अ‍ॅपशहर

सकारात्मकता

प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टिकोन ही किरकोळ बाब वाटते. सकारात्मक दृष्टिकोन हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही.

Maharashtra Times 25 Jul 2017, 4:00 am
सारे साहित्यिक आणि त्यांचे साहित्य एकाच गोष्टीचा शोध घेत असतात आणि ती गोष्ट आहे माणूस. जगताना याच माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान असावे लागते. याच विचारांचे आचारात रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. म्हणूनच गौतम बुद्ध सांगतात, ‘तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
सकारात्मकता


ब्रिटिश महाकवी जॉन मिल्टनच्या ‘ऑन हिज ब्लाइंडनेस’ या छोटेखानी कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात एक मन बोलते. कवीची दृष्टी गेल्यानंतर हे मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी हिरावली गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे का? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळू शकणारे आशीर्वाद मिळणार नाहीत. याच मिल्टनने सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहिली. सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते.

लॉर्ड टेनिसनने त्याच्या ‘युलिसीस’ या कवितेत ग्रीक महाकाव्यातील नायक युलिसीसविषयी लिहिले आहे. युलिसीस हा शूर, पराक्रमी, जनताभिमुख राजा. शिवाय ज्ञानमार्गाने चालणारा. तो आणि त्याचे सवंगडी शरीराने थकले आहेत. सवंगड्यांना उतारवयात अवघड अशा पर्यटनासाठी प्रेरित करताना तो म्हणतो, ‘आपण शरीराने थकलो आहोत; कारण शरीर काळाशी बांधलेले आहे. आपली मने मात्र आपणच घडविलेली असल्यामुळे ती तरुण आणि कणखर आहेत. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल.’ मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे, असे सांगून तो सवंगड्यांना समुद्र पर्यटनासाठी तयार करतो. त्याचे हे चैतन्य आणि सकारात्मकता पाहून आपोआप हात जोडले जातात.

कमलाकर आणि माधवराव हे दोघे सहकारी. दोघेही निवृत्त. बऱ्याच वर्षांनंतर एके दिवशी सकाळी ७ वाजता दोघांची रस्त्यावर भेट होते. ‘इतक्या सकाळी सकाळी,’ कमलाकरने त्रासिक प्रश्न केला. ‘अहो, मी पहाटे ५ वाजता बाहेर पडलो. चार किलोमीटर चालून घरी निघालो आहे. तुम्ही कुठे चाललात,’ माधवरावांनी उलट विचारले. ‘निवृत्तीनंतर सगळे स्वातंत्र्य संपले. आता दूध आणणं, नातवंडांना शाळेत सोडणे-आणणे, बिले भरणे एवढेच काम राहिले आहे,’ कमलाकर चेहरा पाडून सांगू लागले. माधवराव म्हणाले, ‘असा चेहरा पाडू नका. बदलांचा हसतमुखाने स्वीकार करा. स्वतःला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.’ विन्स्टन चर्चिल म्हणतात, ‘आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तीला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.’

प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टिकोन ही किरकोळ बाब वाटते. सकारात्मक दृष्टिकोन हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टिकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दुःखी करू शकत नाही. तेव्हा आनंद राहा. यशासाठी मधला मार्ग नाही.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज