अ‍ॅपशहर

अभिमान आणि अहंकार

Maharashtra Times 23 Aug 2016, 4:00 am
माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे अहंकार. कुणाला संपत्तीचा अहंकार, तर कुणाला विद्वत्तेचा. कुणाला पदाचा, तर कुणाला कर्तृत्वाचा. अहंकारामधील मूळ शब्द अहम् हा आहे. कोणत्याही व्यक्तीला अहम् भावना ही कार्योद्युक्त करीत असते यात शंका नाही. अहम् सुखावला की माणूस पाऊल पुढे टाकतो आणि त्याच्या अंगात उत्साह संचारतो. एवढ्या मर्यादित अर्थानं अहंभाव योग्यच आहे. सामान्य संसारी माणसांना भौतिक जीवनात यश संपादन करण्यासाठी हा अहम् उपयोगी आहे. मात्र, त्याचा अतिरेक झाला तर तोच अहम् स्वत:च्या आणि इतरांच्याही नाशाला कारणीभूत होतो. विधायक अहम् म्हणजे अभिमान! विघातक अहम् म्हणजे अहंकार!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
अभिमान आणि अहंकार


एकदा एका साधकानं गुरूला प्रश्न विचारला, ‘अहम् नसेलच तर जीवनाला ऊर्जा मिळणार नाही. मग अहम् आणि अहंकार, अभिमान यांचा ताळमेळ कसा?’ गुरू म्हणाले देईन याचं उत्तर. त्यावेळी गुरूंच्या आश्रमात भोजनवेळेला त्यांनी त्या साधकाला निमंत्रित केलं. एका ठिकाणी काही पानं मांडली होती. गुरूवर्य साधकाला म्हणाले, ‘भोजनवेळ झाली आहे. आता अन्नग्रहण करून मगच जा.’

त्या दिवशी या साधकाच्या जेवणात एकाही पदार्थात मीठ नव्हतं. साधक जेवू लागला; पण त्याला रस वाटेना. त्यानं कसेबसे काही घास घेतले आणि पहिली वाढ संपताच त्यानं कोणताही पदार्थ घेतला नाही. अन्नाला नावं ठेवायची नाहीत, म्हणून तो आरंभी वाढलेलं सर्व आळणी जेवण जेवला. गुरूवर्यांनी साधकाला दुसऱ्या दिवशीही निमंत्रित केलं. त्या जेवणात योग्य प्रमाणात मीठ होतं. साधकाला ते रूचकर जेवण आवडलं आणि त्यादिवशी त्यानं पोटभर अन्नग्रहण केलं. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.

गुरूवर्यांनी त्याला तिसऱ्या दिवशीही निमंत्रित केलं.

आज भरमसाट मीठ घातलं होतं. पहिला घास घेताच साधकानं चेहरा कसनुसा केला आणि मला बरं वाटत नाहीये, असं सांगून तो पानावरून उठला. गुरूवर्य म्हणाले, ‘अरे तुला जात नसेल तर ते ताट दुसऱ्या कुणाला तरी दे.’ तो म्हणाला, ‘गुरूवर्य, मला तर नकोच, पण दुसऱ्या कुणालाही या अन्नाची चव आवडणार नाही, उपयोग नाही. कारण जेवण खारटघोट झालंय.’

गुरू म्हणाले, ‘होय ना, या जेवणाचा तुला उपयोग ना दुसऱ्याला. तुझ्या शंकेचं समाधान यातच झालंय. तू पहिल्या दिवशी भोजन घेतलंस ते अळणी होतं. तुला ते अन्नग्रहण करण्यात रस वाटला नाही. दुसऱ्या दिवशी माफक मीठ घातलेलं अन्न तुला आवडलं. त्यातून जीवनरस मिळाला. तिसऱ्या दिवशी मिठाचा अतिरेक झाला. अहंकाराचं म्हणजे अहम् चे मीठ योग्य प्रमाणात असलं तर जेवण (जीवन) चवदार होतं. नसलं तर जेवण अळणी होतं. पण अहम् चा अतिरेक झाला तर जेवण (जीवन) नासतं.’

म्हणूनच जीवन जगायचं असेल तर अहम् चे मीठ प्रमाणात असावं. त्याला अभिमान म्हणतात. अभिमानाचं मीठ अतिप्रमाणात झालं तर त्याला अहंकार म्हणतात. साधक समजायचं ते समजला. म्हणून संतांनी म्हटलंय, ‘अहंकाराचा वारा न लागो माझ्या चित्ता.’ अहंकारानं उन्मत झालेल्या गर्वोन्नतांच्या माड्या केव्हाच कोसळतात आणि या उलट नम्रता आणि विनय यांनी ज्याचं जीवन समृद्ध झालंय ते टिकून राहतात.

नीचपण बरवे देवा, न चले कोणाचाही हेवा

महापुरे झाडे जाती, तेथ लव्हाळे राहती।

तुकोबांनी सार्थ दृष्टांत देऊन हे सहजसोप्या भाषेत सांगितलंय. नम्रता म्हणजे लाचारी नव्हे, विनय म्हणजे भित्रेपणा नाही. नम्रता आणि विनयशीलता यांच्याबरोबरीने अभिमानही असू शकतो. मात्र, अभिमानाच्या जोडीला विनयशीलता नसेल तर त्याचं रूपांतर अहंकारात होतं. अहंकार तपश्चर्येचाही असतो. हिरण्यकश्यपूला असा अहंकार झाला होता म्हणून तर नृसिंहाला प्रकट होऊन त्याचं उदरविदारण करावं लागलं. अहंकाराचा शेवट विनाशच असतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज