रात्री अचानक जाग आली. कधी कधी अशी अचानक जाग येते. कधी आतील कारणाने. कधी बाहेरील. कारण कळत नाही. स्वप्नं पडलं असेल का, पण काही आठवत नव्हतं. सतत एकच स्थिती होती का शरीराची, ज्यामुळं नैसर्गिकरित्या जागवलं गेलं? आपण काहीशी नकळत हालचाल करतो, सोपी काहीतरी मांडामांड होते शरीराची. पुन्हा झोपी जातो गाढ. पण पूर्ण नीज गळून पडल्याचं नक्कीच काही कारण असू शकतं. काही विचार उगवतो. अस्वस्थ करतो. दिवसा प्रश्न सुटलेला नसतो. आपण उत्तर न शोधता सोडून दिलेलं असतं काहीतरी. उत्तराशिवाय काही काही प्रश्न जगूच शकत नाहीत. काळजीचे असतात ते. अशा अवेळी मग गाठतात. पुन्हा आपण त्या चक्रात अडकतो. चिंता, काळजी मनात शिरण्यास कुठलाच अडसर नसतो दाराशी. त्यांच्यासाठी मनाचं दार केव्हाच बंद असत नाही. धुडगूस घालतात मग. झोप उडवतात. प्रश्न एकमेकांच्या हातात हात धरून फेर घालतात. टाक माझं उत्तर. त्यांचा एकच प्रश्न. नात्यांतील गुंते, निर्णयांचा शेवट, आर्थिक उकल, जबाबदारीचे ओझे, आधाराची उणीव, कितीही मोठी असू शकते ही यादी. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, चिंता निराळ्या. नीज सारखी. ती सर्वांना मुक्ती देते काहीकाळ. जागे असण्याच्या दोन टोकांना तिचे दोर बांधलेले. त्यावर झोपेचा झुला. अवजड ओझे मनावर धिंगाणा करू लागले की दोर तुटतात आणि आपण टक्क जागे होतो. बाकी सारे शांत शांत.
जाग आली, तेव्हा लक्षात आलं. गुरखा रस्त्यावरून जात आहे. शिट्टीचा आवाज जवळ येत गेला. दारासमोरचा लोखंडी लाईटच्या खांबाला बाठी आदळत त्यानं आवाजही केला, पण हे तो रोज करत असावा. एक तारखेस सकाळीच, ‘सलाम साब’ म्हणून दारात हजर असतो तो. ‘एक दिन भी खाडा नही साब’ असं म्हणतो. निद्रिस्त देहास आणि मनास ते त्याचं अपरात्री येणं आवाज करणं, हे ही सवयीचं असणार. ते कारण नसावं, निमित्त आणि पूरक असं काही झालं असणार, असा विचार केला.
नेमकं कारण काय, याचा विचार करणं हे ही एक झोप उडवणारं कारण असू शकतं तर. काहीतरी शोधण्यात आणि विचार करण्यात किती गुंतून पडतो आपण. धागा काही सापडला तर ठीक, नाहीतर सुटका होत नाहीच. नेमकं कारण हाती लागत नव्हतं. आणि आता कारण न शोधता पुन्हा झोपलो तरी चालेल अशी मनाची समजूत काढत पुन्हा झोपेची आराधना सुरू करू लागतो आपण. निजेच्या शांत डोहात हळुहळू उतरत जातो.
फार पूर्वी रात्री ट्रॅव्हल्सने प्रवास करत होतो. झोप लागली गाढ काही वेळानं. मध्ये एका ठिकाणी थांबली ट्रॅव्हल्स. शांत झाली. दोन्ही दिशांना शांत पहुडलेला रस्ता. अंधार अंगावर घेऊन. थांबलो त्याठिकाणी फक्त उजेडाचा सडा. दोन-तीन हॉटेल. चहाचा वास. सतत कानात घुमणारा धावणाऱ्या वाहनांचा आवाज अचानक थांबल्यानं आणि गलबला, आणि हॉटेलमधील गाण्याच्या आवाजानं अचानक जाग आली. खाली उतरून पाहिलं तर दिवसा असावी तशी वर्दळ. कप-बशांचे आवाज. काही तळण्याचे आवाज. वास. पुन्हा बऱ्याच ठिकाणी अशी वेळ आली पण लक्षात मात्र ते ठिकाण राहिलं. कारण तिथं गाणं कानावर पडलं आणि भिडलं. शांत प्रहरात संगीताचा धिंगाणा आणि गोंधळ नसणारं गाणं होतं. आशा चित्रपटातील ‘शीशा हो या दिल हो आखिर, टूट जाता है’. अगदी पहिल्यांदा ऐकलं. आणि नंतर पुन्हा खूपदा ऐकलं. पण पहिल्यांदा भिडण्याची ती मजा नेहमी लक्षात राहिली.
या झाल्या जाग आल्यानंतरच्या काही आठवणी. पण मूळ प्रश्न तसाच. अचानक जाग का आली. बाप रे! लेख पाठवायचा राहिला. मनात विषय धागा आहे, शब्द पिंजून पडलेले. तस्साच उठलो. लिहू लागलो. कोपऱ्यातून कविता हसऱ्या डोळ्यानं सुचवत होती,
मांड आता, तुझे दुःख,
तुझा आक्रोश, फुलणे मिटणे,
तुझा कोष…
जाग आली, तेव्हा लक्षात आलं. गुरखा रस्त्यावरून जात आहे. शिट्टीचा आवाज जवळ येत गेला. दारासमोरचा लोखंडी लाईटच्या खांबाला बाठी आदळत त्यानं आवाजही केला, पण हे तो रोज करत असावा. एक तारखेस सकाळीच, ‘सलाम साब’ म्हणून दारात हजर असतो तो. ‘एक दिन भी खाडा नही साब’ असं म्हणतो. निद्रिस्त देहास आणि मनास ते त्याचं अपरात्री येणं आवाज करणं, हे ही सवयीचं असणार. ते कारण नसावं, निमित्त आणि पूरक असं काही झालं असणार, असा विचार केला.
नेमकं कारण काय, याचा विचार करणं हे ही एक झोप उडवणारं कारण असू शकतं तर. काहीतरी शोधण्यात आणि विचार करण्यात किती गुंतून पडतो आपण. धागा काही सापडला तर ठीक, नाहीतर सुटका होत नाहीच. नेमकं कारण हाती लागत नव्हतं. आणि आता कारण न शोधता पुन्हा झोपलो तरी चालेल अशी मनाची समजूत काढत पुन्हा झोपेची आराधना सुरू करू लागतो आपण. निजेच्या शांत डोहात हळुहळू उतरत जातो.
फार पूर्वी रात्री ट्रॅव्हल्सने प्रवास करत होतो. झोप लागली गाढ काही वेळानं. मध्ये एका ठिकाणी थांबली ट्रॅव्हल्स. शांत झाली. दोन्ही दिशांना शांत पहुडलेला रस्ता. अंधार अंगावर घेऊन. थांबलो त्याठिकाणी फक्त उजेडाचा सडा. दोन-तीन हॉटेल. चहाचा वास. सतत कानात घुमणारा धावणाऱ्या वाहनांचा आवाज अचानक थांबल्यानं आणि गलबला, आणि हॉटेलमधील गाण्याच्या आवाजानं अचानक जाग आली. खाली उतरून पाहिलं तर दिवसा असावी तशी वर्दळ. कप-बशांचे आवाज. काही तळण्याचे आवाज. वास. पुन्हा बऱ्याच ठिकाणी अशी वेळ आली पण लक्षात मात्र ते ठिकाण राहिलं. कारण तिथं गाणं कानावर पडलं आणि भिडलं. शांत प्रहरात संगीताचा धिंगाणा आणि गोंधळ नसणारं गाणं होतं. आशा चित्रपटातील ‘शीशा हो या दिल हो आखिर, टूट जाता है’. अगदी पहिल्यांदा ऐकलं. आणि नंतर पुन्हा खूपदा ऐकलं. पण पहिल्यांदा भिडण्याची ती मजा नेहमी लक्षात राहिली.
या झाल्या जाग आल्यानंतरच्या काही आठवणी. पण मूळ प्रश्न तसाच. अचानक जाग का आली. बाप रे! लेख पाठवायचा राहिला. मनात विषय धागा आहे, शब्द पिंजून पडलेले. तस्साच उठलो. लिहू लागलो. कोपऱ्यातून कविता हसऱ्या डोळ्यानं सुचवत होती,
मांड आता, तुझे दुःख,
तुझा आक्रोश, फुलणे मिटणे,
तुझा कोष…