अ‍ॅपशहर

खरा धर्म!

Maharashtra Times 26 Jun 2017, 4:00 am
माझ्या बाळपणात महात्मा गांधी ही फक्त घरातल्या भिंतीवरील एक तसबीर होती. आम्ही व्यावसायिक आणि तेही ग्रंथविक्री करणारे. तेव्हा लक्ष्मी आणि सरस्वती यांच्याशिवाय तिसरी तसबीर महात्मा गांधींची. गांधी जिवंत होते तेव्हाची ही गोष्ट. वडिलांच्या लेखी त्यांना एखाद्या दैवतासारखे महत्त्व असावे. या तसबिरीच्या सान्निध्यामुळे माझ्यावर बाळपणापासून गांधीजींचा प्रभाव होता. काहीशा चिकित्सक वृत्तीने या दिवसांकडे पाहू लागलो तेव्हा लक्षात येऊ लागले की गांधीजींचा प्रभाव इतक्या जणांवर आणि निरनिराळ्या प्रकारे होता की घरात येणारी माणसे गांधी जगत असत. त्यांच्यामुळे मी घडत गेलो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
खरा धर्म!

माझ्या तेराव्या वर्षी गांधींचा खून झाला आणि त्यानंतर गांधी ही माझ्या मनातील उदासवाणी ठसठस टोचू लागली. इतक्या जणांच्या भक्तीचे कवच गांधीजींना होते तरीही एका प्रार्थनासभेत त्यांचा खून होऊ शकतो; म्हणजे आपणा सर्वांचेच काहीतरी चुकत आहे असे जाणवू लागले. काही काळ ही अस्वस्थता त्या अल्पवयातही टिकली.
फार नंतरची गोष्ट. निरनिराळ्या विषयांचा अभ्यास करताना लक्षात आले की गांधींनी मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श केला होता. आणि तो स्पर्श वरवरचा नव्हता. त्यामुळे बहुतेकांची एका बाबतीत सोय झाली. कोणत्याही गोष्टीबद्दल दोष द्यायचा तर तो गांधींना देणे सोयीचे होते. मुष्टियुद्धाच्या क्षेत्रातले उदाहरण द्यायचे तर सरावासाठी गांधी हा सर्वांना सोयीचा ‘पंचिंग बॅग’ होता. अनेकदा परस्परविरोधी कारणांसाठी गांधींना दोष दिला जात असे. उदाहरणार्थ आंबेडकरांना दैवत मानणारे गांधींना वर्णाश्रमधर्मावर विश्वास ठेवणारे दलितविरोधी सनातनी मानत. वर्णाश्रमधर्मावर आपला विश्वास आहे हे त्यांचे म्हणणे एकूण भारतीय समाजाविषयी असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या वागणुकीत जातिभेद पाळण्याचे उदाहरण दिसत नाही. परंपरावादी गांधींनी धर्मभेद आणि जातिव्यवस्था मोडून काढली आणि दलित, मुसलमान इत्यादिकांना ते आपलेच मानत म्हणून नाक मुरडू लागले.
ह्या वैचारिक गोंधळावर उपाय म्हणून मी गांधीविचारांचा अभ्यास त्यांच्या विरोधकांच्या नजरेतून करायचे ठरवले. गांधी स्वत:ला मवाळ नेते गोपाळ कृष्ण गोखले यांचा चेला म्हणवून घेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे मवाळ-जहाल वादात त्यांचे विरोधक. तरी अखेरच्या दिवसांत गांधी हेच आपली गादी चालवणार हे टिळ्कांनी ओळखले होते. मात्र ‘साधनानाम् अनेकता’ मानणारे टिळक आणि ‘साधनशुचिते’चा आग्रह धरणारे गांधी यांच्यात जबरदस्त विरोध होता. दुसऱ्या टोकाला जवाहरलाल नेहरू यांना गांधींनी जाहीरपणे आपला वारस मानले तरी, विशेषत: आर्थिक प्रश्नांबाबत, ते दोघे टोकाची भूमिका घेत असत.
हीच गोष्ट धर्माबाबत. नेहरू हे स्वत:ला नास्तिक निदान अज्ञेयवादी मानत. तर गांधींचा देव, प्रार्थना या गोष्टींवर नितांत विश्वास. तरीही गांधी हे पारंपरिक अर्थाने देवभक्त नव्हते. त्यांनी मूर्तिपूजेला आपल्या आराधनेत स्थान दिले नाही. वर्ध्याला, शोधग्रामला आणि इतरही गांधीवादी आश्रमांत नेमाने प्रार्थना होते तिथे मूर्ती तर नसतेच. शिवाय ती सर्वधर्मप्रार्थना असते. गांधी आधी ‘देव म्हणजे सत्य’ असे म्हणत. पुढे त्यांनी ही व्याख्या बदलून ‘सत्य हाच देव’ असे मुद्दाम सांगितले. आणि सत्य हे प्रत्येकाने शोधून काढायचे असते. त्यांचे आयुष्य हे सत्याचे प्रयोग होते. प्रत्येकाने असेच प्रयोग करून सत्य शोधून काढायचे आणि त्या सत्यालाच परमेश्वर मानायचे, असा ते संदेश देत होते. गौतम बुद्ध, महावीर, अकबर, गुरू नानक किंवा युरोपमध्ये मार्टिन ल्यूथर यांच्यासारखे जे धर्मचिंतक झाले त्यांनी प्रचलित धर्म अमान्य करून स्वत:चा नवीन धर्म किंवा पंथ सुरू केला. गांधींनी धर्मकल्पना महत्त्वाची मानली. प्रत्येक धर्म नीतीची मूलतत्त्वे सांगतो ती महत्त्वाची. त्यामुळे कोणताही धर्म सोडणे म्हणजे नीतिमूल्यांशी फारकत घेणे. म्हणूनच धर्मांतर किंवा शुद्धी त्यांना मान्य नव्हती. प्रत्येकाने आपला जन्मजात धर्म हा नीतिसिद्धान्त मानून तो अधिकाधिक आचरणात आणला पाहिजे याबद्दल त्यांचा कटाक्ष होता. त्यावर चढलेली कर्मकांडाची पुटे त्यागून खरे स्वरूप ओळखावे हा गांधीविचार सगुण-निर्गुण वादापलीकडे जाणारा होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज