अ‍ॅपशहर

समता आणि धर्मनिरपेक्षता

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री जगाला फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळाली असली, तरी भारतीयांना ही मूल्ये नवी नाहीत. आपल्या संस्कृतीला अद्वैताचे अधिष्ठान आहे. ‘अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसराही, ही भावना.’ प्राचीन भारतीय ऋषींनी अद्वैताचा मंत्र जगाला दिला. ज्यांच्याबद्दल तुला तिरस्कार, दुजाभाव वाटत असेल, त्यांना प्रेमाने आपलेसे कर, त्यांना आलिंगन दे, ही शिकवण भारतीय ऋषींनी, संतांनी दिली.

Maharashtra Times 23 Jan 2017, 12:07 am
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री जगाला फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळाली असली, तरी भारतीयांना ही मूल्ये नवी नाहीत. आपल्या संस्कृतीला अद्वैताचे अधिष्ठान आहे. ‘अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसराही, ही भावना.’ प्राचीन भारतीय ऋषींनी अद्वैताचा मंत्र जगाला दिला. ज्यांच्याबद्दल तुला तिरस्कार, दुजाभाव वाटत असेल, त्यांना प्रेमाने आपलेसे कर, त्यांना आलिंगन दे, ही शिकवण भारतीय ऋषींनी, संतांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम secular
समता आणि धर्मनिरपेक्षता


ज्ञानेश्वरांनी गीतेचे रसग्रहण करून सर्वसामान्यांसाठी मायमराठीत भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिहिली. स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्याशी संबंधित मूलभूत विचार तीत सर्वत्र मांडलेला दिसतो. ते शेवटी म्हणतात, ‘सर्वसुखी सर्वभूती। संपूर्ण होईजे।’ जेव्हा समाजात अनाचार, भ्रष्टाचार वाढतो तेव्हा तो कमी करण्यासाठी महापुरुषांना आपले आयुष्य वेचावे लागते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ‘जाळीन मी भेद। येथे प्रमाण तो वेद।’ ‘दया तिचे नाव भूतांचे पाळण। आणिक निर्दालन कंटकाचे।।’ समर्थांनी तर सारे अद्वैत तत्त्वज्ञान एका ओवीत सांगून ठेवले. ‘आपणांस चिमोटा घेतला। तेणे जीव कासावीस झाला। आपणावरून दुसऱ्याला। ओळखीत जावे।’

थोडक्यात अद्वैताचा उच्चार म्हणजे स्वत:च्या स्वार्थी सुखावर पाणी सोडणे, निखारा ठेवणे... म्हणून धर्माची व्याख्या साधी-सोपी करता येईल. ‘समाजाचे कायिक, वाचिक, मानसिक आणि आत्मिक निकोपपण रोखतो तो धर्म!’ पण समाजात संस्कारांचा लोप झाला, तर धर्माला ग्लानी येऊ लागते. म्हणून, स्वातंत्र्य, समता व बंधुता व धर्मनिरपेक्षता या शाश्वत मू्ल्यांना पुन्हा पुन्हा घासून-पुसून झळाळी आणावी लागते. आपल्या राज्यघटनेत या मूल्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘गौतम बुद्धांच्या शिकवणीचे सत्य स्वरूप शील, प्रज्ञा व करुणा, मैत्री या त्रिशिक्षापदावर आधारलेले आहे. नीती हे धम्माचे सार. माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. या आवश्यकतेतून नीतीचा जन्मते. ही नीतिमत्ता सार्वत्रिक असून, ती प्रबलांपासून दुर्बलांचे रक्षण करणारी, सर्वसामान्य आदर्श मूल्यमापनाचे मानदंड आणि नियम घालून देणारी व माणसांच्या विकासाला हातभार लावणारी असावी. तिच्यामुळे स्वातंत्र्य आणि समता परिणामकारक बनतात. आणि बंधुता म्हणजे मानवी भातृभाव... त्याचेच दुसरे नाव आहे नीतिमत्ता!’

लोकशाहीस सामाजिक आणि आर्थिक समतेचे अधिष्ठान असावे. म्हणून स्वातंत्र्य, समता व बंधुता या उदात्त जीवनमूल्यांची फारकत करता कामा नये. समता नसेल, तर मूठभर लोक इतरांवर सत्ता गाजवतील. समता असेल व स्वातंत्र्य नसेल, तर व्यक्तीची उपक्रमशीलता नष्ट होईल; आणि बंधुभाव नसेल, तर दुहीमुळे स्वातंत्र्य व समता धोक्यात येईल. लोकशाही ही केवळ राज्यपद्धती नाही, तर ती उदात्त जीवनपद्धती आहे. म्हणून या तीनही जीवनमूल्यांचे पालन केले पा‌हिजे, असे आंबेडकर म्हणत.

आपल्या लोकशाहीचा प्राण धर्मनिरपेक्षतेत आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे देशाचा कारभार धर्माधिष्ठित नसेल. देशात सर्व धर्मांना समान वागणूक मिळेल व त्यांचा समान आदर केला जाईल. भारतातील प्रत्येकाला स्व-धर्माचे आचरण करण्याचे ‘स्वातंत्र्य’ असेल. याला सर्वधर्मसमभाव म्हणतात. आज मात्र घटनेतील ‘समता’ हे मूल्य गायब होते की काय अशी शंका येते. ज्ञानयुग म्हटल्या गेलेल्या एकविसाव्या शतकातही पारतंत्र्य, विषमता व द्वेषभावना यांची मानवी जीवनावरील पकड सैल झालेली दिसत नाही. समाजात पैसा, व चंगळवाद यांची वखवख वाढल्यामुळे माणसे अ‌सहिष्णू, अशांत व अमानुष बनत आहेत. याची उदाहरणे समाजात नित्य ‌दिसतात. या अनागोंदीवर स्वातंत्र्य, समता व बंधुता व सर्वधर्मसमभाव यांची सतत जाणीव करून देणे, कान टोचत राहाणे हाच उपाय आहे. प्रजासत्ताक दिन हे त्यासाठीचे एक निमित्त ठरू शकेल!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज