अ‍ॅपशहर

समृद्धीची झेंडवाई

Maharashtra Times 18 Oct 2017, 4:00 am
आजोबांच्या गावी दिवाळीपूर्वीच्या अष्टमीपासून गावातून झेंडवाई निघायची. गावातील गुराखी नदीतील लव्हाळ्यांची झेंडवाई विणायचे. त्याला दहा खण असायचे. खालील खणात नागोबाची झेंडवाई व तांदुळाचा चौक वरील नऊ खण दिव्यांसाठी! शेवटचा खण निमुळता एकच दिवा बसेल असा. अष्टमीला एक दिवा, नवमीला दोन असे करत दिवाळीला पूर्ण नऊ दिवे पाजळून ही झेंडवाई दारोदार फिरायची. गुराखी यावेळी गाणं म्हणायचा व झेंडवाईने तो जी गुरे राखतो, त्या गुरांना ओवाळायचा. त्या गाण्यामध्ये केवळ गुरांसाठी मंगलकामना नसायची तर संपूर्ण गावासाठी असायची. झेंडवाई म्हणजे खरेतर सृष्टिदेवता! जिने प्रसन्न होऊन गावाला समृद्धी द्यावी व आरोग्यसंपन्न करावे म्हणून ही प्रार्थना! प्रार्थना तशी साधीसुधी पण त्याचा अर्थ पसायदानाच्या तोडीचा.’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
समृद्धीची झेंडवाई


‘दण दण दिवाई, गाई म्हशी ओवायी

गाई म्हशी कोणाच्या, रामा लक्षुमनाच्या

झडा झडो पिडा झडो, गोचीड झडो गोमाशी झडो

कूपची काटी कूप झडो, सोन्या रुपयानं ताट भरो

गाई म्हशीनं वाळा भरो, घरचा धनी मौजा करो’

एकाचे एकवीस होवो गाई चरो गाई, गाई चरो…

असे हे गुराख्याचे गाणे, ‘ग्रामीण पसायदान’ कारण तो म्हणतो ‘दण दण लक्ष्मीच्या पावलांनी येणारी दिवाळी सर्वांची इडापिडा टळून, रोगराई पळून जाऊन सुखाची होवो. गुरेढोरे त्या काळची संपत्ती, त्यांना चारा मिळो. मुख्य म्हणजे सगळी कुंपणं नाहीशी होवोत अगदी मनामनातीलही! आणि प्रत्येक गुरांचा धनी मौजा करो! म्हणजे सुखात राहो! आता त्याकाळी प्रत्येकाकडेच गुरे असायची. म्हणजे झाला ना अख्खा गाव सुखी ‘शिवाय सोन्यारुप्यानं ताटं भरो म्हणजे पिकपाण्याचे पैसे, अधिक भाव मिळून प्रत्येकाच्या घरी समाधान नांदो.’

आता ही निरामय प्रार्थना आहे ना गावासाठी मंगलमय. आता गुराखी बिचारा सामान्य माणूस. त्याचे विश्व लहान. अगदी चिमुकले. संपूर्ण गाव त्या गावासाठी तो कूप झडो, कूपची काटी झडो म्हणतो. म्हणजे झाले ना ‘दुरितांचे तिमिर जावो’ सारखे. इथे तुलना करण्याचा प्रश्नच नाही. पण सूर्य ऊर्जा व प्रकाश देतो. काजवा ऊर्जा नसेल देत पण प्रकाश देतोच ना? अथवा चिमुकली पणती. तीही अंधारात कामी पडतेच ना! शेवटी स्वतःसाठी काही न मागता दुसऱ्यांसाठी काहीतरी मागणे हेच महत्त्वाचे असते. आपण दुसऱ्यांच्या लेकरांना लेकरं मानत नाही, तिथे दुसऱ्यांची गुरं आपली मानणं अवघडच! असेल तो त्याचा व्यवसायही. पण आता आपला व्यवसाय आहे म्हणून किती पाळणाघरातील अथवा वसतिगृहातील मुलांना आपलं मानतात. स्वतःची लेकरं असल्यागत वागवतात? काही सामाजिक संस्था सोडून देऊ. कारण तिथे तर दिव्यांगांसाठीही आपुलकीने सेवा देतात. पण दुसऱ्यांसाठी काही करणे वा मागणे म्हणजे दिव्यत्वाची प्रचीतीच. म्हणूनच खरे तर कालौघात अशा चांगल्या प्रथा ज्या नष्ट होऊ बघताहेत त्या पुनरुज्जीवित करणे म्हणजेही दिव्यत्वाचेच काम! आजकालच्या कोरड्या औपचारिक सदिच्छांपेक्षा या ओलाव्याने भरलेल्या, सकल गावासाठी मंगलमय कामना केलेल्या सदाचिरंतन सदिच्छा जर गावासाठी देता आल्या, जतन करता आल्या, तर किती बरे होईल! पण पुन्हा जुने जाऊ द्या आहेच ना! मग नवे चिरंतन मूल्य असणारे गाणे आम्हाला का निर्माण करता येऊ नये? निदान तोपर्यंत तरी

इडा झडो, पिडा झडो,

कूपची काटी कूप झडो,

घरचा धनी, धनीन मौज करो,

लेकरं बाकरं खूप खेळो’

हेच म्हणू यात!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज