अ‍ॅपशहर

कवितेच्या दिव्याखाली…

अलीकडे कुणी कवी म्हणून आपला परिचय देताच लोक कधी त्याच्याकडे, कधी एकमेकांकडे वेगळ्याच नजरेनं पाहतात. नव्या लिहित्यांना रसिक ‘सिरीअसली’ घेत नाहीत असे नाही.

Maharashtra Times 12 Jul 2017, 1:25 am
विंदा म्हणतात, ‘कवी थोडे कवडे फार’. कवींमधले ‘कवडे’ कसे ओळखायचे? हे काम तसं अवघडच! कारण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कवीनं कसं लिहावं, काय लिहावं हे कोण सांगणार? व‌िंदाही सांगू शकले नाहीत. सर्व वाङ्‍मय प्रकारात काव्यविधा ही अग्रणी आहे, परंतु सर्व साहित्यिक प्रतिभावंतात अलीकडचा कवी हा अग्रणी आदराला पात्र ठरण्यासाठी अडचणीत येतो आहे. याला कवी म्हणणारे लिहिते उत्साही लोकच फक्त जबाबदार आहेत काय? या प्रश्नाचं उत्तर कठीण नाही, पण कठीण होऊन बसलंय. संगीत, शिल्प, चित्र, नृत्य, अभिनय आदी कला साध्य करायला भरपूर काळ द्यावा लागतो. तेव्हा कुठे कलाभूमीतून कलाकळ्या फुलून येतात. पण, कवितेसाठी एवढा काळ, छे! शक्यच नाही. फार सोप काम आहे ते! आलं डोक्यात, घेतलं पेनात, दिलं शब्दांत कालवून. झाली कविता. ऐकायला ओळखी-अनोळखी हाताळले तर ठीक, नाही तर जबरीचा प्रयोग आहेच किंवा ‘आपणासारखे करिती तत्काळ’ असा कवी घोळका लाभतोही. ‘क्या बात है!’ वगैरे एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
कवितेच्या दिव्याखाली…


आताशा कवींमध्येही कळप संस्कृती वाढायला लागली. आपआपल्या कळपातील कवी मित्रांसाठी काय-काय शक्य ते, शक्य होईल तेव्हा करावं लागतं. पुस्तक छापून देण्यापासून (अर्थात खर्च वसूल करून) ते एखाद्या पुरस्काराला चिकटून देण्यापर्यंत. तथाकथित समीक्षकांकडून त्यावर किंवा स्वत:च लिहून ते तसल्याच कुठल्यातरी वर्तमानपत्रात किंवा अनियमित निघणाऱ्या नियतकालिकात प्रकाशित करण्यापर्यंत परस्परांना सहकार्य करावं लागतं. थोडंफार नाव झाल्यावर एखाद्या विद्यापीठीय अभ्यासक्रमात कविता झळकाव्या म्हणून थैलीसह मैफलींमध्ये झलकावं लागतं. लक्षात राहण्याइतपत नाव झालं की पेहरावात बदल करावासा वाटतो. पाडगावकरी दाढ्यामिशा ठेवाव्याशा वाटतात. शबनम बॅग, बंगाली कुडता आणि छानसं जाकीट धारण करावंस वाटतं. आणि काही तसे करतातही. कवीचीही ‘आयडेंटिटी’ असायला हवीच.

अलीकडे कुणी कवी म्हणून आपला परिचय देताच लोक कधी त्याच्याकडे, कधी एकमेकांकडे वेगळ्याच नजरेनं पाहतात. नव्या लिहित्यांना रसिक ‘सिरीअसली’ घेत नाहीत असे नाही. ते घेतातही आणि ‘देऊन दाद, हटवा ब्याद’ म्हणून मोकळे होत विसरतातही. साहित्य संमेलनांतील कविसंमेलनांत आपली वर्णी लागावी म्हणून काही कवी संबंधितांशी आपुलकीचे संबंध जोडतात. काही भांडून जमवतात. हे सारं करावंच लागतं. आधी म्हटल्याप्रमाणे कविता रचायला आताच्या काळात फारशी तपस्या लागत नाही. म्हणूनच तर शीघ्रकवी असतात. ते मूळच्याच झऱ्यांप्रमाणे झरझरू पाहतात. तेव्हा कवितेपेक्षा त्यांच्या कवितेतली यमकंच नाचत असतात पुढे पुढे. नाइलाजानं लाज निर्वस्त्र झाली की सोवळंही फंदवण्यात ती अपशयी ठरत नाही. हाही तिचा प्रतिभाविलासच!

काही कवींच्या कवितांना समजून घेण्यासाठी वाचक वयात आलेला नसतो, असं बिंबवलं जातं. चालू युगाच्या खूप पुढे त्या कविता असल्यामुळे त्यांचा जाणकार वाचक जन्माला यायाच्या आधीच त्या जन्माला येऊन मरणाला प्रिय होईपर्यंत त्यांचे अर्थ सोडा, संदर्भही लागत नाहीत. कारण त्या अर्थातीत कालातीत अशा अमूर्त असतात. पण या संपूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक कण हा ऊर्जारूप. त्याला त्याचं सगुण आणि साकार स्वरूप आहे. फक्त ते आपल्या आकलन कक्षेत येत नसेल म्हणून ते ‘अॅब्स्ट्रॅक्ट’ अर्थात अमूर्त आहे. असा सिद्धान्त बनवणं बरोबर वाटत नाही कविता किंवा चित्रंही अमूर्त नसतात. निर्मात्यानं प्रत्येक निर्मितीला स्वत:चा घाट रंग-रूप-आकार दिलेला आहे. कविता दुर्बोध असू शकते, पण ती आत्मदुर्बोध नको! हेतूपूर्वक किंवा लहरीपणानं ‘तोडमोड’ करून रचना करणं हा मानस प्रक्रियेतील गडबडीचा मुद्दा ठरू शकतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज