अ‍ॅपशहर

माणसाचा शोध

लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मृतिचित्रे' या अभिजात, अजरामर आणि श्रेष्ठ आत्मचरित्रातील हा प्रसंग. जवळजवळ निरक्षर असणाऱ्या लक्ष्मीबाईंची अक्षरसाधना थक्क करणारी. त्यांनी एक सामाजिक कादंबरी लिहायला घेतली. जोडाक्षर आले की, त्यांना थांबावे लागे.

Maharashtra Times 11 May 2018, 4:00 am

>> प्रा. अविनाश सप्रे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual


'मन कस्तुरी रे, जग दस्तुरी रे

बात हुई ना पुरी रे'

लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मृतिचित्रे' या अभिजात, अजरामर आणि श्रेष्ठ आत्मचरित्रातील हा प्रसंग. जवळजवळ निरक्षर असणाऱ्या लक्ष्मीबाईंची अक्षरसाधना थक्क करणारी. त्यांनी एक सामाजिक कादंबरी लिहायला घेतली. जोडाक्षर आले की, त्यांना थांबावे लागे. त्या सांगतात, 'मला मनुष्य काढता येईना... होती नव्हती तेवढी पुस्तके पालथी केली; पण मनुष्य कोठे सापडेना. अशा वेळी ठोमरे (बालकवी) घरात आले... म्हणाले, 'लक्ष्मीबाई, तुम्ही अशा का बसलात? काही हवे का तुम्हाला?' 'काय करू रे, मला हवा आहे मनुष्य. इतकी उलथा पालथ केली, पण तो कोठे सापडत नाही.' प्रसंग तसा साधा; पण, 'मनुष्य कुठे सापडत नाही,' या वाक्याजवळ मी थबकलो. लक्ष्मीबाईंनी भले ते जोडाक्षराच्या संदर्भात उच्चारले असेल; पण नकळत त्यांनी साहित्याचा मूलभूत हेतू आणि धर्मच सांगितला 'मनुष्य शोधण्याचा.' आता मनुष्य शोधणे म्हणजे काय? तर माणसातल्या माणूसपणाचा शोध घेणे, त्याच्यातल्या अंत:प्रवृत्तींना भिडणे, त्याच्यातले सत्त्व शोधणे. केशवसुत म्हणाले, 'पोले पाखडता तुम्ही। निवडतो ते सत्त्व आम्ही निके.' इथे आम्ही म्हणजे प्रतिभावंत आणि निके सत्त्व म्हणजे माणसातले 'माणूसपण', गुहेत राहणारा आणि शिकार करणारा आदीमानव प्राणीसदृशच होता. कालौघात आणि विकासक्रमात तो माणूस झाला. त्याने स्वत:ची संस्कृती, मूल्ये निर्माण केली. सहजीवन निर्माण केले. त्यासाठी सभ्यतेचे संकेत निर्माण केले. व्यापक अर्थाने 'मानवता' निर्माण केली आणि सृजनशील साहित्य या साऱ्याचा धांडोळा घेत आले.

असे साहित्य निर्माण करणाऱ्यांचा गौरव मॅथ्यू अर्नाल्डने 'संस्कृतीचे राखणदार' (कस्टोडियन ऑफ कल्चर) अशा सार्थ शब्दांत केला आहे. मराठीसह जगभरातल्या भाषांतील प्रतिभावंत लेखक आपल्या कथा, कादंबऱ्या, काव्य, महाकाव्य आणि नाटकांतून मनुष्याचा शोध घेत आले आहेत आणि माणूसपणाची पाठराखण करीत आले आहेत. सृजनशील साहित्याप्रमाणेच विज्ञानामध्येही मनुष्याचा शोध अखंडपणे घेतला जात आहे. डार्विनचा उत्क्रांतीवाद जगप्रसिद्ध आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत माकडापासून पुढे मनुष्य निर्माण झाला, असा त्याचा शोध होता. या शोधाने प्रचंड खळबळ माजवून दिली. प्राणी ते माणूस हे अवस्थांतर होत असताना काय काय घडामोड झाली, याचा शोध डार्विनपासून नंतरचे शास्त्रज्ञ घेत आले. फ्राईडने माणसाच्या मनाचा तळठाव घेतला आणि त्यातली विलक्षण गुंतागुंत तपासली आणि काही धाडसी वाटावेत असे निष्कर्ष सादर केले. नंतरच्या काळातल्या मनोवैज्ञानिकांनी फ्राईडचे संशोधन पुढे नेले, त्यात भर घातली. विस्तार केला. प्राण्याचा माणूस झाला तरी माणसामध्ये प्राण्याचे अवशेष शिल्लक राहिले होते. त्यांचा प्रभाव मानवी वर्तनात दिसत होता. डेस्मांड मॉरीसने माणसाचा मनुष्यप्राणी म्हणून अभ्यास केला आणि आपले निष्कर्ष 'द नेकेड एप', 'ह्यूमन झू', इंटीमेट बिहेविअर', 'मॅन वॉचिंग' अशा ग्रंथांतून सादर केले. 'मनुष्य हा स्वर्गातून भूतलावर पडलेला देवदूत नसून भूतलावरच्याच माकडाचे उन्नत रूप आहे, अशी माझी भूमिका आहे,' असे त्याने म्हटले आहे आणि आपल्या शोधातून माणसातला प्राणी दाखवून दिला आहे. अर्थात, सर्जनशील साहित्यातून असो वा वैज्ञानिक शोधातून असो, माणूस नावाचे कोडे पूर्णपणे उलगडलेले नाही आणि उलगडणारही नाही, ही वस्तुस्थिती.

कबीर नेमके हेच सांगून गेलाय, 'मन कस्तुरी रे। जग दस्तुरी रे। बात हुई ना पुरी रे' अर्थात हेही खरेच की, मनुष्याचा शोध हे न संपणारे आव्हान असले तरी शोध काही थांबलेला नाही, थांबणारही नाही. तो निरंतर चालूच राहील आणि मनुष्याच्या विस्मयकारी रूपाचे नवनवीन पैलू साहित्यातून आणि विज्ञानातून प्रकट होत राहतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज