अ‍ॅपशहर

इदं न मम...

Maharashtra Times 18 Apr 2017, 11:32 pm
स्वतःच्या क्षणोक्षणी बदलणाऱ्या विचार आणि भावनांवर लक्ष ठेवून असणं, हा एक फार चांगला छंद आहे. स्वतःबद्दलच्याच अनेक नवनवीन गोष्टी त्यामुळे कळतात आणि स्वतःकडे त्रयस्थपणे बघणंही यामुळे जमू लागतं. स्वतःच्या डोक्याविषयी त्याच डोक्यानी विचार करणे आणि मनाच्या भावना त्याच मनानी तपासणे ही तशी कठीणच गोष्ट असते, पण सरावाने ती हळुहळू जमू लागते. हे सगळेच विचार आणि भावना सुरवातीला कंपन स्वरूपातच असतात. हे कंपन वर येऊन त्याचा बुडबुड्यासारखा फुगा डोक्यात तयार होऊन तो फुटतो व त्याचा ‘विचार’ होतो, हे अशाच निरीक्षणाच्या एखाद्या एकाग्रक्षणी लक्षात येतं. मनाला डोकं आणि डोक्याला मन नसतं, त्यामुळे मनाला डोक्याचे भान आणि डोक्याला मनाचा पाझर देणं आवश्यक असतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
इदं न मम...


यात एक गोष्ट नेहेमीच लक्षात येते की कुठलीही चांगली कल्पना, एखाद्या समस्येवरचा उपाय, कुठलीही सर्जनशीलता आपल्याला विचारातून कधीच सुचलेली नसते. ती नेहमी अचानक, आपोआप, आतूनच ‘वर’ आलेली असते. विचारांनी आपण फक्त डोकं वा मन घुसळून काढत असतो. उपाय मात्र आतूनच ‘वर’ येत असतो.

आर्किमीडीज्ला ती बाथटबमध्ये सुचली. न्यूटनला सफरचंदांच्या झाडाखाली. ना. घ. देशपांडे फावल्या वेळात गीतेची मराठी भाषांतर करून फाडून टाकीत. "आपण प्लग लावून बसावे, करंट कधी येतो हे आपल्या हातात नसतं. करंट येतो तेव्हा कविता होते" असं ते म्हणायचे. एका चांगल्या कवितेला दोन दोन वर्ष लागतात. एक एक ओळ आपोपापच आतून येतं राहते असं सुरेश भट म्हणायचे. शीरेला शीर जोडण्याची हृदयशस्त्रक्रियेतली सगळ्यात महत्त्वाची क्रिया माझ्या हातानी कशी होते ते मला कधीच कळलं नाही असं डॉं. नीतू मांडके म्हणायचे. आईनस्टाईननी ‘इन्ट्युशन’नी सुचलेल्या अनेक गोष्टी सुतोवाच करून ठेवल्यात व पुढील चाळीस पन्नास वर्षांत शास्त्रज्ञांनी शास्त्राधारानी त्या सिद्ध केल्यात.

कल्पनाशक्ती आणि ‘इंट्युशन’ हा ज्ञानाचा नक्कीच एक मोठा स्रोत आहे. ‘इन्फरमेशन-नॉलेज-विज्डम’ यामधे बुद्धीची झेप फक्त ‘इन्फरमेशन’पर्यंतच जाऊ शकते, ‘नॉलेज’ला प्रतिभेचा स्पर्श लागतोच आणि ‘विज्डम’ला तर प्रगल्भता पण आवश्यक असते. व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भता हा व्यक्तीच्या आध्यात्मिक बैठकीचाच गुण असतो.‘इंटेलीजन्स कोशंट’ (IQ) ‘इमोशनल कोशंट’ (EQ) यांना ‘स्पिरिच्युअल कोशंट’ (SQ) ची ही जोड आपण आता दिली पाहिजे.

‘इंडिपेंडंट बॉडीज, ओव्हरलॅंपिंग माईंडस अॅण्ड वन सोल’, आपली शरीरंच फक्त वेगळी, मनं जुळलेली आणि आत्मा तर एकच असं जे. कृष्णमूर्ती म्हणायचे. फ्राईडच्या ‘अन-काँशस’नंतर कार्ल जंगनी ‘कलेक्टिव्ह अन-काँशस’ची कल्पना मांडली. आपल्या सगळ्यांचा मिळून, सगळ्या जगाचा एकच ‘कलेक्टिव्ह अन-कॉशस’ असतो, आतापर्यंत होऊन गेलेल्या सगळ्या माणसांनी केलेला विचार, अनुभव, प्राप्त केलेले ज्ञान या ‘कलेक्टिव्ह अन-काँशस’मधे असतं, अशी ही संकल्पना आहे. या ‘कलेक्टिव्ह अन-काँशस’च्या खांद्यावर बसून आपण जग पाहात असतो व म्हणून आपल्याला त्याच्या पुढचं दिसत असतं.

बुद्धिमत्ता ही पण अशीच आपली व्यक्तिगत नसून सामायिक असा ‘कॉस्मिक इंटेलिजन्स’ असावा का? एकाग्रतेच्या प्रमाणात तिचा स्पर्श आणि त्या स्पर्शाच्या प्रमाणात आपली बुद्धिमत्ता असंही हे समीकरण असू शकतं. या ‘कॉस्मिक इंटलिजन्स’लाच ज्ञानेश्वरांनी ‘देवा तूचि गणेशु, सकलमति प्रकाशु’, असं म्हटलं असेल का? बुद्धिमत्ता ही आपली वैयक्तिक नसून सामायिकच असेल तर मग अहंकार तरी कशाचा आणि कशाला जोपासायचा? या सदराची सोळा लेखांची मालिका आज संपवताना यापेक्षा अधिक सुयोग्य वाक्य अजून कोणतं असू शकतं..... इदं न मम..... सगळ्यांना धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज