अ‍ॅपशहर

तीन वाण्यांची गोष्ट

बालपणातच साधुवाणी भेटले. वडिलांनी घरात धर्मकार्य काढले होते. त्यासाठी ते आले होते. माझ्या शेजारी बसत त्यांनी माझी विचारपूस केली. ‘तुझ्या वडिलांनी हे एक बरिक केलं.’ असे ते म्हणाले.

Maharashtra Times 25 Sep 2017, 12:58 am
बालपणातच साधुवाणी भेटले. वडिलांनी घरात धर्मकार्य काढले होते. त्यासाठी ते आले होते. माझ्या शेजारी बसत त्यांनी माझी विचारपूस केली. ‘तुझ्या वडिलांनी हे एक बरिक केलं.’ असे ते म्हणाले. काही क्षण शांतता. दूरवर आईवडील आणि भटजी. त्यांना राहावलं नाही. माणूस मुलखाचा गोष्टीवेल्हाळ आणि ऐसपैस वाटला. ‘तुला सांगतो भक्तिभावानं हे केलं की देव प्रसन्न होतो. अरिष्ट टळतं. माझा रोकडा अनुभव आहेना. लग्नानंतर आम्हांला संतान नव्हतं. पूजा केली. पुढे कलावती झाली. उपवर होताच तिचा विवाह. जावई भला. त्याच्याबरोबर व्यापारास बाहेर पडलो. तो मनू पालटला. आम्ही कैदी झालो. इकडे घर चोरांनी साफ केलं. बायको, मुलगी अन्नाला मोताद झाली… पुढे अनपेक्षितपणं राजानं द्रव्य दिलं ते घेऊन आम्ही तारवातून निघालो. तो एक संन्यासी सलगीनं विचारपूस करू लागला. तारवात काय आहे म्हणून? ठोकून दिलं, ‘पाला-पाचोळा.’ पुन्हा आपत्ती आली. आम्ही जवळजवळ बुडालोच होतो… पण वाचलो… कारण काय म्हणशील तर पूजा. घरी ‘ही’नं आणि मुलीनं पूजा केली होती ना…’ ते सद्‍गदित झाले होते. आपल्या दोन्ही हातांनी चेहरा पुसत ते म्हणाले… ‘पूजा महत्त्वाची बाबा. कृपाळू देव भेटतो… पूजा…’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम story of three businessmen
तीन वाण्यांची गोष्ट

शाळेत दामलेमास्तर भेटले. ते म्हणायला सांगत, ‘तो मज गमली विभूती माझी स्फुरत चालली विश्वामाजी…’, ‘पूजितसे मी कवणाला तर मी पूजी आपणाला। आपल्यामध्ये विश्व पाहूनी पूजितसे मी विश्वाला…’

दरम्यान एकदा कुसुमचे मोठे भाऊ भेटले. ते म्हणाले, ‘माझ्या जीवनाचा मीच शिलेदार। व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी।’
काहीच कळेनासे झाले… साधुवाणी खरे की दामलेमास्तर की कुसुमचे दादा?
पुढे कॉलेजमध्ये गेलो. तिथे मर्ढेकरसर भेटले. नुकतेच इंग्लंडहून आले होते. फार बोलत नसत पण माझ्यावर मर्जी बसली. ‘तुला काय होतंय? नेहमी भांबावलेला असतोस.’ ते म्हणाले.
मी शंका सांगितली : ते साधुवाणी, दामलेमास्तर, कुसुमचे दादा… ते किंचितसे हसले. म्हणाले, ‘थांब शंका दूर करतो. आमच्याकडे एक गणपतवाणी होता. त्याच्यासंबंधी मी काहीसे लिहिलं आहे. वाच हे. किमान अंदाज येईल नेमका प्रश्न काय आहे त्याचा.’

मग म्हणाले, ‘तसं नको, तो गावाहून परत आलाय. त्याची गाठ घालून देतो.’ मी गणपतवाण्याला भेटलो. तो म्हणाला, ‘माझं बुवा त्या साधुवाण्यासारखं मुळीच नाही. तो देवावर विसंबून राह्यचा, पूजा करून त्याला प्रसन्न करून घेतो म्हणायचा. मी आपला धंदा नेकीनं करतो. बाकीचं ते काय मी चुकूनही पाहत नाही. आता हे बरिक खरं आहे की मला विडीकाडीचं व्यसन आहे. तसा मी आळशीच म्हण ना. पण एक आहे मी स्वप्नं पाहतो. पण तेवढंच स्वप्नाचं रूपांतर प्रत्यक्षात कसं होईल याचा क्षीण मी मेंदूला देत नाही. फावल्या वेळात झोपतो. उशाला ही तुकारामांची गाथा घेतो… तेव्हा तुझे प्रश्न काही मला कळत नाहीत. ही गाथा पाहिजे तर घेऊन जा बाबा!..’

मोठ्या उत्सुकतेने मी ती गाथा घेऊन घरी आलो. तर मला स्वप्नच पडले. स्वप्नात तुकाराम महाराज आणि त्यांचे गुरू बाबाजी. तुकोबा म्हणाले, ‘आता माझी गाथा तुझ्या हातात आहे तर माझे सारं आयुष्य, अनुभव आणि शिकवण तुझ्यापाशी आहे. त्यातला माझा परखडपणा बाजूला ठेव आणि मी सांगितलेलं नेमकं मर्म लक्षात घे…’
कुतूहलाने मी हातातली गाथा चाळू लागलो. तो माझी नजर चटकन एका अभंगावर पडली :
‘देहीं असोनियां देव। वृथा फिरतो निदैव।। १।। देव आहे अंतर्यामी। व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं।। धृ।।
नाभी मृगाचे कस्तुरी। व्यर्थ हिंडे वनांतरीं।। २।। साखरेचें मूळ ऊस। तैसा देहीं देव दिसे।। ३।।...’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज