अ‍ॅपशहर

पळसबंध

पळसफुलांच्या सोबतीनं केव्हाच संपलं होतं माझं बालपण. वाढत्या वयाबरोबर आलेल्या स्त्रित्वानं मला एका नव्या चौकटीत बंदिस्त केलं होतं.

Maharashtra Times 23 Mar 2016, 4:00 am
निष्पर्ण झाडांना नवी पालवी फुटून ती हिरवीगार दिसू लागली की वसंतॠतूची चाहूल लागते. फुला-पानांनी बहरलेली झाडं शृंगार करून त्याच्या स्वागतासाठी उभी होतात. सारा आसमंत जणू रंगोत्सवासाठी सज्ज होतो. अलवार स्पर्शांनी येणारे वसंतातले बदल मनाला हुरहूर लावतात. लख्ख होत जाणारा सूर्यप्रकाश ग्रीष्माच्या दाहकतेची प्रचीती देऊन जातो. आणि पळस फुलतो...!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
पळसबंध


इतरवेळी पळसाचं झाड अगदीच साधारण भासतं. रखरखीत नि कोरडी साल. जेमतेम असणारी पानं. लक्षणीय असं त्याच्याजवळ काहीच नसतं. पण वसंताबरोबर येणाऱ्या लाल-केशरी फुलांनी मात्र ते विलोभनीय वाटू लागतं. जणू भगवा शेला पांघरून वसंतपंचमीच्या रंगोत्सवाची नांदी देण्यास, आधीच येऊन उभं झालेलं!

बालपणी पळस फुलला की ओढ लागायची होळीची नि धूलिवंदनाची. दोन-तीन दिवस आधीच पळसाची फुलं तोडून आणायची आणि वाळवायची. पौर्णिमेला चंद्राच्या साक्षीनं होळी पेटली की रंग खेळण्याच्या आतुरतेनं रात्रभर झोपच लागत नसे. दिवस उजाडला की वेटाळातील सर्व मुलं-मुली जमा व्हायची. शाळा-अभ्यासानं दडपलेल्या मनांना उधाण यायंचं. पळसफुलांचा रंग करून निर्धास्तपणे सवंगड्यांच्या अंगावर उडवून रंगण्याची मजा काही औरच असे.

मला आठवतं, त्याही वर्षी पळस फुलला होता...नेहमीसारखाच! होळी पेटली आणि रंगपंचमीसाठी मन आतूर झालं होतं. दरवर्षीप्रमाणं रंगाचा खेळ सुरू झाला होता. सर्व मुलं बेभान होऊन एकमेकांवर रंग उडवित होते. मी जाण्यासाठी तयार झाले तर आईनं रोखंलं होतं मला. अचानक आलेल्या या नकारानं मला काय झालं ते कळलंच नव्हतं. मी हट्ट करायला लागले तर ती फक्त एवढंच म्हणाली होती की तू मुलांमध्ये खेळायचं नाहीस. कारण आता तू शहाणी झाली आहेस. काही सुचतंच नव्हतं. वाटलं, जणू काहीतरी कोसळलं आहे आपल्या मनावर. घरातील रीतीरिवाजांसमोर माझं काही चालणार नव्हतं. सर्व सवंगडी रंग उधळीत होते एकमेकांवर नि मी घरातील खिडकीत बसून असह्यपणे ते दृश्य बघत होते. मन खूप उदास होतं. पण सारं व्यर्थ होतं. माझं मोठं होणं माझ्या निरागसतेच्या मुळावर उठलं होतं. पळलफुलांच्या साक्षीनं लिंगभेदाची पहिली बेडी माझ्या पायात ठोकली गेली होती. एका निष्पाप जिवाची पहिली कैद. स्त्री म्हणून जन्माला आलेल्या मनुष्याचं हेच प्राक्तन आहे, हे घरातील स्त्रियांनी बेमालूम माझ्या मनावर गोंदलं होतं.

पळसफुलांच्या सोबतीनं केव्हाच संपलं होतं माझं बालपण. वाढत्या वयाबरोबर आलेल्या स्त्रित्वानं मला एका नव्या चौकटीत बंदिस्त केलं होतं. समाज, धर्म, चालीरीतींच्या नावाखाली माणूस म्हणून जगण्याच्या सर्व इच्छा-आकांक्षांना केव्हाच गोठवण्यात आलं होतं. रोज एक नवी शृंखला, रोज एक नवा पाश. नाक टोचून बेसरबिंदीच्या ओझ्याखाली तारुण्य कधी आलं... कळलंच नव्हतं. स्त्री-पुरुष भेदाच्या अधिकाधिक गहिऱ्या झालेल्या रंगानं पळसफुलांचा रंग केव्हाच झाकोळून गेला होता.

आज पुन्हा पळस फुलला होता...! दरवर्षी वसंतासोबत येणाऱ्या होळीच्या संगे तो उभा राहतो भावपटलावर! एक प्रकारची आंतरिक ओढ नि उदासीनता देऊन जातो. काहीतरी हरवल्याच्या जाणिवेनं मनाला पीळ बसतो. जीवनाच्या प्रवासात आज स्त्री-पुरुष भेदाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. माणूस म्हणून प्रस्थापित होऊन जगता येतं आहे. तरी स्त्रीत्वाच्या जाणिवेतून माझ्या मनोविश्वावर कोरल्या गेलेल्या पळसबंधातून मला मुक्त होता आलं नाही... हेचं खरं आहे!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज