामं आटोपून घरी निघण्याच्या तयारीत असताना दुकानासमोर एक आलिशान गाडी अत्यंत सावकाशपणे येऊन थांबली. त्यामागून एक गाडी येऊन थांबली आणि भराभर तीन जण उतरून या आलिशान गाडीचा दरवाजा उघडून द्यायला पुढे सरसावले तेव्हा लक्षात आलं, की कोणीतरी मातब्बर व्यक्ती आलेली आहे. बघतो तर, कॉलेजमधला माझा घनिष्ठ मित्र गाडीतून उतरला, जवळ आला आणि आम्ही घट्ट मिठीत कधी आलो हे कळलं देखील नाही. मला अत्यानंद झाला.
माझ्या डोळ्यासमोर जुने दिवस आले. एमबीएच्या पहिल्या सत्रात अतिशय साधासुधा मुलगा बघून आम्ही अत्यंत आश्चर्यचकीत झालो होतो. तो अत्यंत चुणचुणीत होता. टाय आणि ब्लेझरचे कलेक्शन असणाऱ्यांत तो साधे आणि स्वच्छ कपडे घालून आला होता. स्पष्टवक्तेपणा आणि अति-नास्तिकता यामुळे सगळेजण त्याच्यापासून अंतर राखत असताना मी त्याचा मित्र झालो. काही काळ चांगला गेला. विविध परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करत असतानाच कौटुंबिक विभाजनामुळे तो नैराश्येच्या गर्तेत अडकला. तिसऱ्या सत्रात तर नापास झाला. आत्महत्येचे विचार डोक्यात घोळू लागले आणि अचानक घरातून नाहीसा झाला. त्याच्या आईने अत्यंत कष्टाने त्याच्या शिक्षणासाठी बेगमी केली होती पण ते विभाजन त्याच्या पचनी पडलं नव्हतं. आईनं माझ्यासमोर पदर पसरला आणि काहीही करून शोध म्हणाली होती. माझ्या स्थानिक मित्रांच्या मदतीने त्याला शोधून काढला होता. पण, तो आधीचा राहिला नव्हता. परिस्थितीपुढे शरण गेलेला होता. आमच्या मैत्रीत फटके मारण्याची मुभा होती आणि मी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. अर्थात, शाब्दिक फटके! त्यानंतर असा काही कामाला लागला की सहाव्या सत्रात विक्री-व्यवस्थापन विषयात सुवर्णपदक मिळवेपर्यंत त्याची मजल गेली. कॅम्पसमध्येच नोकरी लागली. आता त्याच कंपनीने शोफरसह महागडी गाडी भेट दिली आहे.
बराच वेळ गप्पा झाल्यावर मला म्हणाला, मला जीव द्यावासा वाटतोय. जगणं नको झालंय. मुंबईहून निघालो तेव्हा विचार पक्का होता की घाटातून उडी घ्यावी. पण रहदारीमुळे शक्य झालं नाही आणि तुझा विचार मनात आला आणि नाशिकला आलोय. माझ्यासाठी हा धक्काच होता. सगळं सुरळीत असताना जीव का द्यायचाय हे विचारलं तेव्हा म्हणाला, कमी काळात सगळी सुखं माझ्या पायाशी लोळण घेत आहेत. कशाची कमी नाही. पण आताशा मला झोप येत नाही. गेल्या दहा-बारा वर्षांत खूप काही कमावलं आणि आता आहे त्या कंपनीचा आणि अन्य बारा कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करतानाही पुढे करायचे काय? हा प्रश्न नकोसा झाला आहे. आयुष्यात राम राहिला नाहीये. प्रकांड नास्तिक मित्र 'राम नाहीच'पासून 'राम राहिला नाही' इथपर्यंत आला.
'राम' या शब्दाची किमया न्यारी आहे. रम म्हणजे रमणे, तर रम या धातूला काना लावून म्हणजे त्याची शक्ती वाढवून जो शब्द बनतो तो म्हणजे राम…रमण्याची आत्यंतिक जास्त किंवा शेवटची अवस्था, म्हणजे 'राम'. आपण म्हणतो की त्या गोष्टीत काही राम नाही, म्हणजेच तेथे रमण्यासारखे काही नाही. जीवनात रमण्याचा मार्ग म्हणजे राम. 'राम' मध्ये काय नाही? सगळं काही आहे. जीवांची सूक्ष्म सुरुवात ते सर्जन ते ऱ्हास या सर्वांतील एक एक घटक म्हणजे राम! सर्जन-रक्षण-संहार-सर्जन हे सगळं म्हणजेच राम. सर्वत्र राम-तत्त्व असे व्याप्त आणि चिरंतन आहे. सगळं काही आहे. पण तरीही काही नाही म्हणजेच राम नाही. आयुष्यातले चढउतार नाहीसे झाले की कसा भेटेल राम!
मी त्याला एकच सांगितलंय, रामाचा मार्ग हा श्रद्धेचा मार्ग आहे आणि श्रद्धा धैर्याची गोष्ट आहे. कमकुवत लोकांचे ते काम नाही. जीवनात राम हवा असेल तर धीराचा हो! योग्य तो मार्ग निवड! आता तो काळाराम मंदिरात असतानाच हा माझा लेखप्रपंच!