अ‍ॅपशहर

संतांचा भवताल

Maharashtra Times 23 Dec 2016, 4:00 am
सर्वजनांवर आपल्या भक्तिमार्गाचं गारूड पसरवून परमार्थाची शिकवण देणाऱ्या संत मंडळींचं भवतालावरचं प्रेमच अभंगवाणीच्या रुपात त्यांच्या अंतरातून बाहेर डोकावून आजही जगाला पैसाच्या खांबाकडे खुणावत असावं. इतर प्राणिमात्रांना माझे भय वाटायचे कारणच काय? जर सर्व प्राणिमात्र एकच चैतन्यस्वरुप आहेत तर ते साम्यत्वानं अनुभवास यायला हवेत. कोणताही प्राणी हा माझेच रूप आहे, असे मला वाटले पाहिजे. जोंधळ्याच्या कणसातले दाणे टिपणारे पक्षी आपल्या नुसत्या चाहुलीने उडून गेल्याचे पाहून, त्याविषयी कळकळ व्यक्त करताना तुकाराम महाराज म्हणतात, ‘अवघी भूते साम्या आली’ !
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
संतांचा भवताल


सगळ्या विश्वातील चराचराबद्दलचं ममत्व हे आपल्याला सबाह्य अंतरी एकच होण्याचा अनुभव कसा देत असतं, याचा साधा मार्ग, धन्याचे भांडार फोडून, संतांनी सांगितलाय खरा. पण? अगोचराचा स्पर्श होऊनही तो स्पर्शच अगोचर होणारं भक्तिमार्गातील उच्चकोटीचं अनुभव-सत्य सांगताना, केवळ नामस्मरणाच्या कानमंत्राची अत्तराची बोथी, एक्स्चेंज ऑफर म्हणून संतांनी भक्तांना दिली आहे. ही गोष्ट शेळीची हिंसा करून लांडग्यांच्या नाटकी आविष्काराला हुरळून जाणाऱ्या कर्मठांना, पारंपरिक नि आधुनिक बुवांच्या व्यापारी केंद्रांच्या मोहोळात मात्र अनुल्लेखनीय वाटावी.

चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा नरदेह (आणि नारीदेह?) प्राप्त होतो, या पुराण मताच्या पुढे जावून असे असेल तर चराचराबद्दलचं ममत्व मनुष्यदेहाला शोभनीय का असावे या अज्ञेय प्रश्नाचे मोठे रसाळ उत्तर संतानी, तृप्त जीवनासाठी नामस्मरणाचा मार्ग दाखवताना त्यांच्या अभंगवाणीतून भवतालाच्या वेगवेगळ्या दाखल्यातून दिलेले आढळावे.

वसुधैव कुटुंबकम्! पृथ्वीतलावरील पशुपक्षी, जलचर, वनस्पती यासह हे सहजीवन हा मनुष्यदेह अनुभवत असतो किंवा त्याच्याशी फटकून असतो. त्यामुळे या सर्वांविषयी भेटीलागी आस लागल्याखेरीज या देहाचे सार्थक कसे व्हावे? दर्शनी इतका सोपा वाटणारा किती साधा मार्ग आहे नाही? केवळ सार्वजनिक वाहनांच्या रंगसफेदीसाठी उपयुक्त वाटणाऱ्या, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या ओळी पाहता, भवतालाची चाललेली निर्विवाद हेळसांड पाहून, अंतर्यामी झालेल्या वेदनेच्या कळवळ्यातून, संतांनी या ओळी उद‍्गारल्या असल्याचे जाणवावे. पर्यावरणाचे भान केवळ कुबट सनातनी विचारांच्या निर्माल्यांचे ढीग साचलेल्या नि उबलेल्या गाभाऱ्यात बसून येत नसावे. त्यासाठी विश्वाच्या अंगणात उभं राहून, ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर...’, पाहता यावा लागत असावा. ‘तुजं पोरगं जगावं म्हणून त्या शेळीच्या पोराला कापून बळी देतोस व्हय?’ असा अंधश्रद्धेला अनुत्तरीत प्रश्न विचारून, जनजागर घालणारी गाडगेबाबांची ‘वन् मॅन आर्मी’ पाहता, तुळशीमाळ घालून गळा, टाळ कुटत बसण्याचे कर्मकांड कधीही न केलेल्या संत मंडळींना, चंद्रभागेच्या वाळवंटात विठोबा कसा काय गावला असेल, याचे उत्तर आपल्याला सापडावे. एसटीच्या सुखकर प्रवासाचे अजीर्ण नको म्हणून पंढरीला जाण्याचे टाळताना ‘कुठे जायचे दूर, आता इथेच पंढरपूर’, असे सोयीस्कर भारूड पुढे करता येत असेलही; पण तीर्थ, क्षेत्र आणि देहसुद्धा विठ्ठल झाल्यावर पंढरीला जाणे ही केवळ या देहमेण्याची औपचारिकताच रहात असावी. जसं मिळालेल्या भूमिकेचा कलाकार भक्त झाला, तरच या जगाच्या रंगभूमीवरचे नाटक प्रेक्षकाला विभक्त वाटत नसतं, तसं हे वाटावे.

हो पण हे सर्व समजेच्या पलीकडे असलेल्या ‘सुयोधनांना’ कसे कळावे, कारण ते अमंगळ तेवढेच आयुष्यभर चिवडत बसणार. त्यामुळे हा प्रश्न पडलेले तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे काय उपदेश खळा, न्हाउनी काऊळा खते धुंडी । तमाचे शरीरी विटाळचि वसे, विचाराचा नसे लेश तो ही ।।’ अर्थात, कावळ्याच्या गळा मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ।। असेही म्हटले आहे. भवतालातील चराचराचे संतांचे भान म्हणजे आपल्याला पसायदानच म्हणायचे !

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज