अ‍ॅपशहर

निरागसता...

‘या देशातील एक जरी बालक शारीरिक, मानसिक कष्ट करीत असेल तर हा देश मोठ्या संकटात आहे... स्वतंत्र झालेलाच नाही’, असं प्रतिपादन शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांचं आहे. काल बालकदिन साजरा झाला.

Maharashtra Times 14 Nov 2017, 11:16 pm
‘या देशातील एक जरी बालक शारीरिक, मानसिक कष्ट करीत असेल तर हा देश मोठ्या संकटात आहे... स्वतंत्र झालेलाच नाही’, असं प्रतिपादन शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांचं आहे. काल बालकदिन साजरा झाला. पंडित नेहरूचाचा आणि लाल गुलाबाचं फूल असं पन्नासच्या दशकातलं दृश्य या दिवसाचं प्रतीक म्हणून नजरबंद करून ठेवलंय समाजानं, याची आठवण झाली आणि तो एक गोंडस इतिहास होता, या वास्तवाची तीव्र जाणीव झाली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम speaking tree
निरागसता...


भारताची लोकसंख्या आज सुमारे एकशे तीस कोटी असावी. त्यातील नवजात ते बारा-तेरा वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या सुमारे वीस-बावीस टक्के असावी. या एक पंचमांश लोकसंख्येचा विचार मनात येतो तेव्हा डोळ्यांपुढे रंगीबेरंगी कपडे घातलेली, छोटी-छोटी, कोवळी, निरागस, निर्मळ मुलं उभी राहतात. मुलगा-मुलगी, श्रीमंत-गरीब, गोरा-काळा, हसरा-रडका हा भेदच गळून पडावा असं ते रूप... सगुण-निर्गुणाचं पृथ्वीवरचं जिवंत उदाहरण. ओली माती, कोरी पाटी... वळवाल तसा आकार घेणारी, गिरवाल ते उमटवणारी. मोठ्यांवर प्रगाढ विश्वास-भरवसा... अवखळ, अल्लड, निष्कपट, निखालस, निरंजन, चैतन्यमयी दुडदुडती बागडरूपं.

मात्र हे दृश्य सर्रास दिसत नाही. एकीकडे आधुनिकीकरण, शहरीकरण, नागरीकरण यामुळे तर दुसरीकडे स्वातंत्र्य, नीतिमत्ता, संस्कार, समाजभान यांचे सोयीस्करपणे बदललेले आयाम, माणसा-माणसातली उसवलेली नाती, विस्कटलेल्या जाणिवा, अनिर्बंध बेशिस्त वागणूक... या आमूलाग्र बदललेल्या सामाजिक परिस्थितीत ही चिमुकली करपायला लागली. कोमेजायला लागली. त्यांची ऊर्जा निष्प्रभ व्हायला लागली.

गरिबीतल्या बालपणाचा प्रवाह अश्रूंसारखा खारट. अर्धपोटी, अर्धोन्मिलित, अगतिक... केवढं वादळ असेल त्यांच्या मनांत... किती थरथर असेल त्या हृदयात... कसा कंप असेल त्यांच्या मेंदूत... कल्पनेनंही थरकाप होतो, संवेदनशील माणसाचा. तथापि, श्रीमंत, मध्यमवर्गीय, सुसंस्कृत घरातील बालपणही फार समाधानकारक नाही. दोन-तीन महिन्याचं वय झालं की पाळणाघर, सांभाळणारी दायाबाई, आईची नोकरी, संघर्ष, अहंकार, आर्थिक ओढाताण, महत्त्वाकांक्षा... बदललेली जीवनशैली. एक ना अनेक अपेक्षा! एवढ्या छोट्याशा खांद्यावर जरा जास्तच भार... लहानपणीच हताश झालेला तो चेहरा... सकाळी सकाळीच जास्वंदांनी मान टाकावी तसाच...

आणि तिसरा बालकांचा प्रकार म्हणजे, अजूनही घरगुती वाढणारी. आजी-आजोबा, नातलग, भावंडं, समंजस शेजारी... अशी गोकुळात वाढणारी मुलं. ही मुलं जरा तरी मोकळी वाढतात, खेळतात, बागडतात, मज्जा-मस्तीत दंग होतात. तणाव-दबाव मुक्त असतात. मात्र, आधीच्या दोन प्रकारच्या बालपणापेक्षा वेगळं अनुभवत असतात. त्यामुळे ही तीन प्रकारची मुलं कधीच एकमेकांमध्ये मिसळून राहू शकत नाहीत. त्यांच्या ‘बालपण’ या व्याख्येत एकरूपता नाही.

मुलं जन्मतःच चैतन्याचे झरे घेऊन येतात... त्यात पालकांच्या वात्सल्याची भर पडते आणि प्रवाह होतो त्या स्नेहरसाचा. पुढे शिक्षक-समाज त्यांना स्वप्न दाखवतात आणि संस्कृतीनं त्या स्वप्नांना सुंदर सुघट आकार देतात... त्या खळखळत्या प्रवाहाला दिशा देतात... संगीत, चित्र, कला, शिल्प या कला आणि निरनिराळे खेळ त्यांच्यात रंग-रस भरतात... निसर्ग, पाऊस, फळे, फुले, वृक्ष, नद्या, पर्वत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रफुल्लित करीत एक गंध प्रदान करतात... आणि यातून मुग्ध-मनोहर-सकवार रूप निर्माण होतं... लालबुंद टवटवीत गुलाबासारखं. बघताच... दिसताच प्रसन्नता पसरवणारं...सर्वत्र सर्वदूर सर्ववेशी-सर्वदेशी या फुललेल्या फुला-मुलांची अवखळ दरवळ वसावी या स्वप्नाची सदैव जाणीव समाजाला देत राहणारा ठरावा ‘बालकदिन.’

(लेखिका सामाजिक-साहित्यिक जाणिवांवर लिखाण करतात.)
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज