स्वानंद कुलकर्णी
पावसाळा सुरू होईल. निर्झर खळाखळा वाहू लागतील. ऐल तटावरून पैल तटावरून निळे सावळे झरे बेटाबेटांतून वाहू लागतील आणि हिरवाई घेऊन सुख समृद्धीची स्वप्ने देतील. विहिरीमध्ये, तळ्यामध्ये काही ठिकाणी कायमस्वरूपी नैसर्गिक पाझर असतात. सुखाशी नाते सांगणारे आणि दुःखाशी संवाद सांधणारे हे निर्झर! निर्झर खेळकर असतात, निर्झर खोडकर असतात. शुद्धतेचे स्वरूप म्हणजे निर्झर, प्रेमाचा सारांश म्हणजे निर्झर, प्रवाहाचा मंत्र म्हणजे निर्झर. थोडक्यात, जीवनाचा अर्थ म्हणजेच निर्झर ! कारण निर्झर हे मूळ स्वरूप आहे. तो जमिनीखालून जमिनीवर येणारा जलाचा आविष्कार आहे. कोणतेही सृजन प्रेममयच असते. निर्झर चैतन्याचा, गतिमानतेचा मंत्र देतो म्हणून तो प्रवाहाचा मंत्र आहे. मूळ स्वरूपाशी नाते ठेवणे, प्रेममय जगणे आणि चैतन्यमय राहणे हेच साध्य असेल तर निर्झर जीवनाचा अर्थच आहे. कारण निर्झर घेत तर काहीच नाही, पण देत राहतो.
पु. ल. देशपांडे यांनी विनोबांबद्दल लिहिले होते, 'दिवसभरात मला मिळाले किती, यापेक्षा त्या दिवसात मी दिले किती, हा विचार करणे म्हणजे सुसंस्कृत म्हणून जगणे हा माझ्यासारख्या सामान्य माणसाने विनोबांच्या उच्चारातून व आचारातून काढलेला अर्थ आहे.' खरेच आपले घेण्याचे क्षण किती असतात आणि देण्याचे क्षण किती असतात.
आल्फ्रेड नोबेल, बिल गेट्स, अझीम प्रेमजी यांनी असे देण्याचे क्षण मिळविले. आपण देतो देतो म्हणजे तरी काय देत असतो. सुदाम्याच्या हातांनी पोह्याची पुरचुंडी योगेश्वराच्या हातात ठेवत असतो. जे समाजाचे आहे तेच समाजाला द्यायचे असते. आपल्याकडे असेल ते ईश्वरतत्त्वाला, उदात्ततेला अर्पण करायचे असते. दिल्याने सुदाम्याची नगरीच सुवर्णाची झाली तसे आल्फ्रेड नोबेल, बिल गेट्स, अझीम प्रेमजी यांसारख्यांचे जीवन सोनेरी होऊन झळाळून गेले.
पण मी, माझे, मला, केवळ मी, एकटे माझे कुटुंब ही भावना म्हणजे शेजाऱ्याचे घर जळताना मला काय त्याचे ही भावना होय. ही भावना आपले अस्तित्वच भस्मसात करते.
'हजार डोळ्यांमधले पाणी, माझ्या डोळ्यांमध्ये जमते. हजार हृदये गहिवरती तर, मन माझेही गहिवरते. असे हजारांसंगे आहे, जडलेले माझे नाते', हे कुसुमाग्रजांनी सांगितलेले नाते जपले तर सुसंस्कृत म्हणून जगणे होईल. राजा राममोहन रॉय यांनी सतीची प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व अखेर तसा कायदा करवून घेतला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्त्री शिक्षण, पुनर्विवाह, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक सुधारणा याद्वारे लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला सजीवतेची ऊब दिली. न्यायमूर्ती रानडे काय किंवा अस्पृश्यता निवारणाच्या कामाला विधायक बळ देणारे विठ्ठल रामजी शिंदे काय, यांचे आयुष्य घेण्याच्या क्षणांपेक्षा देण्याच्या क्षणांनीच भरून वाहिले.
'जीवन ही निसर्गाची देणगी असते, पण सुंदर जगणे ही शहाणपणाची देणगी असते,' हे प्रसिद्ध ग्रीक वचन आहे. बर्ट्राड रसेल या विचारवंताने सांगितले आहे की, आयुष्याने केवळ आयुष्याला समर्पण करणे पशुवत आहे. आयुष्याच्या पलीकडे असणाऱ्या आदर्शांशी कटिबद्धता निर्माण झाली, तर आत्मिक सामर्थ्य आणि मनःशांती देणारे आयुष्य निर्माण होईल. अशा स्वरूपाची आदर्शांची कटिबद्धता देण्याच्या क्षणांतून मिळत असते.
आई बाळाला अलौकिक प्रेम देत असते. शिक्षक ज्ञान देतात आणि कर्तव्य जप ही शिकवण देतात. वडील व्यवहार शिकवितात. कुटुंबीय आणि मित्र आपले समाजशील अस्तित्व जपण्याचे दान देतात आणि आता आपण सर्वांना द्यायचे असते. इतरांची गरज आहे म्हणून नव्हे तर, आपले जगणे सुसंस्कृत करण्यासाठी! 'बुडती हे जन न देखवे डोळा', असे म्हणून इतरांच्या बाबतीतील कळवळ्याचा निर्झर जेव्हा हृदयामधून फिरतो तेव्हा 'आत आपला झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जीवन म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद' अशा आनंदाचा तो धनी होतो.
पावसाळा सुरू होईल. निर्झर खळाखळा वाहू लागतील. ऐल तटावरून पैल तटावरून निळे सावळे झरे बेटाबेटांतून वाहू लागतील आणि हिरवाई घेऊन सुख समृद्धीची स्वप्ने देतील. विहिरीमध्ये, तळ्यामध्ये काही ठिकाणी कायमस्वरूपी नैसर्गिक पाझर असतात. सुखाशी नाते सांगणारे आणि दुःखाशी संवाद सांधणारे हे निर्झर! निर्झर खेळकर असतात, निर्झर खोडकर असतात. शुद्धतेचे स्वरूप म्हणजे निर्झर, प्रेमाचा सारांश म्हणजे निर्झर, प्रवाहाचा मंत्र म्हणजे निर्झर. थोडक्यात, जीवनाचा अर्थ म्हणजेच निर्झर ! कारण निर्झर हे मूळ स्वरूप आहे. तो जमिनीखालून जमिनीवर येणारा जलाचा आविष्कार आहे. कोणतेही सृजन प्रेममयच असते. निर्झर चैतन्याचा, गतिमानतेचा मंत्र देतो म्हणून तो प्रवाहाचा मंत्र आहे. मूळ स्वरूपाशी नाते ठेवणे, प्रेममय जगणे आणि चैतन्यमय राहणे हेच साध्य असेल तर निर्झर जीवनाचा अर्थच आहे. कारण निर्झर घेत तर काहीच नाही, पण देत राहतो.
पु. ल. देशपांडे यांनी विनोबांबद्दल लिहिले होते, 'दिवसभरात मला मिळाले किती, यापेक्षा त्या दिवसात मी दिले किती, हा विचार करणे म्हणजे सुसंस्कृत म्हणून जगणे हा माझ्यासारख्या सामान्य माणसाने विनोबांच्या उच्चारातून व आचारातून काढलेला अर्थ आहे.' खरेच आपले घेण्याचे क्षण किती असतात आणि देण्याचे क्षण किती असतात.
आल्फ्रेड नोबेल, बिल गेट्स, अझीम प्रेमजी यांनी असे देण्याचे क्षण मिळविले. आपण देतो देतो म्हणजे तरी काय देत असतो. सुदाम्याच्या हातांनी पोह्याची पुरचुंडी योगेश्वराच्या हातात ठेवत असतो. जे समाजाचे आहे तेच समाजाला द्यायचे असते. आपल्याकडे असेल ते ईश्वरतत्त्वाला, उदात्ततेला अर्पण करायचे असते. दिल्याने सुदाम्याची नगरीच सुवर्णाची झाली तसे आल्फ्रेड नोबेल, बिल गेट्स, अझीम प्रेमजी यांसारख्यांचे जीवन सोनेरी होऊन झळाळून गेले.
पण मी, माझे, मला, केवळ मी, एकटे माझे कुटुंब ही भावना म्हणजे शेजाऱ्याचे घर जळताना मला काय त्याचे ही भावना होय. ही भावना आपले अस्तित्वच भस्मसात करते.
'हजार डोळ्यांमधले पाणी, माझ्या डोळ्यांमध्ये जमते. हजार हृदये गहिवरती तर, मन माझेही गहिवरते. असे हजारांसंगे आहे, जडलेले माझे नाते', हे कुसुमाग्रजांनी सांगितलेले नाते जपले तर सुसंस्कृत म्हणून जगणे होईल. राजा राममोहन रॉय यांनी सतीची प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व अखेर तसा कायदा करवून घेतला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्त्री शिक्षण, पुनर्विवाह, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक सुधारणा याद्वारे लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला सजीवतेची ऊब दिली. न्यायमूर्ती रानडे काय किंवा अस्पृश्यता निवारणाच्या कामाला विधायक बळ देणारे विठ्ठल रामजी शिंदे काय, यांचे आयुष्य घेण्याच्या क्षणांपेक्षा देण्याच्या क्षणांनीच भरून वाहिले.
'जीवन ही निसर्गाची देणगी असते, पण सुंदर जगणे ही शहाणपणाची देणगी असते,' हे प्रसिद्ध ग्रीक वचन आहे. बर्ट्राड रसेल या विचारवंताने सांगितले आहे की, आयुष्याने केवळ आयुष्याला समर्पण करणे पशुवत आहे. आयुष्याच्या पलीकडे असणाऱ्या आदर्शांशी कटिबद्धता निर्माण झाली, तर आत्मिक सामर्थ्य आणि मनःशांती देणारे आयुष्य निर्माण होईल. अशा स्वरूपाची आदर्शांची कटिबद्धता देण्याच्या क्षणांतून मिळत असते.
आई बाळाला अलौकिक प्रेम देत असते. शिक्षक ज्ञान देतात आणि कर्तव्य जप ही शिकवण देतात. वडील व्यवहार शिकवितात. कुटुंबीय आणि मित्र आपले समाजशील अस्तित्व जपण्याचे दान देतात आणि आता आपण सर्वांना द्यायचे असते. इतरांची गरज आहे म्हणून नव्हे तर, आपले जगणे सुसंस्कृत करण्यासाठी! 'बुडती हे जन न देखवे डोळा', असे म्हणून इतरांच्या बाबतीतील कळवळ्याचा निर्झर जेव्हा हृदयामधून फिरतो तेव्हा 'आत आपला झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जीवन म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद' अशा आनंदाचा तो धनी होतो.