अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजचे वसुबारस ते कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजचे भाऊबीज या कालावधीत दीपोत्सव साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. दिवाळीच्या सणाचा इतिहास, परंपरा, मान्यता आणि काही रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊया...
दिवाळीचा इतिहास
पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. उपलब्ध पुराव्यांनुसार, दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. लक्ष्मीपूजनाच्या प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेरपूजन करण्याची रित होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु, गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत.
धन लक्ष्मी वर्ष : 'या' ९ राशींना लाभप्रद काळ; तुमची रास कोणती? वाचा
रामायण आणि महाभारत
चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसात. श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी प्रजाजनांनी संपूर्ण नगरीत दिवे प्रज्ज्वलित केले होते, असे सांगितले जाते. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. दुसरीकडे, महाभारत काळात श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.
महाकालीच्या रौद्ररुपाचे पूजन
देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता. तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवी चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाकडून तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देऊन भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील, असे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते.
दिवाळीला दुर्मिळ शुभ योग; देश व जागतिक पातळीवर मोठे बदल! वाचा
सुवर्ण मंदिर आणि दिवाळी
शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते, असे म्हटले जाते. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते. गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता, असे सांगितले जाते. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना 'ओम' म्हणून समाधी घेतली होती.
महावीर संवत्सराला सुरुवात
जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे अवतार सांगता केली होती. 'महावीर सवंत्' त्यांच्या दुसर्या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू, असे कल्पसूत्रात सांगितले आहे. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत, असे सांगितले जाते.
धन लक्ष्मी वर्ष : तुम्हाला लाभदायक की हानीकारक; राशींनुसार जाणून घ्या