अ‍ॅपशहर

प्रहेलिका

संस्कृत साहित्यात विनोदनिर्मितीसाठी, मनोरंजनासाठी प्रहेलिकांचा वापर केला जातो. कल्पकता, चमत्कृती, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा याद्वारेच प्रहेलिकांची निर्मिती प्रतिभावान कवींकडून झाली आहे आणि अजूनही होत आहे. वेदकाळापासून भारतात प्रहेलिका प्रचलित आहेत.

Maharashtra Times 15 Jan 2018, 1:17 am
संस्कृत साहित्यात विनोदनिर्मितीसाठी, मनोरंजनासाठी प्रहेलिकांचा वापर केला जातो. कल्पकता, चमत्कृती, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा याद्वारेच प्रहेलिकांची निर्मिती प्रतिभावान कवींकडून झाली आहे आणि अजूनही होत आहे. वेदकाळापासून भारतात प्रहेलिका प्रचलित आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sagun nirgun
प्रहेलिका


प्रहेलिका म्हणजे उखाणा, कोडे! प्रहेलिकांमधून प्रश्न निर्माण करून उत्तर देण्याची पद्धत आहे. काहीवेळा तर संपूर्ण प्रहेलिकेत प्रश्न विचारलेले असतात. रसिक वाचकांनी त्याचे उत्तर द्यावयाचे असते. तर काहीवेळा पहिल्या चरणामधून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चौथ्या चरणात दिलेली असतात.

“कस्तूरी कस्मात् जायते, को हन्ति करिणां शतम्। किं कुरुते कातर: युद्धे, मृगात् सिंह: पलायते॥”या प्रहेलिकेत पहिल्या तीन चरणात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कवीने चौथ्या चरणात दिली आहेत. कस्तुरी कोणापासून निर्माण होते? हरिणापासून! शंभर हत्तींना कोण ठार मारतो? सिंह! भित्रा युद्धात काय करतो? पळून जातो! प्रहेलिकांमुळे निराश, खिन्न झालेल्या मनाला आनंद मिळतो. मनाला उभारी येते. उत्साह वाढतो. कार्यतत्परता प्राप्त होते. बुद्धीला चालना मिळते.

प्रहेलिका म्हणजे उखाणा! मराठी साहित्यात, लोकवाङ्मयात उखाण्यांची रेलचेल आहे. ज्ञान आणि मनोरंजन हा उखाण्यांचा उद्देश असतो. समयोचित प्रसंगी उखाणे घेतले जात असतात किंवा उखाणा सांगून उत्तर विचारले जाते. प्रश्न आणि उत्तर या दोहोतून उखाणा बनतो. प्रश्नात एखादी गोष्ट लपविली जाते आणि उत्तरात तिचा गौप्यस्फोट होतो. म्हणूनच गोपनीयता हा उखाण्याचा प्राण असतो. उखाण्याची घडण हृद्य आणि नेटकी असते. लहान मुलांच्या खेळातही उखाण्यांचा वापर केला जातो.

घमघम घमाटा, सोन्याची घंटा

विषाचा काटा, त्यात गोड गोटा …

फणसाच्या आतले पिवळे धमक गरे, पिकल्याचा दरवळ आणि त्यावरचे काटे यांना उद्देशून हा उखाणा. महाराष्ट्र आणि कर्नाटकात विवाहाच्या मंगलप्रसंगी पत्नीने पतीचे आणि पतीने पत्नीचे नाव उखाण्यात गुंफून घेण्याची पद्धत आहे. यात धार्मिकतेपेक्षाही विनोदनिर्मिती आणि निखळ आनंद मिळविण्याचा मुख्य हेतू असतो. उखाणा आणि कथेतील एखादा प्रसंग गुंफून नाव घेण्याची पद्धतही काही ठिकाणी असते.

प्रहेलिकेचा अर्थ उखाणा तसा कोडे असाही आहे. चाणाक्ष, प्रसंगावधानी, हजरजबाबी माणसे पटकन कोड्याचे उत्तर सांगून टाकतात. निसर्गत: उपजतच काही माणसांना कोडी सोडवणे खूप आवडते. त्यामुळे बुद्धीला चालना मिळते. रेल्वे-बसमध्ये गर्दीतही काही प्रवासी वृत्तपत्रातील कोडी सोडवत आनंद घेत असतात. जीवन हेही एक कोडेच आहे. शास्त्रज्ञ-संशोधक निसर्गातील कोडी सोडवत असतात. काहीवेळा निसर्गातील एक कोडे सुटते पण त्यामुळे आणखी काही नवीन कोडी निर्माण झालेली आढळून येतात. जीवनातील काही कोडी लवकर सुटतात तर काही कोडी सोडविण्यात आयुष्य निघून जाते.

सामान्य माणसांना तर ‘खरं काय आणि खोटं काय’ याचेच कोडे पडते. जातिधर्माच्या नावाने जेव्हा लोकांची माथी भडकवली जातात, “वीज वापरा पण बिल भरू नका” असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा मोठे कोडे पडते. जबाबदार लोक बेजबाबदार विधाने करतात ते पाहून, धार्मिकस्थळी चाललेला व्यापार पाहून, ढोंगी साधूंमागे हजारो लोक जातात, तेव्हाही कोडेच पडते.

आपण पाहतो की निसर्गात प्राणी प्राण्यांसारखे वागतात, पक्षी पक्ष्यांसारखे वागतात. परंतु माणूस मात्र माणसासारखा माणुसकीने वागताना दिसत नाही. मग ‘पंचतंत्रा’तील ती कथा आठवते. अस्वल, वाघ आणि शिकारी यांच्या कथेत अस्वल झाडावर शिकाऱ्याला आपल्या मांडीवर झोपायला सांगते. वाघाने आग्रह केला तरी माणसाला ते खाली टाकत नाही. नंतर माणसाच्या मांडीवर अस्वल झोपते. वाघाने सांगितल्यावर माणूस अस्वलाला खाली टाकण्यास तयार होतो. तेव्हढ्यात अस्वल जागे होऊन दुसऱ्या फांदीवर जाते आणि म्हणते, “माणूस हा स्वार्थी, विश्वासघातकी आहे. अशा माणसाचा सहवासही नको.’’ पशूंनासुद्धा समजलेल्या माणसाच्या अशा कृतघ्नपणाचे, स्वार्थीपणाचे कोडे मात्र कधीच सुटत नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज