अ‍ॅपशहर

कृतज्ञतेचा परीसस्पर्श!

गुणांचं संमेलन भरलं होतं. आपापल्या गुणांची महती सांगण्यासाठी ती स्पर्धा होती. नम्रता, दान, सात्विकता अशा अनेक गुणांचे स्पर्धक आले होते. प्रत्येकाने माझा गुण सगळ्यात मोलाचा आहे व तोच सर्वश्रेष्ठ आहे, असे पटवून देण्याचा कार्यक्रम चालू होता.

Maharashtra Times 15 Nov 2017, 11:36 pm
गुणांचं संमेलन भरलं होतं. आपापल्या गुणांची महती सांगण्यासाठी ती स्पर्धा होती. नम्रता, दान, सात्विकता अशा अनेक गुणांचे स्पर्धक आले होते. प्रत्येकाने माझा गुण सगळ्यात मोलाचा आहे व तोच सर्वश्रेष्ठ आहे, असे पटवून देण्याचा कार्यक्रम चालू होता. नम्रता हा सर्वांत मौलिक गुण कसा हे नम्रतेने सांगितले. पाठोपाठ सोशिकता आली. तिने आपले महत्त्व विशद केले. लगोलग दानशूरतेच्या महत्त्वाचं वर्णन संमेलनानं ऐकलं. ऋजुतेनं यावर कळस म्हणून माझ्याशिवाय या गुणांचे काहीच महत्त्व नाही, असे सांगितले. संयम पुढे आला व त्याने जगण्यात संयतता कशी महत्त्वाची हे सांगितले. प्रत्येकाच्या बोलण्यात अभिनिवेश होता. आग्रह होता व प्रतिपादनाच्या शैलीमुळे त्यातील अहंकारही दिसत होता. शेवटी कुणी राहिलयं का? असा प्रश्न विचारण्यात आला. कृतज्ञता एका कोपऱ्यात शांतपणे बसलेली होती. काही बोलावं असं तिला मनातूनच वाटत नव्हतं. सभोवतालच्या लोकांनी थोडा आग्रह केल्यावर माझ्याजवळ सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे मी पुढे बोलत नाही, असं तिनं सांगितलं. पण ‘राखावी बहुतांचि अंतरे’ याचं शेवटी तिलाही भान होतं. म्हणून थोड्या संकोचाने ती व्यासपीठाकडे गेली आणि म्हणाली, की माझे अनेक मित्र त्यांच्या गुणांमुळे श्रेष्ठ आहेत. मी त्यांच्यापुढे फार छोटी आहे. पण आयुष्यात मला जे शिकायला मिळाले ते असे, की ज्या गुणांच्या दर्शनाने माणूस मोठा होतो त्या गुणांची मालिका आपल्याजवळ वाढवावी. पण ती केवळ आपल्यामुळे जवळ येत नसते, हे ध्यानात ठेवावं. कारण, गुण हळूहळू वृद्धिंगत होतात. कुणी विद्वान असतो. पण त्याच्या नम्रतेकडे पाहिलं की आपलं मस्तक त्याच्या पायाकडे नकळत झुकतं. खूप त्रास सहन करून आयुष्यात काही मिळविलं असं कोणी दिसलं की, आपल्या वाट्याला काहीच दु:ख आलं नाही हे जाणवतं. त्यामुळे जे जे म्हणून असं मिळत जातं त्यांच्यावषयी मनातला भाव आयुष्यभर स्मरणाचा असावा, असं मला वाटतं. माझं काहीच नाही. इतरांनी दिलं त्या सर्वांना माझे धन्यवाद! मी त्यांच्याविषयी कृतज्ञ आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम speaking tree
कृतज्ञतेचा परीसस्पर्श!


या विवेचनानंतर सारे अवाक् होतात. पहिले सारे गुणसुद्धा विचारात पडतात. मग स्पर्धेच्या निकालासाठी गुणश्रेष्ठता धारण करणाऱ्या दैवीशक्ती पुढे येतात. त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करतात आणि सभागृहाला अपेक्षित निकाल प्राप्त होतो. कृतज्ञता त्या सोहळ्याची मानकरी ठरते. स्वाभाविकच विश्लेषणासाठी परीक्षकाच्या भूमिकेतील दैवीशक्ती समोर येते आणि आपलं विवेचन करते. बोलताना सूत्ररूपाने सभागृहापुढे ती काही गोष्टी नोंदविते.

प्रथमत: सांगते की, आपली महत्ता श्रेष्ठ असली तरीही ती इतरांनी मानावयाची असते. आपण सांगावयाची नसते. सांगण्याचा मोह आग्रहाकडून अभिनिवेशाकडे आणि हळूच अहंकाराकडे कसा सरकतो, हे ज्याचं त्यालाही समजत नाही. दिसणारी कोणतीही गोष्ट जशी दिसते तशी ती फक्त तिच्या शक्तीने दिसत नाही. डेरेदार वृक्ष टिकून राहण्यासाठी धडपड करतो हे खरं, पण त्याच्या नकळत त्याला कुणीतरी पाणीही घालतं, तो छोटा असताना कुणीतरी त्याचं जनावरांपासून रक्षणही करतो आणि सूर्यप्रकाशही न बोलता त्याच्यापर्यंत पोहचतो. हे सारं वृक्षानं मागितलेलं नसतं. पण त्याला ते मिळाले नाहीतर त्याचं आजचं वैभव त्याला प्राप्त होऊ शकत नसतं, म्हणजेच त्याची धडपड मोलाची हे खरे! पण त्याला या गोष्टी पुरविणाऱ्या साऱ्या बाबी त्याहून मोलाच्या असतात, असं वृक्षानं मानलं तर तो सर्वांबद्दल कृतज्ञ होतो. त्यामुळे तो मोठा होतो. मोठे होण्याचे खरे सूत्र स्वत:ला लहान समजण्यात आहे आणि ज्यांच्यामुळे ते झाले त्यांच्याविषयी सदैव कृतज्ञ रहाण्यात आहे.

...............................................

(लेखक धर्म, अर्थ, अध्यात्म व समाजजीवन या विषयाचे अभ्यासक आहेत. सेंट्रल हिंदू मिलीटरी एज्युकेशन सोसायटीचे ते कार्याध्यक्ष आहेत.)
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज