अ‍ॅपशहर

पाऊस कधीचा पडतो...

अलिकडेच 'सुपर ३०' हा चित्रपट पाहिला. ' राजा का बेटा ही अब राजा नही होगा ... अब हकदार राजा होगा' यावर ठाम विश्वास असलेला गरीब पोस्टमन त्याचा हकदार मुलगाच राजा होईल असं स्वप्न बघतो. पण ते स्वप्नच ठरणार हे लक्षात येताच उरावर साचत गेलेल्या वास्तवाच्या विदारकतेने त्याची जगण्यावरची पकड सैलावते.

महाराष्ट्र टाइम्स 12 Aug 2019, 7:08 pm
अलिकडेच 'सुपर ३०' हा चित्रपट पाहिला. ' राजा का बेटा ही अब राजा नही होगा ... अब हकदार राजा होगा' यावर ठाम विश्वास असलेला गरीब पोस्टमन त्याचा हकदार मुलगाच राजा होईल असं स्वप्न बघतो. पण ते स्वप्नच ठरणार हे लक्षात येताच उरावर साचत गेलेल्या वास्तवाच्या विदारकतेने त्याची जगण्यावरची पकड सैलावते. त्याला गावातल्या दवाखान्यात घेऊन जाण्याचा आटापिटा त्याची मुलं करतात.. पण रस्त्यातच त्याचा मृत्यू होतो. आणि साक्षीला उरतो फक्त पाऊस. पुढे हाच मुलगा (म्हणजे बिहारचे आयआयटीयन्स घडवणारे शिक्षक आनंद कुमार) 'राजा के बेटे' नसलेल्या हकदार मुलांना राजा बनवण्याचा विडा उचलतो. काम सुरू होतं. अडचणी येत राहतात. गरीब, वंचित घरांतून आलेली ही मुलं एका क्षणी उमेद हरवतात, तेव्हा त्याचे हे गुरूजी विचारतात 'आयुष्याच्या वाटचालीत मोठा खड्डा आला तर काय कराल?' अस्वस्थ मुलं बळ एकवटून सांगतात, 'छलांग लगायेंगे. इथेही पुन्हा साक्षीदार पाऊस.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sagun-nirgun


चित्रपटांत असा भेटला आहे पाऊस अनेकदा. दु:खाच्या आणि सुखाच्या क्षणांचा साक्षीदार. या क्षणांचे परिणाम अधिक गडद गहिरे करणारा पाऊस.

'पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सूरांनी..

पाऊस असा इतका ठाशीव कवितेतही भेटतो. साहित्यात तर पावसाच्या असंख्य छटा दिसतात. कालिदासाचा 'मेघदू' प्रेमिकांचा विरह आणि प्रणय पावसाशी थेट जोडतो. संस्'गीत गोविंद'सारख्या संस्कृत खंडकाव्यातलं पहिलं दृश्यच पावसाच्या आगमनाची वर्दी देणारं. यातलं राधेचं अभिसाराचं निमंत्रण पावसाच्या साक्षीने. रामचरितमानसातही 'घन घमंड नभ गरजत घोरा । प्रिया हिन डरपत मन मोरा' पाऊस पुन्हा प्रणयाचा साक्षीदार.

पाऊस तसं तर नर्तन करणारा ऋतू. पाऊस तर गाणारा ऋतू. सबंध सृष्टीला संजीवन देताना उत्सवाच्या आनंदाच्या शक्यता गुलजार करणारा पाऊस. एका मल्याळी कवितेत कवी म्हणतो..

तुझ्या अंगणात

थेंबा थेंबात

आपल्या अगणित चांदीच्या तारांमध्ये

संगीताची सृष्टी निर्माण करणारया पाऊसधारा

नर्तन करतात एखाद्या जिप्सी तरूणी सारखं...

असा पाऊस.. मनमानीपणा करतो तेव्हा जीव कातरतो. शेतकऱ्याचे तर डोळेच आभाळाकडे लागलेले असतात. असा सगळा पावसाचा लेखाजोखा.

'आकाशवाणी'साठी काही वर्षांपूर्वी आम्ही फूटपाथवर राहणाऱ्यांच्या मुलाखती आम्ही घेतल्या. तेव्हा रात्री पाऊस आला तर काय करता, असं मी विचारलं. तेव्हा एकाने सांगितलं

'काय नाय, पाऊस आल्यावर दुकानाच्या पायऱ्यांवर पथारी टाकतो. सरला की वापस फूटपाथवर.' हे ऐकताना रस्ता, रेल्वे स्थानक, फूटपाथ, बस स्थानकांच्या आडोशालाच घर करणाऱ्या माणसांचे जथे डोळ्यांसमोर आले.

बारीश से बचनेकी तैय्यारी जारी है..

एकदा नारळपाणी पिण्यासाठी मी व माझी लेक थांबलो होतो. तिथेच एक ७/८ वर्षांचा मुलगा लोकांनी पाणी पिऊन टाकून दिलेल्या शहाळ्यांतून उरलेलं खोबरं काढून खात होता. तीन-साडेतीन वर्षांची माझी लेक त्याच्याशी गप्पा मारण्यात दंग झाली. त्यांच्या गप्पा रंगल्या असताना त्याला विचारलं, "घर कहां है रे?' तितक्याच सहज तो म्हणाला, 'घर? मेरा तो घर ही नही है..' बडबड करणारी लेक एकदम गप्प झाली. घरी पोहोचेपर्यंत गप्प गप्पच. घरी पोहोचलो तेव्हा गरमागरम स्वयंपाक तयार होता. उबदार अंथरूणं वाट पाहात होती. मात्र, त्या दिवशी आभाळात दाटलेला पाऊस डोळ्यांतून माझ्याही नकळत वाहू लागला. असा पाऊस...

(लेखिका ललित लेखिका आणि माध्यम प्रसारण तज्ज्ञ आहेत.)
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज