अ‍ॅपशहर

चिंतन शिक्षकांसाठी

तत्त्वज्ञान म्हणजे सत्यस्वरुपाचे ज्ञान. तत्त्वज्ञ म्हणजे सत्याचे उपासक आणि शाश्वत ज्ञानप्राप्तीसाठी आयुष्य वेचणारे. तत्त्वज्ञान हे सत्याचा शोध घेऊन त्याच्या आधारे जीवनाचे सार्थक कशात आहे, हे समजावून सांगते. सत्य काय असत्य काय, योग्य काय अयोग्य काय, हे स्पष्ट करते.

Maharashtra Times 19 Jan 2017, 10:00 am
तत्त्वज्ञान म्हणजे सत्यस्वरुपाचे ज्ञान. तत्त्वज्ञ म्हणजे सत्याचे उपासक आणि शाश्वत ज्ञानप्राप्तीसाठी आयुष्य वेचणारे. तत्त्वज्ञान हे सत्याचा शोध घेऊन त्याच्या आधारे जीवनाचे सार्थक कशात आहे, हे समजावून सांगते. सत्य काय असत्य काय, योग्य काय अयोग्य काय, हे स्पष्ट करते. म्हणून जीवनाला तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान पाहिजे. तत्त्वज्ञानाच्या अभावी जीवन पशुवत होते. शिक्षणाच्या अभावीही माणसाचे जीवन खुरटते. वैयक्तिक, सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान आणि माहिती यांचे संकलन नव्हे. आपले आकलन वाढवून समाजाकडे साकल्याने पाहण्याची, मुक्तपणे अभिव्यक्त होण्याची दृष्टी शिक्षणातून येते. जिज्ञासेची पूर्ती शिक्षणातून होते आणि त्यातूनच तत्त्वज्ञान आकाराला येते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thinking process
चिंतन शिक्षकांसाठी


शिक्षण आणि तत्त्वज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिक्षणक्षेत्रात वेळोवेळी येणाऱ्या समस्यांचा गुंता सोडविण्यासाठी तत्त्वज्ञानाचे मार्गदर्शन लागते. तत्त्वज्ञ हा शिक्षणशास्त्रज्ञही असतो. त्याचबरोबर समाजशिक्षकही असतो. आपल्याकडील संतांची मांदियाळी हे याचे मूर्तिमंत उदाहरण. स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांनी तर प्रत्यक्ष शिक्षणप्रणालीच सादर केली. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, महर्षी धोंडे केशव कर्वे आणि साने गुरुजीही ‘तत्त्वज्ञ’च होते.

आधुनिक काळातील शिक्षकाला तत्त्वज्ञानाच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. शिक्षक हा निर्माता, शिल्पकार असतो. मुलांवर उत्तम संस्कार करतो. विद्यार्थ्यांच्या मनात सद्विचार, सद्भावना, सुसंगती, प्रामाणिकपणा यांची बीजे रोवतो आणि त्यातून त्यांचे व्यक्तित्व घडवतो. संस्कृतिवहनाचेही काम त्याच्याकडून होते. त्याने हे सारे करावे, अशी अपेक्षा असते. शिक्षकाने केवळ विषयज्ञान देऊन कौशल्याधरित, भावनाशून्य मानव तयार करणे मात्र अपेक्षित नाही. शिक्षकांबद्दल आज समाजात उलट-सुलट बोलले जाते. त्यांच्याकडून होत असलेल्या कामापेक्षा त्यांच्याकडून होत असलेल्या मागण्यांची चर्चा अधिक असते. शिक्षकी पेशाबद्दल समाजात आदरच हवा. एकेकाळी तो काही प्रमाणात होता. आज तो जवळ जवळ नाहीसा झाला आहे. हे असे का झाले याबद्दल शिक्षकांनी, तसेच समाजानेही चिंतन करायला हवे.

समाजाकडून चिंतन होण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे; परंतु शिक्षकांकडून होणे तुलनेने सुलभ आहे. शिक्षक म्हणून आपण भूमिका कशी निभावत आहोत, याचा विचार त्यांनी करायला हवा. माझे विषयज्ञान सखोल व बहुआयामी आहे का, आणि मी ते विद्यार्थ्यांना चौफेर व भरभरून देत आहे काय, मी स्वतः विद्यार्थी आहे का, वेगवान जगातील माहिती आणि ज्ञान मिळविण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो काय, नवीन ज्ञान आत्मसात करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मी करतो काय, नवनवीन अध्यापन पद्धतींचा अभ्यास मी करतो काय, विद्यार्थ्यांना खरोखरीच समजून घेण्यासाठी मी काय करतो, बालमानसशास्त्र, वर्तनशास्त्र आदींच्या अनुषंगाने मी प्रयत्न करतो काय आदी अनेक प्रश्नांना शिक्षकांनी स्वतःच उत्तरे द्यायला हवीत आणि त्यानुसार स्वतःत बदल घडवून आणायला हवा.

आजच्या धकाधकीच्या जीवनात व अस्थिर परिस्थितीत विद्यार्थी मनाने, देहाने असुरिक्षत व भरकटलेला आहे. संघर्षाच्या कड्यावर उभा आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना समजून घेण्याचे काम शिक्षकांचे आहे. आज समाजाच्या उपेक्षित, वंचित आणि मागास घटकांतील मुले आणि मुली शिक्षणाच्या प्रवाहात दाखल होत आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक जण त्यांच्या घरात शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांना समजून-उमजून घेण्याची गरज आहे. शिक्षकीपेशा म्हणजे एक जीवननिष्ठा आहे. शिक्षकाला विद्यार्थ्यांचे जीवनच घडवायचे असते, त्यामुळे त्यांचा संबंध आदर्श जीवनमूल्यांशी येतो. बिघडलेला विद्यार्थी सुधारू शकतो, चांगली मूल्ये स्वीकारू शकतो, या आशावादावर श्रद्धा असणारे शिक्षक त्यांचे खरोखरीचे हितचिंतक असतात.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज