अ‍ॅपशहर

‘ज’ जगण्याचा…

माझी नात इंग्रजी माध्यमातून शिकलेली. ‘केजी टू पीजी’ ही तिची पठडी. कळायला लागल्यापासून वास्तव्य शहरात. परवा मी सहजच तिला विचारलं, ‘रिंकू बेटा, शेतकरी म्हणजे कोण?’ तिनं एका झटक्यात उत्तर दिलं, ‘शेतकरी म्हणजे जो आत्महत्या करतो तो’. तिच्या त्या उत्तरानं मी एकदम चक्रावलो.

Maharashtra Times 11 Aug 2016, 3:07 am
माझी नात इंग्रजी माध्यमातून शिकलेली. ‘केजी टू पीजी’ ही तिची पठडी. कळायला लागल्यापासून वास्तव्य शहरात. परवा मी सहजच तिला विचारलं, ‘रिंकू बेटा, शेतकरी म्हणजे कोण?’ तिनं एका झटक्यात उत्तर दिलं, ‘शेतकरी म्हणजे जो आत्महत्या करतो तो’. तिच्या त्या उत्तरानं मी एकदम चक्रावलो. आतून पार कोसळलो. कसा आला हा काळ? अवकाळी पाऊस माहीत होता. आता हा अवकाळ! सगळीच उलटापालट करणारा. शब्दांचे अर्थ बदलून टाकणारा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmer suicide
‘ज’ जगण्याचा…


आमचा मराठवाडा तसा बारामाही दुष्काळ. यंदाच्या दुष्काळाने कहर केला. दुष्काळात पूर्वी कुठे कुठे आत्महत्या व्हायच्या. अधुनमधून बातम्या यायच्या. २०१६ हे वर्ष मात्र जणू ‘दुष्काळनाम संवत्सर’च ठरलंय. आता तर दुष्काळवाडा म्हणजे मराठवाडा असंच नामांतर झालंय. दुष्काळाविषयी यापूर्वीही वाडवडिलांकडून खूप ऐकलेलं. १९७३ चा दुष्काळही अनुभवलेला आणि आता २०१६ चा दुष्काळ. कुठेना कुठेतरी आत्महत्या सुरूच. दूरदर्शन, वृत्तपत्रे, मोबाइलवर समाजमाध्यमातून एकसारख्या त्याच त्या वार्ता, सर्वत्र एकच चर्चा- आत्महत्या आणि शेतकरी. काही कळो न कळो, इच्छा असो-नसो. रिंकूच्या कानी सतत हे पडलेलं. मनावर ठसलेलं. त्यातूनच आलेलं हे उत्तर. ‘आत्महत्या करतो तो शेतकरी’. शब्दाचे अर्थ बदलून टाकणारा असा अनर्थकारी काळ! ‘नांगरधारी’ शेतकरी आता ‘आत्महत्याकरी’ बनला. पुढे-मागे शब्दकोशात हाच अर्थ उरला तर? नाहीतरी आपलं जगणंच शब्दांत उतरतं. १९७२ च्या दुष्काळात मी स्वतःच सहज लिहून गेलो,

‘जमिनीवरचे पाणी

कुठे गेले? कुठे गेले?

ज्याच्या-त्याच्या डोळ्यांत आले’

माझा आकान्त शब्दांत असा संक्रान्त झाला. मग आत्महत्या करतो तो शेतकरी, दुष्काळवाडा म्हणजे मराठवाडा असे विपरीत घडू लागले तर जगण्यापेक्षा मरण बरे म्हणायची वेळ.

विचार, भाव-भावना, संवेदना दिसत नाहीत; पण जाणवतात मात्र निश्चित. जाणवणारे नकळत शब्दांत उतरते. त्यातूनच आपली भाषा सिद्ध होते. मानवी उद‍्गार म्हणजे त्याचे पहिले उच्चारण. तो पहिला वर्ण. त्यातून वर्णमाला बनते. आधी वर्ण, नंतर अक्षर आणि मग शब्द. शब्दानंतर पुढे बाराखडी असा हा क्रम. उद्या ‘दु’ दुष्काळाचा असा अर्थ निघू लागला तर…

आज ‘भ’ भटजीचा, ‘य’ यज्ञाचा, वगैरे वर्णमाला मनोमन आठवा. काय जाणवते? शहामृग न पाहिलेल्या बाळाला कोणता बाळबोध होईल? ‘अ’ अननसाचा शिकताना मी स्वतः अननस पाहिलेला नव्हता. आगगाडी न पाहिलेल्या मला ‘आ’ आगगाडीचा हे शिकावे लागले. खूप उदाहरणे देता येतील. औत, विटी-दांडू, आट्यापाट्या, जू, शिवळ, येठण, कासरा, म्होरकी, मुंगसं, जोतं इत्यादी शब्दांचे अर्थ केजी लोअर-अप्पर करणाऱ्या मुलांना कसे शिकवणार? यावर तसे खूप काही लिहिता येईल. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला मी विचारले, तुला जे मराठीचे (सुगमभारती की सुलभ भारती?) पुस्तक अभ्यासासाठी लावले आहे, त्यात माझी एक कविता आहे. ती ठाऊक आहे का? तेव्हा निरागसतेने त्याने उत्तर दिले, ‘नाही.’ मग कवितेचे नाव सांगितले ‘एक पावसाळी संध्याकाळ’, तर तो लगेच उत्तरला, ‘पोएम म्हणा ना, आहे!’. कवितेला पोएम म्हणतात, हे त्याला कळलेच नव्हते आणि मॅडम किंवा टीचर यांनी ते सांगितलेले नव्हते. अक्षर, लिपी, अंक, सारे सारे जगण्यातून येते. यायला हवे. आपण नेमका उलटा प्रकार करतो. अक्षरात जगणे शोधत बसतो. मग जगण्याचा अर्थ लावण्यासाठी अक्षरे जुळवीत बसतो.

‘क’ कमळाचा अशा धर्तीवर उद्या ‘आ’ आईचा न राहता ‘आ’ आत्महत्तेचा होऊ नये म्हणजे झालं. नाहीतरी जमिनीला आपण काळी आई मानतो, हे तरी आजच्या मुलांना कुठे ठाऊक आहे? पुढे-मागे ‘भ’ची बाराखडी शिकवताना ‘भा’ भाकरीचा येवढा तरी अर्थ उरावा ही अपेक्षा. ‘भू’ भुकेचा इतकेतरी कळेल. ‘म’ मरणाचा कळायला आधी मरावे लागते असे थोडेच आहे?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज