अ‍ॅपशहर

शवासनाची शिकवणी

शवाशी कोणी जन्मोजन्मीचे नाते ठेवू शकत नाही. पण जिवंतपणी मात्र माणसाचा जीव सभोवती पसरलेल्या प्रत्येक कणाच्या हजाराव्या भागातही कमालीचा गुंतलेला असतो.

Maharashtra Times 17 Mar 2016, 4:00 am
योगासनांच्या वर्गांमध्ये शिकवणी संपता संपता शरीरावर आलेला ताण शिथील करण्यासाठी शेवटचं आसन ‘शवासन’ करायला लावतात. केवळ शिकवणीच्या वर्गातच नाही तर कुठेही योगासनं केली की शेवटी शवासन ठरलेलं असतं. शवासन म्हणजे शवासारखे पडून राहणे. हात-पाय आणि सारं शरीर सैलावून निर्विचार अवस्था प्राप्त करण्याची अपेक्षा या शवासनाकडून असते. काही लोकांना शवासनाच्या सुखद अवस्थेत झोप लागते. त्यामुळे शवासन हे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
शवासनाची शिकवणी


आनंदासनच

बनते. म्हणून शवासनाची सारे जण वाट पाहतात. एकतर आधीची आसनं संपलेली असतात आणि शवासन शरीराला सुखदायी वाटत असते. दुसरं म्हणजे, शवासन सहज करता येते. पण खरंतर सगळ्या आसनांमध्ये शवासन सगळ्यात अवघड आसन आहे. कारण ते वर्तमानाशी नाते जोडायला शिकवते.

निष्प्राण शरीराला सामान्यत: शव म्हणतात. शव-कलेवर-मृतदेह हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. माणूस मरण पावला की त्याचे शव तास-दोन तास-चार तास घरात ठेवतात आणि मग विधिवत निष्प्राण देहाला निरोप दिला जातो. शवाशी कोणी जन्मोजन्मीचे नाते ठेवू शकत नाही. पण जिवंतपणी मात्र माणसाचा जीव सभोवती पसरलेल्या प्रत्येक कणाच्या हजाराव्या भागातही कमालीचा गुंतलेला असतो. या गुंतवणुकीचा मोह शंभर वर्षांचे आयुष्य मिळाले तरी किंचितही सुटत नाही. भोवतीचे अनेक लोक नाना कारणांनी मृत्युलोकात जातात. त्यांच्या अंत्ययात्रेस जावे लागते. तेथील वातावरणात जीवनाच्या भंगुरतेचा साक्षात्कार होतो आणि स्मशानभूमीतून बाहेर येऊन घरी जाऊन आंघोळ उरकली की त्या आंघोळीसोबत भंगुरता वगैरे विचार पाण्यासोबत वाहून जातात! शवासन या नश्वरतेची वेळोवेळी जाणीव करून देते. शवासारखे पडून राहणे म्हणजे निदान त्या वेळेपुरते तरी मोहमायेपासून अलिप्त होणे. हाच संदेश शवासन वारंवार सांगत राहते. जीवनाचे अंतिम सत्य मृत्यू हेच आहे. हे कठोर वास्तव परखडपणे विदित करणारे शवासन माणसाला सतत वर्तमानात वावरण्यासाठी सजग करते. पण खरोखर तुम्ही-आम्ही, आपण सारे कितपत सजग होतो आणि सजग होऊन शहाणे होतो? खूप मोठा प्रश्न आहे हा. शवासनाची सुखद जाणीव हवीहवीशी असते. पण त्यापासून प्राप्त होणारा सुस्पष्ट संदेश कितीजणांना समजतो आणि समजणाऱ्यांपैकी किती तो स्वीकारण्याचा तसेच पचवण्याचा प्रयत्न करतात?

संत तुकारामांनी जिवंतपणे मृत्यू पाहिल्याचे वर्णन ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा’ या अभंगात केले आहे. हे वर्णनही खरेतर शवासन करा, असा गर्भित उपदेशच आहे. शरीराच्या प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म हालचालीपासून सभोवती असणाऱ्या प्रत्येक झाडाच्या हलणाऱ्या पानापानांवर कोणत्यातरी अद्‍भुत शक्तीची सत्ता आहे. ज्या शक्तीला ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे कोणी कोणतेही नाव देऊ शकेल. ही शक्ती प्रत्येक सजीवात वास करते आणि तिचा निवास संपला की पुढच्या क्षणी सजीवाचे शव बनते. मग असे असेल तर, तुमच्या-आमच्या हाती काहीच नाही, हेच यातून सिद्ध होते आणि तरीही माझ्याकडून किंवा माझ्याभोवती होणारे-घडणारे सारेकाही माझीच किमया आहे, हा भ्रम अगदी परिपक्व वयात, शरपंजरी अवस्थेतही दूर होत नाही. यासारखे दुर्दैव दुसरे कोणते?

‘शवासन’ हेच नेमकेपणाने समजावते. ‘बाबा रे, वर्तमानात जग! जग काल होतं, आज आहे आणि उद्याही राहील. तुझा कालखंड संपला की तू जाणार आहेस. तेव्हा तुला या अशाश्वततेचा साक्षात्कार झाला की तू भोवतीच्या जगाशी आपोआप सहृदयतेने वागशील,’ हाच अद्‍भुत दिव्य संदेश शवासनाकडून आपल्याला घ्यायचा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज