अ‍ॅपशहर

Rules of Qurbani बकरी ईद : जकात, खैरात, फितरा यांतील फरक व कुर्बानीचे नियम वाचा

इस्लामिक कालगणनेमधील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. बकरी ईदला कुर्बानी दिली जाते. याचे नेमके कोणते नियम सांगितले गेले आहेत? जकात, खैरात आणि फितरा यांमधील नेमका फरक काय? जाणून घ्या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2020, 1:25 pm
रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. मुस्लिम बांधवांचे वर्षभरात रमाजान ईद आणि बकरी ईद हे दोन अत्यंत महत्त्वाचे सण असतात. इस्लामिक कालगणनेमधील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. ईद-उल-जुहाचे पर्व हिजरीच्या अंतिम महिन्यात जुल हिज्जमध्ये साजरा केले जाते. ईद-उल-जुहाचा अर्थ त्यागाची ईद असा आहे. मुस्लिम बांधवांमध्ये ईद-उल-जुहाला विशेष महत्त्व आहे. बकरी ईदला दिल्या जाणाऱ्या कुर्बानीचे काही नियम सांगितले आहेत. जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bakari eid


बलिदानाची महती

बकरी ईद ही बलिदानाचे महत्त्व अधोरेखित करते. बकरी ईदला दिल्या जाणाऱ्या कुर्बानीचा अर्थ त्याग, बलिदान आहे, जे दुसऱ्यांसाठी दिले जाते. बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी प्रतिकात्मक असते. समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याचा संकल्प या दिवशी घेतला जातो. काही धार्मिक मान्यतांनुसार सुमारे ६०० ग्राम चांदी किंवा तेवढे पैसे ज्याकडे असतील, त्यांनीच कुर्बानीचे कर्तव्य बजावावे, अशी मान्यता आहे. ज्या व्यक्तींनी कोणाकडूनही कर्जाऊ रक्कम घेतली असेल, त्या व्यक्ती कुर्बानीचे कर्तव्य बजाऊ शकत नाहीत. संपूर्ण कर्जमुक्त व्यक्तीच कुर्बानी देऊ शकते.

बकरी ईद का साजरी केली जाते? वाचा, इतिहास व त्यागाची महती

समाजासाठी कुर्बानी

जी व्यक्ती आपल्या मिळकतीच्या अडीच टक्के रक्कम समाजोपयोगी गोष्टींसाठी दान करत असेल किंवा समाजासाठी नियमितपणे काही ना काही करत असेल. लोकांची मदत करण्यास तत्पर असेल, अशा व्यक्तींनी या दिवशी कुर्बानी दिली नाही, तरी चालते. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या प्राण्याची कुर्बानी द्यावी. सदोष प्राण्याची कुर्बानी देऊ नये, असे सांगितले जाते. कुर्बानीचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब मुस्लिम धर्मियाच्या घरात किंवा गरजूंना द्यावे, असे सांगितले जाते.

बकरी ईद : हज यात्रा का करतात? वाचा, काबाचं महत्त्व व मान्यता

जकात, खैरात व फितरा

कुराणानुसार, प्रत्येक मुस्लिम बांधवाने वर्षभरातील मिळकतीचा अडीच टक्के हिस्सा गरिबांसाठी खर्च केला पाहिजे. या दानाला जकात म्हटले जाते. तर समाजातील अन्य अत्यंत गरीब व्यक्तींना मदत करणे. ज्यांना दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत आहे, त्यांना ते नियमितपणे देणे वा अशा लोकांची कायम मदत करणे, याला खैरात असे म्हटले जाते. हे स्वैच्छिक दान मानले गेले आहे आणि ईदच्या पूर्वसंध्येला चंद्रदर्शन झाल्यानंतर लगेच घरातील सदस्यांची मोजणी करावी. घरातील एकूण सदस्य जितके अन्न मुख्य भोजनावेळी ग्रहण करणार आहेत. त्याचे तीन भाग करून गरीब आणि गरजू व्यक्तींना देणे अनिवार्य असते. अथवा त्या तुलनेत पैसे द्यावेत. ईदची नमाज अदा करण्यापूर्वी हे काम करावे. मुख्य भोजनात जो सर्वांत महागडा पदार्थ असेल, तितक्या किमतीचा फितरा काढला जातो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज